11 July, 2026

गाजलेली मैफिल आणि निळाईची गाज



थबकल्या झिम्माड धारा, स्तब्ध हा उनाड वारा

नाविकाचे गीत माझ्या, ऐकती करिती किनारा

लोक भेटायास आले, निशब्द होऊन गेले

शब्द-शब्द कवितेतला अन् भावही वेचून गेले

सागराचे गुज त्याच्या, साठले गीतात होते   

वादळाची स्पंदने, धडकून कापरे भरीते

 आदळे हदयात माझ्या, आंधळा अफाट दर्या

स्वार तो झाला तयावर, पेलले आकाश लिलया  

सचैल न्हाली सांज होती, हरपलेले भान होते

कोण कोणाला मिळाले? का कुणा ठाऊक होते?  

                                                 नरेंद्र प्रभू

काल प्रभादेवी मुंबईत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या पु. ल. कट्ट्यावर लेखक, कवी कॅप्टन वैभव दळवी यांचा निळाईची गाज हा बहारदार कार्यक्रम सादर झाला आणि गेले आठ दिवस मुंबईत बरसणारा पाऊस दोन तासात रसिक मनावर कोसळून गेला. तुडुंब भरलेल्या नॅनोसभागृहात गर्दी ओसंडून वहायला लागली आणि आयोजकांना रसिकांसाठी दुसरं दालन खुलं करावं लागलं. निळाईची गाज ऐकायला सागराला उधाण यावं तशीच गर्दी लोटली होती आणि जमलेल्या श्रोत्यांना कॅप्टन वैभव दळवी यांनी तृप्त करून सोडलं. त्यांच्या कवितेचा भावार्थ, अत्यंत नेटकं आणि प्रभावी सादरीकरण, त्याला लाभलेली दृकश्राव्य माध्यमाची साथ आणि टाळ्यांचा कडकडाट मैफिलीला सातवे आसमान पार घेऊन गेला.

·         कविता आणि आयुष्याची लय: संवादाची सुरुवात कवितेच्या सामर्थ्याबद्दल झाली. कॅप्टन दळवी यांनी स्पष्ट केले की, आपल्या दैनंदिन जीवनातील साध्या गोष्टींपासून ते विश्वाच्या विशालतेपर्यंत सगळीकडे कवीचे मन आणि गाणे दडलेले असते.

·         लहानपणीचे संस्कार: कॅप्टन दळवी यांनी शिवडी-लालबाग येथील गिरणगावातील त्यांच्या बालपणाबद्दल सांगितले. त्यांचे वडील, जे स्वतः एक कवी होते, त्यांनी त्यांना अनेक नामवंत साहित्यिक व्यक्तींशी ओळख करून दिली, ज्यामुळे त्यांची साहित्यातील आवड निर्माण झाली.

·         समुद्र आणि वादळाचे अनुभव: समुद्राशी त्यांचे नाते खूप घट्ट आहे. त्यांनी 'भरून आलं आभाळ' आणि 'जहाज बुडता बुडता' या कवितांद्वारे समुद्राचे सौंदर्य आणि वादळातील त्याचे रौद्र रूप यावर भाष्य केले आहे.

·         शिस्त आणि सर्जनशीलता: गणवेशातील शिस्त आणि कवितेतील मुक्त अभिव्यक्ती यांचा मेळ कसा साधता, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, युनिफॉर्म हे त्यांचे कर्तव्य आहे, तर कविता ही त्यांची आत्माभिव्यक्ती आहे .

·         जीवघेणा प्रसंग: त्यांच्या कारकिर्दीतील एक अत्यंत थरारक प्रसंगाचे वर्णन त्यांनी केले, जेव्हा अटलांटिक महासागरात त्यांचे जहाज बुडत होते. त्यांनी आणि त्यांच्या टीमने धैर्याने आणि युक्तीने त्या संकटावर कशी मात केली, हा प्रसंग अतिशय प्रेरणादायी मुळापासून ऐकण्यासारखा आहे.

·         भारतीय सैनिकांना आदरांजली: कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी त्यांची गाजलेली कविता 'कोण लागतो रे तो तुमचा?' सादर केली. आपल्या भारत देशाच्या सियाचीन सारख्या दुर्गम सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या त्यागाचे आणि त्यांच्या संघर्षाचे मर्म या कवितेतून त्यांनी मांडले आहे.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी च्या पु. ल. कट्ट्यावरदर शुक्रवारी अशी मैफिल जमत असते, जमलं तर नव्हे जमवून याच.

ता. क. या कार्यक्रमाचा दुसरा भाग इथेच सादर व्हावा अशी मागणी रसिकांमधून कार्यक्रम संपता संपता केली गेली हेच या कार्यक्रमाचं फलित आहे.      



No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates