26 November, 2019

चित्रपटगृहात लडाख


ईशा टुर्सचा सहभाग असलेला कुलकर्णी चौकातला देशपांडे हा चित्रपट  विषयाची उत्कृष्ट मांडणीकुठेही न भरकटलेला आणि विचारा करायला प्रवृत्त करणारा चित्रपट तुमच्या जवळच्या सिनेमागृहात नक्की बघा.

गोंधळलेल्या अवस्थेकडून स्थिर अवस्थेकडे जाणारा जया देशपांडेच्या प्रवास... कुलकर्णी चौकातला देशपांडे, नक्की बघा तुमच्या जवळच्या सिनेमागृहात.

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित आणि सई ताम्हणकर यांची प्रमुख भूमिका असलेला "कुलकर्णी चौकातला देशपांडे" हा मराठी सिनेमा २२ नोव्हेंबर ला प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचे वैशिष्ट म्हणजे या चित्रपटाचं ४०% चित्रीकरण लडाखमध्ये झालं आहे आणि लडाख मधील या चित्रीकरणासाठी सर्व logistic support  ईशा टुर्सचा आहे. मराठी सिनेमाचं चित्रीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणावर लडाखमध्ये होण्याची ही पहिलीच वेळ असेल.




या सिनेमात ईशा टुर्सचा मोलाचा सहभाग आहे. या सिनेमामधील ३ गाणी शंकर महादेवन, श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांनी गायली आहेत. सिनेमामध्ये सई ताम्हणकर यांच्या सोबत निखिल रत्नपारखी, राजेश शृंगारपुरे, नीना कुलकर्णी आणि २ बालकलाकारांचा समावेश आहे. त्याचसोबत ईशा टुर्स ची स्मिता रेगे आणि आमचे अनेक लडाखी सहकारी या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळतील. आपण पाहिलेल्या लडाखच्या आठवणी ताज्या करायची सिनेमाच्या माध्यमातून ही उत्तम संधी आहे तेव्हा हा सिनेमा चुकवू नका.
जगभर अनेकजण काहितरी वेड घेऊन जगत असतात. झपाटून जाऊन येणार्या दिवसाला आव्हानं देत, जगण्याची नवी आव्हानं स्वीकारत झोकून देऊन जगण्यातच त्यांना रस असतो. पण असं जगण्याचं वेड जर एखाद्या बाईत असेल तर मात्र परिस्थिती वेगळी असते. मर्यादा वेगळ्या असतात.
कुलकर्णी चौकातला देशपांडे या गजेंद्र अहिरेंच्या सिनेमातली जया कालपासून अशाच वेडामुळे मनात रेंगाळत राहिली आहे. सगळं काही सुरळीतचालू असताना असमाधानी वाटणं, बेचैन वाटणं हे जगाच्या दृष्टीने वेडेपणाचंच लक्षण आहे. पिढीजात श्रीमंती असलेला नवरा, आठ वर्षांचा गुणी मुलगा आणि निवांत जगण्याची मुभा असलेलं चाकोरीतलं आयुष्य ती नाकारते. नवर्‍याच्या नावाने हळदिकुन्कवाचे समारंभ करण्यापेक्षा तिला हवी असतात ऊर फुटेपर्यंत झोकून देऊन पूर्ण करता येणारी आव्हानं. स्वतःच्या सगळ्या क्षमता आजमावून पाहायच्या असतात तिला. आणि मग जगण्यासाठी ती चौकटी मोडते. चाकोरितनं बाहेर पडते.
बोलायला सहज सोपी वाटणारी, फार प्रेरणादायी वाटणारी ही वाक्यं असतात.. चौकटी मोडणे वगैरे.. पण प्रत्यक्ष जगताना छातीत जी हिम्मत लागते ती सगळ्यांमधे असतेचा असं नाही. कुलकर्णी चौकातला देशपांडे चित्रपटातली मधली जया बघताना आपल्याला आसपासची अनेक माणसं आठवत रहातात. घटस्फ़ोट ही गोष्ट आजही आपल्याकडे तोंडावर हात ठेवूनच बोलतात. नवरा मारझोड करतो, सासरचा छळ, विवाहबाह्य संबंध वगैरे कारणं असतील तर घटस्फ़ोटही ग्राह्य धरला जातो पण माझा नवरा महत्वाकांशीच नाही, त्याला आयुष्य भरभरून जगण्यात रसच नाही म्हणून मला घटस्फ़ोट हवा असं जेव्हा जया जाहिर करते तेव्हा तिची आई सुद्धा तिला समाजून घ्यायला कमी पडते. संसारात तडजोडी कराव्याच लागतात बाईला..हे वाक्य जे जयासारख्या मुलींना सतत ऐकावं लागतं. पण अशा मुली म्हणजे एक वेगळं रसायन असतात. ते जे वेड असतं त्यांच्यात ते त्यांना एका दगडावरून उडी मारायला शिकवतं जेव्हा की त्यांच्या समोर त्या क्षणी असा एकही दुसरा दगड नसतो ज्यावर त्या जाऊन उभ्या राहू शकतील. हवेत झोकून देत त्या फक्त सावरायलाच शिकत नाहित तर एक अख्खं साम्राज्य ऊभं करायला शिकतात जिथे त्या त्यांच्या आयुष्याच्या, स्वप्नांच्या सम्राज्ञी असतात.

घटस्फोटासारख्या एका अत्यंत शुल्लक पण आपल्या समाजाने ज्याचा ब्रह्मराक्षस करून ठेवला आहे अशा गोष्टितनं पार जाताना बायकांची आणि त्यांच्या मुलांच्या मनांची जी आंदोलनं होत असतात ती कुणालाही समजू शकत नाहित. परिपूर्ण होण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांना जिवंत करता आलं पाहिजे. आणि कुलकर्णी चौकातला देशपांडे मधली जया हेच परत परत सांगते. तिला हे कळतं की तिच्याकडे असलेली उत्तम बुद्धिमत्ता, उत्तम मन, उत्तम शरीर या सगळ्याचे लाड करायला हवेत..आणि तिथंच तिचा संघर्ष सुरू होतो.

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित आणि सई ताम्हणकर यांची मुख्य भुमिका असलेला "कुलकर्णी चौकातला देशपांडे" हा मराठी चित्रपट उत्तम भट्टी जमलेला भावनाप्रधान, समस्येची उकल करून दाखवणारा, उत्तम चित्रीकरण असलेला आणि लडाखचं सौदर्य खुलऊन दाखवणारा एक उत्तम चित्रपट पहाच.        


21 November, 2019

वाट आहे लांब ही


मी मला समजून घेण्या जन्म शंभर लागले
अन् तूला समजायाला कितीक जातील यातले?

कोण मी? कोठून आलो? चाललो आहे कुठे? 
तू कधी निसटून जाशील काय होते आपूले?
 
पळभराची साथ सोबत भरवसा ठेवू कसा?
मानले तू एक आपण, पण तू तसा अन् मी असा

चालून थकलो, वाट आहे अजून इथली, लांबली... 
हो पुढे आयुष्य आहे लांब पडली सावली   

काढून घेतो पाय आता संपते का वाट ही? 
यापुढेही जन्म आहे वाट आहे लांब ही

नरेंद्र प्रभू

 



10 November, 2019

खलील जिब्रानच्या गोष्टीतील कोल्हा



खलील जिब्रानच्या गोष्टीतील कोल्हा
एकदा निघाला पहायला आपला जिल्हा
त्याने गाठला जवळचाच किल्ला
वरून न्याहाळतो तर केवढा मोठा पल्ला

पडली होती सकाळची कोवळी उन्ह
त्याने पाहिली आपलीच सावली लांबून  
कित्ती मोठ्ठा मी पहा माझी शान
लागेल शिकार मला हत्तीचीच मान

निघाला ऐटीत शेपटी हालवत छान
शिकार थोडीच येणार होती गुमान
दमला भागला उभा राहिला थकून
बघतो हे काय... पायाखाली वाकून

सगळीकडे पसरलं होतं दुपारचं उन
आली सावली पायाखाली दाटून
तो इवलासा गेला आता थकून
म्हणला आता ससाच टाकतो खाऊन

लांब सावली, तू तेव्हढाच
खरंच आहेस नखाएवढाच
नको हा माज, दुसर्‍याला जाच
डोक्यावरचा सुर्य सर्वांचा तेव्हढाच

09 November, 2019

तेजाची आरती





गीत रामायण हा मराठी गीत, गायन आणि सादरीकरणाचा मुकूटमणी. गीत रामायण हे एप्रिल १९५५ ते एप्रिल १९५६ या कालावधीत ग. दि. माडगूळकर यांनी वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन रचलेलं, सुधीर फडके यांनी संगीत दिलेलं आणि गायीलेलं महाकाव्य आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालं होतं. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या 'गीतरामायणा'स भरीव लोकप्रतिसाद मिळाला होता.

अनघा मोडक
या वर्षी आकाशवाणीने ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्या दोघांच्याही कारकिर्दीवर आधारित मालिका २५ जुलै २०१९ पासून प्रत्येक गुरूवारी सकाळी प्रसारीत केली होती. १३ भागातली ही मालिका श्रोत्यांना आनंदाचा खजिनाच रिता करून गेली आहे. अतिशय तरल, भावमय आणि ओजस्वी वाणी असलेल्या अनघा मोडक यांनी त्या मालिकेचं लेखन आणि निवेदन केलं आहे. आकाशवाणीच्या सुजाता परांजपे (क्रेंद संचालक) आणि नेहा खरे (कार्यक्रम अधिकारी) यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या मालिकेला चेतना झांजे यानी निर्मिती सहाय्य केलं आहे.       

गदिमा आणि बाबूजी या दोन महान व्यक्तीमत्वांच्या एकुणच जीवनाचा आणि कारकिर्दीचा अतीशय रंजक असा अभ्यासपूर्ण आढावा या तेरा भागात घेतला गेला आहे. अनेक रंजक किस्से, डोळ्यात पाणी आणणारे प्रसंग आणि उद्बोधक माहिती या प्रसारणातून मिळाली. हे तेरा भाग प्रसारित झाल्यानंतर गेल्या गुरूवारी या चमूने श्रोत्यांशी संवाद साधण्याचाही कार्यक्रम प्रसारीत केला तेव्हा त्याला जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला, श्रोत्यांनी आपले सद्गदीत करणारे अभिप्राय दिले. गदिमा आणि बाबूजींच्या जीवन कार्याचा अभ्यास करून तो अल्प वेळात सादर करण्याचं शिवधनुष्य या कार्यक्रमाच्या लेखिका आणि निवेदिका अनघा मोडक यांनी लिलया पेललं आहे. 

नेहा खरे

लहानपणापासून दर्जेदार कार्यक्रम देणार्‍या आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत आलोय. माहिती आणि मनोरंजना बरोबर विश्वासार्हता हे आकाशवाणीचं वैशिष्ट्य. बदलत्या युगात नवनव्या प्रसिध्दी माध्यमात मध्यंतरी आकाशवाणी काहिशी झाकोळून गेली होती. पण एफएम वाहिन्या आणि मुख्य म्हणजे मोबाईल अ‍ॅप (NewsOnAir)  या नव्या तंत्रज्ञानाचा वापर आकाशवाणीने सुरू केला आणि जगभरात पसरलेल्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना पुन्हा एकदा जुने दिवस, जुनी गोडी आपल्या मुठीत आल्याचा आनंद झाला. मोबाईल अ‍ॅपमुळे तर कुठेही असलं तरी कार्यक्रम ऐकता येतात किंवा महत्वाच्या बातम्या कधीही ऐकता, पहाता, वाचता येतात.                   

हे भाग ऐकताना ते पुन्हा पुन्हा ऐकावे असं वाटत होतं, नेहा खरे आणि त्यांच्या चमूने ही बाब लक्षात घेऊन पहिले दोन भाग YouTube वर कधीही ऐकण्यासाठी उपलब्ध  करून दिले आहेत (पुढचे भागही लवकरच उपलब्ध होतील अशी आशा आहे)रसिकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. एवढा सुश्राव्य कार्यक्रम सादर केल्याबद्दल आकाशवाणीचे धन्यवाद.   




04 November, 2019

किती तुझी जीभ लांब?




किती तुझी जीभ लांब?
अरे कुठेतरी थांब!

ज्याच्यावर कालपर्यंत केले वार
त्याचाच आज घेतोस कैवार?
नाचतो आहेस होऊन सांब
पण आहेस एकच खांब
असा कसा आलाय रे उत
तू कुणाचा आहेस दुत

धुतराष्ट्रालाही माहित आहे हा खोटं बोलतोय
संशय आलाय, हा नावाचाच आहे तो जाणतोय
य कसा होणार तो ममोमन खचतोय
माचा रेडा बघा त्याला सोडूनच पळतोय
आंधळा खानदान(पक्ष) नष्ट होताना बघतोय
निती तिथेच असतो विजय

तुला लोळवणार बारामतीचा पैलवान
जो आहे इटालियनचा बागवान
बगलमे छुरी आणि तोंडात राम
आंध्रबाबूला बघ फुटलाय घाम
बाजारबुणगे तुला घेऊन नाचतात
तुझ्याजवळ आकडानाय ते जाणतात   

म्हणे आम्ही नितीवान
असे किती लोळवलेत खान
बेडकाचा होतो का कधी सांड?
चव्हाट्यावर किती ही भांडाभांड?
आपणच म्हटलं रांड...
तर जग म्हणतंचना सांड?

रस्त्यावरच्या खड्यात पेंग्वीन कसा जगेल
इतकं खाऊन पालिका कशी तरेल
बेस्टची गाडी पहिली रुळावर आण     
नाही रे ती सोन्याची खाण
पोरगं आहे ते, त्याला नाय जाण
जनता आहे ती काढेल पायताण  

विश्वासाला तडा गेलाच, तो आता ढळतोय
दोन मातोश्री झाल्या, आता कसला फळतोय?
महाराष्ट्र जळतोय, पाऊस असा छळतोय  
हुरळून नको जावू मिडिया तुख्याशी खेळतोय  
कापून घेवू नको नाक
वल्गना नको होशील खाक

टाळ्या पिटताहेत बघून तुझ्या कसरती
तुला केव्हा होणार आहे उपरती?
गुरगुरणारा शिकार करीत नसतो
गरजणारा तरी कुठे बरसतो?
आत्मघाताची तुला आलीय खाज
म्हणून चोळतोयस सोडून लाज      

इतिहासात नको राहू, त्याच्यापासून शिक
जे स्वत:च नागडे ते घालतील का भिक?      
बहकू नकोस, म्हणतील स्वत:लाच विक
रामराम करतील ते नाहीत भाविक
म्हणून म्हणतो कुठेतरी थांब!
हातातला जाम ठेव जरा लांब




LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates