31 May, 2020

आठवणीतलं लडाख



६ वर्षांपुर्वीच्या लडाखच्या फोटोंची आठवण फेसबूकने करून दिली आणि ही कविता सुचली.   


असेल पडले असे चांदणे
हिमात असतील निजले पर्वत
शिखरावरती फडकत असतील
रंग पताका निरोप धाडीत 

असेल किलबील करीत बैसला
पक्षी निराळा निळा-पांढरा
झाडावरती जीवन हिरवे
जर्दाळूला शुभ्र फुलोरा 

असेल बदलत पट रंगांचे 
निळे सरोवर सुवर्ण मंडीत
असतील काहो सुडौल बदके 
लाटांवरती सुरेख डोलत

देतो आहे जवान माझा
खडा पहारा खिंडींमधूनी
असेल का हो कुणी बोलला
शब्द सुखाचा माझ्यावाचूनी?  

असेल बसला मित्र ताशी तो
वाटेवरती लावूनी डोळा
असतील जमले सखे तिथे रे
घेवून येतो अपुला मेळा

नरेंद्र प्रभू   
३१/०५/२०२०  













03 May, 2020

कुत्रे बिस्कीट



कुत्रे बिस्कीट... खुप दिवसांनी आठवली ही बिस्कीटं. तळ कोकणात त्या काळी (आता खरं तर त्याला कोणे एके काळी असंच म्हटलं पाहिजे) पाववाला सकाळीच शहरवजा गावामधून पाव, बिस्कीटं विकण्यासाठी सायकलने फेरी मारायचा. त्याच्या सायकलला घंटी ऐवजी ट्रकला असायचा तसा हॉर्न असायचा. तो पॉsss पॉsss करीत गावभर फिरायचा. पाववाल्याजवळ गिर्‍हाईक यायच्या अगोदर गावातले तमाम कुत्रे जमा व्हायचे. सायकलपासून थोडं  अंतर ठेवून मागून धावत रहायचे. बेकरीतल्या ताज्या पाव-बिस्कीटांचा दरवळ कुत्र्यांना मॉर्निग वॉक करायला भाग पाडायचा. पाववाला पाव-बिस्कीटं विकायला थांबायचा, मध्येच कधीतरी कुत्र्यांच्या दिशेने काही बिस्किटं फेकायचा. पुन्हा सायकलचा पॅडल मारून पॉsss पॉsss करीत रस्त्याला लागायचा.

आता यात कुत्रे बिस्कीटांची महती अशी की ती माणसाला आणि कुत्र्यांना दोघांनाही आवडायची. कुत्र्याला पावही आवडत असणार पण त्याला तो कोण देणार? रुपयाच्या नाण्याएवढीच असलेली ही बिस्कीटं मात्र कुत्र्यांना पाववाल्याकडून किंवा गाववाल्यांकडून मिळायची.

काल ही गोष्ट घरात सांगितली तेव्हा माझी मुलगी विचारायला लागली कुत्र्यांसाठी होती म्हणून त्या बिस्कीटांना कुत्रे बिस्कीटं म्हणायचे का? म्हटलं नाही, तेव्हाचे कुत्रे एवढे माजलेले नव्हते आणि गाववाले श्रीमंत नव्हते. कुत्र्यांना द्यायला ती इवलीशी बिस्कीटंच परवडायची, पाववाल्यामागे बिस्कीटांच्या वासामुळे कुत्रे फिरत रहायचे त्यामुळे असेल किंवा त्याच्याकडून त्यांना ती बिस्कीटंच मिळायची म्हणून असेल त्या छोट्या बिस्कीटांना कुत्रे बिस्कीटंअसं नाव पडलं.

आताचे कुत्रे माणसांनी खायच्या बिस्कीटांना हुंगून बघतात आणि तुम्हालाच लखलाभ होवो अशी चर्या करून निघून जातात. वक्त वक्त की बात है, काळाचा महिमा अघाद आहे. कुत्रंपण खात नाही ते माणूस खातो.                

02 May, 2020

स्वप्नांचा प्रवास






वाटा असती कधी न सोप्या
अवचित कधी ती वाट अडे
कडेकपारी सह्याद्रीच्या
घालून देती हेच धडे

पायवाटा माझ्या झाल्या म्हणत त्या वाटांचंच हमरस्त्यात रुपांतर करीत नसते अवघड काही रे म्हणणार्‍याचीही आज वाटांवरती काटे रे अशी अवस्था झाली आणि न सुटणारं हे कोडं कसं सोडवायचं अशी स्थिती आहे.

खरंच आज वाटा अडल्या आहेत आणि सगळं जगच बंदीवान झालं आहे. पायाला चाकं असलेल्याची तर पार कुचंबणा झाली आहे. पण हेही दिवस जातील आणि पुन्हा एकदा आपण सगळे नव्याने बाहेर पडूच....! आज ही खात्री वाटण्याचं कारण ठरला प्रिय मित्र आत्माराम परब. फेसबुक वॉच पार्टीवर चांगला पाऊण तास या पठ्ठ्याने गप्पांची मैफिल रंगवली. मी पुढे जाणारच या दुर्मम्य इच्छाशक्ती पुढे कोरोना हरेलच पण पुन्हा नव्याने जगभराची भ्रमंती सुरू होईल.  आत्मा बोलत असताना गेला दिड महिना दाटून आलेलं मळभ कुठल्याकुठे नाहीसं झालं आणि नव्या वाटा पुन्हा साद घालू लागल्या. त्याचं बोलणं सुरू असताना येणार्‍या  प्रश्नांवरून हे लक्षात येत होतं. मित्रहो मन प्रसन्न करणारे खुप छान क्षण होते ते. आपणही याचा आनंद या लिंकवर जाऊन लुटाच:



              

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates