03 April, 2016

बरं झालं सकाळ झाली


 बरं झालं सकाळ झाली!
 तुम्ही म्हणाल त्यात काय झालं ती तर रोजच होते. सवयीने आपण Good Morning म्हणतो (हल्ले ते सुद्धा उधारीच्या फॉरवर्डस व्दारे) आणि दिवस ढकलायला लागतो. आला दिवस ढकलतोय असाच सगळा कारभार असतो. असलेल्याचं कौतूक नाही की नसलेलं मिळवायची जिद्ध नाही.

मित्रहो असे सगळे विचार आले ते चाणाक्य मंडल परिवार  वरचं एक पोस्ट वाचून. काही दिवसांपूर्वी अविनाश धर्माधिकारी सरांना एक मोठा अपघात झाला होता. त्यातून आता ते जरा बरे होत आहेत, अजून पुर्ण बरे झालेले नाहीत. तर ते पोस्ट आधी वाचूया.



भारतीय श्रद्धा
- अविनाश धर्माधिकारी सर
माणसाचा जन्म मिळणं हे भाग्य आहे आणि आपल्याला मिळालेला हा देह हे मंदीर आहे अशी आपली भारतीय श्रद्धा आहे.
माझी सुद्धा ही श्रद्धा आहे.
ती कळण्यासाठी मला गंभीर अपघाताची गरज नव्हती.
तरी पण अपघातानंतर माझी ही श्रद्धा आणखी सखोल झाली आहे.
शरीर सुरळीतपणे काम करत असतं तोवर आपण त्याला गृहीत धरतो. त्याचं मोल विसरतो.
पण समोर मृत्यू दिसला, भोवती घुटमळून गेला की त्यानंतर आपण जिवंत आहोत या निव्वळ वास्तवाचाच आनंद असतो.
आणि फ्रॅक्चरमधनं हळू हळू बरं होत असताना क्रमाक्रमानं साध्या साध्या गोष्टी पुन्हा पूर्ववत जमायला लागतात, हा केवळ आनंद असतो.
आज काय उजव्या हातात ब्रश पकडता आला...
आज काय उजव्या हातानं स्वत:चे स्वत: दात घासता आले...
दाढी करता आली...
आज काय पेन पकडता आलं...
(अजूनही लिहिता येत नाहीये, पण येईल) किती साधे पण सखोल आनंद आहेत.
माणसाचा जन्म मिळणं हे भाग्य आहे. मिळालेला हा देह हे मंदीर आहे.


रटाळवाणं निरस जगणं आणि नुसते सुस्कारे सोडत जगण्याला काय अर्थ आहे. सगळे अवयव नीट चालतात तेव्हा आपल्याला त्यांची तमा नसते. अगदी लहान सहान गोष्टींवरून आपण दु:खी कष्टी होतो. जे आहे त्याचं सुख भोगण्यापेक्षा जे नाही त्यासाठी रडत बसतो. कधी तरी आपल्याजवळ किती आहे याचा विचार तरी केला आहे का आपण?

आता हेच बघा पाश्चात्य लोक Good Morning म्हणतात म्हणून आपणही म्हणतो. त्यांच्या देशात सदा सर्वकाळ उदासवाणं मळभ भरलेलं असतं. त्याने कित्येकांना मानसिक रोग होतात. थंडीने जीव नकोसा होतो. वर्षातून काही वेळा मात्र लख्ख उन पडतं. तेव्हा ते तो दिवस साजरा करतात आणि रात्री झोपताना Good  Night म्हणून आजची रात्र अती थंडी नसेल अशी आशा करतात. सकाळी उठल्या उठल्या आज पुन्हा सुर्यकिरणांकीत सकाळ असावी अशी सदिच्छा व्यक्त करण्यासाठी Good Morning म्हणतात.

आपल्याकडे मात्र नेहमी सकाळ होते  ती सुर्य किरणात न्हाऊन निघालेली असते. त्यासाठी चिंतीत व्हायची गरज नसते, ही Good Morning असतानाही आपण मात्र चिंताग्रस्त असतो, नसलेल्या गोष्टींसाठी. त्या ही मिळतील पण मन प्रसन्न असेल तर. बहुअंशी लोकांकडे सगळे शाबूत असालेले अवयव आहेत ना? मग? डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऎकू येत नाही, हात पाय चालत नाहीत असं झालं तर? त्या जगण्याला काय अर्थ आहे. जे आहे त्याचं सुख कधी उपभोगणार आपण? रात्रीनंतर सकाळ होते म्हणून सगळं सुरळीत चाललय़. समजा ती एकाद्या वेळी झालीच नाही तर. तर आपण तीची किती आतूरतेने वाट पाहू. ते कशाला एखाद्या रात्री झोपच येत नाही तेव्हा, आठवून बघा आपण किती आतुरतेने सकाळ होण्याची वाट पहात बसतो. नेहमी सारखी ती होते तेव्हा आपणच म्हणतो नाही का ‘बरं झालं देवा सकाळ झाली’. कशा छान कविता असायचा लहानपणी.

देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सुर्य देतो    



No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates