Showing posts with label आरोग्य. Show all posts
Showing posts with label आरोग्य. Show all posts

27 March, 2020

चागंले दिवस येतील..




झाडं-पेडं जिवंत राहिली तर फुलं-फळं येतील
वाईट दिवस सरून पुन्हा चागंले दिवस येतील

बंद दाराआड जनता लपून नाही बसलीय
स्वतःच दारासमोर लक्ष्मण रेषा आखलीय

जीव जगावायचाय, फुका का मारायचं?
समाजाचं देणं मानून घरातच बसायचं

स्वातंत्र्याचा लढा द्यायचाय नुसतं घरात बसून
देशसेवा सेवा घडणार आहे फक्त अंतर राखून

थोडे दिवस बंद होवून आझादीचं महत्व कळेल
आताच बाहेर पडाल तर प्राण सोडून जाईल   

थांबूया थोडं घरातच अडचण असली तरी
चागंले दिवस येतील जर राहिलात घरी   



नरेंद्र प्रभू 




26 March, 2020

राजा परिक्षीत आणि आपण



परिक्षीत राजाला राज्य कारभार सोपवून पांडव हिमालयात निघून गेले, भगवान श्रीकृष्णांनी वैकुंठाला प्रस्थान केलं आणि नेमकी त्याच वेळी कलीयुगाला सुरूवात झाली. कलीयुगाचा आरंभ झाला आणि सत्ययुग, त्रेतायुग आणि व्दापारयुगातले नियम बाजूला पडून कलीयुगातल्या सुंदोपसुंदीला सुरूवात झाली. प्रजाहित दक्ष आणि कर्तव्यनिष्ठ राजा परिक्षीत एकदा शिकारीला गेला असताना त्याचा कलीशी वाद झाला, राजाने कलीला पृथ्वीवरून निघून जायला सांगितलं पण आता व्दापारयुगाची समाप्ती झाली असून माझं इथेच रहाणं आवश्यक आहे असं कलीने सांगितलं आणि रहायला जागा मागितली, मग परिक्षीत राजाने त्याला द्यूत, मद्यपान, परस्त्रीगमन आणि हिंसा या चार ठिकाणी रहायची परवानगी दिली. पण एवढी चारच ठिकाणं पुरेशी नसून आणखी एखादं ठिकाण तरी द्यावं अशी कलिने मागणी केली. परिक्षीत राजाने मग त्याला सोन्यात रहाण्याची परवानगी दिली. मान हालवून कली निघून गेला आणि काही वेळातच गुप्तरुपात येवून  राज्याच्या मुकुटात राहू लागला.

दिवसभर जंगलात फिरून राजा दमून गेला, फिरता फिरता तो शमिक ऋषिंच्या आश्रमाजवळ आला. ऋषि ध्यानात मग्न होते, राजाने प्यायला पाणी मागितलं पण ऋषिंची समाधी लागली होती. राजाने तीन-चारदा विनंती करूनही ऋषि बोलेनात तेव्हा मुकुटातल्या कलीने संधी साधली आणि राज्याच्या विवेकाला हुलकावणी देवून, विवेकाला बाजूला सारून त्याला क्रोधयुक्त केलं, राजाने मरून पडलेला साप ऋषिंच्या गळ्यात अडकवला. तेव्हढ्यात शमिक ऋषिंचा पुत्र शृंगी नदीवरून परत आला. त्याने ते दृष्य पाहून राजाला शाप दिला की सात दिवसात महाविषारी तक्षकाच्या दंशामुळे तू मरण पावशील.

महालात परत येवून राजाने जेव्हा मुकूट काढून ठेवला तेव्हा त्याला आपली चूक कळून चुकली. त्या तक्षकापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याने एका बंद पिंजर्‍यात स्वत:ला कोंडून घेतलं पण भुकेने व्याकूळ झाल्याने त्याला फलाहाराची इच्छा झाली. राजाने गोड बोरं मागवली, त्या बोरात लपलेल्या तक्षकाच्या अळीचा पिंजर्‍यात प्रवेश झाला. तीच्या दंशाने राजाचा अंत झाला.

कोरोनाच्या विषाणूने आपल्याला असंच कैद केलं आहे किंवा त्याच्यामूळे आज आपण घरात बंद झाले आहोत. राज्याच्या फळाच्या आशेने जशी तक्षकाला संधी मिळाली तशी संधी आपण कोरोनाला देता कमा नये. आज राजा आणि रंक सगळेच एका पातळीवर आले आहेत किंवा आपण सगळेच राजा झालो आहोत. परिक्षीतासारखी चूक करूया नको.           


24 February, 2013

गोवा मॅराथॉन २०१३




दिनांक १७ फेब्रुवारी २०१३ हा दिवस गोयकरांसाठी  एक आगळी वेगळी पहाट घेवूनच आला होता. एरवी सुशेगात म्हणून ओळखली जाणारी गोवेकरांची पावलं वाडी-तळावली या गावाकडे अगदी रामप्रहरीच वळली होती. गावातल्या लक्ष्मी-नारायणाच्या देवळाकडे लगबगीने निघालेले गावकरी एखाद्या लग्न समारंभाला नटून थटून आल्यासारखे भासत होते. गावातले तमाम आबाल-वृद्ध, बाया-बापडे सगळे सगळे समारंभ स्थळी दाखल होत होते. गोवा मॅराथॉन २०१३ साठी या सर्वांचा उत्साह मॅराथॉन सुरू व्हायच्या आधीच घावत होता. आनंद उत्सवाची लहर सर्व परिसर व्यापून उरली होती. पताका आणि रंगी बेरंगी रांगोळ्यानी सगळा आवार सजला होता.   

गोव्याचे राज्यपाल श्री. भारत  वीर वांच्छू डॉ. रामाणींचा सत्कार करताना सोबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर.  
गोव्याचा प्रांत सुनापरांत म्हणून ओळखला जातो. या सोन्यासारख्या भुमीत नररत्नांचीही काही कमी नाही, अशाच जगप्रसिद्ध नररत्नांपैकीच एक डॉक्टर प्रेमानंद रामाणी. रामाणी सरच या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू होते. वयाची पंच्याहत्तरी गाठून तरूणांनाही लाजवेल अशा उत्साहात ते मॅराथॉनला धावायची तयारी करत होते. देवळाच्या एकाबाजूला टी-शर्ट, टोप्यांचं वाटप शिस्तबद्ध रितीन चाललं होतं.

२१ किलोमीटरच्या अर्ध मॅराथॉनला आता सुरूवात होणार होती. फटाक्यांची आतषबाजी झाली आणि सुवासिनींची लगबग वाढली. सहभागी धावपटू धावरेषेवर तयारीत उभे ठाकले आणि इशारा होताच मॅराथॉन पटूंची पावलं ट्रॅकवर पडली. सर्वांना रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या सुवासिनींनी पंचारतींनी ओवाळलं, पुष्पवृष्टी झाली आणि सलग आठव्या वर्षीच्या मॅराथॉनला सुरूवात झाली.

 डॉ. प्रेमानंद रामाणी मार्गावरून धावणार्‍या मॅराथॉनपटूंचं नेतृत्व डॉ. रामाणीच करत होते. वाटेत लागणार्‍या घराघरातून लोक दोतोर, दोतोर म्हणून डॉक्टरांच्या दिशेने अंगुली निर्देश करीत होते. २१ किलोमीटरच्या मॅराथॉन ट्रॅकवर पन्नासच्यावर असणार्‍या मंदीरांमधून देव-देवतांचा आशीर्वाद या मंगल सोहळ्याला लाभत होता. गोव्याचा निसर्ग वसंतात न्हाऊन निघाला होता आणि वर आकाशातून रवीकिरणांनी सोनेरी बरसात करायला सुरूवात केली होती. स्वच्छ, सुंदर, प्रसन्न अशा गार हवेत धावपटू आपल्या धेय्याकडे धावत होते. वाटेत कार्यकर्ते दमलेल्या धावपटूंना पाणी आणि बिस्कीट वाटप करता करता त्यांची हिम्मतही वाढवत होते. गावात उत्साह ओसंडून वाहत होता, त्याला आज उधाणही आलं होतं. जीवनाची रेस कशी धावावी याचा धडा डॉक्टर रामाणींनी आपल्या पंचाहत्तर वर्षांच्या आयुष्यात घालून दिला आहे आणि आजही ते त्या कामात अग्रेसर आहेत.

डॉक्टर रामाणींची कर्मभूमी मुंबई, मुबईहूनही डॉक्टरांचे चाहते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. आरोग्याचा मंत्र सर्वानांच जपायचा होता.  

माध्यमिक शिक्षणापर्यंतचे धडे गावातच गिरवल्यावर प्रेमानंद रामाणी मुंबापुरीत दाखल झाले. न्युरोस्पायनल क्षेत्रात निक्ष्णात डॉक्टर बनून जगात नाव कमावलं, पण वाडी-तळावली या आपल्या मुळ गावाकडे त्यांच कधीच दुर्लक्ष झालं नाही. आपल्या प्रेमळ आईची आठवण म्हणून डॉक्टरानी अहिल्याबाई रामाणी ट्रस्ट स्थापन करून त्या योगे आपलं राहातं घर गावाला अर्पण तर केलच पण त्याच जागेवर एक टुमदार इमारत बांधून त्या इमारतीत ज्ञान आणि आरोग्याचा यज्ञ सतत घगघगत ठेवला. आजची मॅराथॉन ही त्या यज्ञातलीच एक समिधा होती. २१ किलोमीटरच्या मॅराथॉनमध्ये धावणारे धावपटू म्हणून डॉक्टर रामाणीसर होते, तसेच गावकरीही त्यात सहभागी झाले होते. एक प्रकारे ही ज्योतीने तेजाचीच आरती चालली होती.

मॅराथॉन पुर्ण करून येणार्‍या धावपटूंचं जल्लोषात स्वागत होत होतं आणि पहिला, दूसरा, तीसरा असा त्यांचा क्रमही घोषीत केला जात होता. आता चहापानानंतर होणार्‍या सत्कार समारंभाकडे सर्वाचंच लक्ष लागलं होतं. तुडुंब भरलेल्या लक्ष्मी-नारायण सभागृहात या नंतर सत्कार समारंभाला सुरूवात झाली.  


18 July, 2010

आपण जे खातो, तसे आपण होतो


सतरा जुलैच्या लोकसत्ता चतुरंग पुरवणीत वैपुल्य आणि वैफल्य हा छाया दातार यांचा फारच सुंदर लेख आला आहे. अमेरिकेतील जीवनशैली विशेषत: खाद्यशैलीवर छायाताईंनी खुपच छान प्रकाश टाकला आहे. एका कॅलरीसाठी दहा कॅलरी खर्च होणारी उर्जा, ग्लोबल वॉर्मींग, ल्कायमेट चेंजसारख्या गंभीर विषयांकडे केले जाणारे दुर्लक्ष, फास्ट, कनव्हिनियंट, चीप हा मंत्र. मासासाठी जनावरांना नेहमीचं अन्न सोडून प्रक्रिया केलेलं अन्न खायला लावणं असे अघोरी प्रकार, हेच पदार्थ नंतर माणसांच्या खाण्यात आल्याने त्यांच्यावर होणारे विपरीत परिणाम, येणारा लठ्ठपणा हे त्या लेखातले प्रमुख मुद्दे आहेत. हा लेख मुळातूनच वाचण्याजोगा आहे म्हणून इथे त्याची लिंक देत आहे. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=86398:2010-07-16-08-48-20&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194 तो लेख आपण जरुर वाचावा. पण पाश्चात्यांचे अंधानुकरण करणारे आपण शहरी भारतीय सुद्धा यात मागे नाही. प्रसार माध्यमातून हल्ली त्याची चर्चा सुद्धा होत असते. पण लक्षात कोण घेतो! आपल्या शहरात, आजुबाजुला पुढील प्रकारच्या गोष्टी नेहमी घडत असतात तिकडे खरच आता जाणीवपुर्वक बघणं आवश्यक झालं आहे.
 
  • लहान थोरांच्या खाण्यात येणारी जंक फूडस्.
  • रसायनांचा वापर करुन पिकवलेली फळफळावळ.
  • कोंबडीच्या पिल्लांना हार्मोंसची मात्रा देवून बारा महिन्यां ऎवजी चार महिन्यात विक्री योग्य बनवणे.      
  • रंगवलेल्या भज्या.
  • दुधातली भेसळ.
  • मॅकडोनाल्ड, केंटूकी सारख्या अमेरिकी खाद्यपदार्थ पुरवणार्‍या दुकानात होणारी गर्दी.  
ही यादी आणखीही वाढवता येईल पण महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण या चक्रामधून सुटणार कसे? अमेरिकेप्रमाणे आपल्या आजुबाजुलाही खाण्यामुळे आलेला लठ्ठपणा दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसतो. आणखी एक वाईट गोष्ट म्हणजे ते जंक फूड खाणं हे प्रतिष्टेचं मानलं जातं. ऑफिसच्या कॅंटीन मध्ये जर कुणी पोळी-भाजी खाणारा दिसला तर त्याच्याकडे कधी सुधारणार हा अशा नजरेने पाहिलं जातं. पुर्वी ऑरगॅनीक म्हणजे सेंद्रीय खतं वापरलेलेच अन्न पदार्थ, फळफळावळ, भाज्या खाणारे आपण भारतीय रसायनयुक्त शेतमालाला कधी सरावलो ते आपलं आपल्यालाच समजल नाही. फळांचा राजा हापूस, त्याची ती अप्रतीम चव आता फक्त आठवायची, त्याचा स्वाद केमिकल्सनी कधीचा नाहीसा केलाय. नुकताच बोर्डीला जावून आलो तिकडे आंबे, पपई यांची चव चाखली, स्वाद घेतला मन तृप्त झालं. ती फळ संद्रीय खतांवर वाढलेल्या झाडांना लागलेली होती आणि नैसर्गीकरीत्या पिकलेली होती. अमेरिकेला हसता ह्सता तेच दु:ख आपल्या दारीही उभं ठाकलय, जरा विचार करायला हवा.                   

18 March, 2010

जन जोडो गंगा अभियानाची यशश्वी सांगता


काहीवेळा खुप बोलण्या पेक्षा एखादी कृतीच बरच काही सांगून जाते. समर्थानी म्हटलच आहे क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. समाजकारण, राजकारण आणि पर्यावरण या बाबतीत बरच काही बोललं जातं, लिहिलं जातं पण फारशी कृती होताना दिसत नाही या पार्श्वभुमीवर गंगाजल नॅचर फाउंडेशन ची जन जोडो गंगा यात्रा आपल्याला बरच काही सांगून जाते. कोणत्याही प्रकारचा गवगवा न करता गेली कित्येक वर्षं श्री. विजय मुडशिंगीकर गंगा शुद्धीकरणाच्या ध्यासाने कार्यरत आहेत. गंगाजल हे त्यांचं प्रदर्शन मुंबई दिल्ली सारख्या मोठ्या शहरात आजपर्यंत लागलं आहे. छायाचित्रांच्या माध्यमातून गंगेसारख्या पवित्र नदीचं झालेलं ओंगळवाणं रुप जन जागृतीसाठी लोकांसमोर आणणं हा एकचं ध्यास त्यानी घेतला आहे. गंगा नदीला जर तीचं गतवैभव प्राप्तकरून द्यायचं असेल तर तीच्याकाठी असलेल्या गावा-गावात, शहरा-शहरात गेलं पाहीजे. तीथल्या जनतेला गंगेच्या शुद्धीकरणाचं महत्व पटवून दिलं पाहीजे. वरवरची मलमपट्टी करण्यापेक्षा मुळातच उपाय केला पाहीजे हे ओळखून गंगाजल नॅचर फाउंडेशन ने  जन जोडो गंगा यात्रा हे अभियान हाती घेतलं होतं.

मुडशिंगीकर यांच्याबरोबरच मुंबईतील सुरेंद्र मिश्रा, मच्छिंद्र पाटील, संतोष मरगज, माहितीपट निर्माते उन्मेश अमृते, मुंबई दूरदर्शनचे केवल नागवेकर हेही या अभियानात सहभागी झाले होते. गंगोत्री जवळील मुखवा, उत्तरकाशी, ऋषिकेश, हरिद्वार, कानपूर, अलाहाबाद,  बनारस,  पटना, कोलकाता, गंगासागर असा हा प्रदीर्घ पल्ला पार करून नुकतीच गंगासागर येथे ही यात्रा यशश्वीपणे पुर्ण झाली. सामान्य लोक, विद्यार्थी, साधू, जवान अशा अनेकांपर्यंत हा संदेश पोहोचला. एकेका ठिकाणी चार-चार दिवस थांबण्याचा स्थानिक जनतेचा आग्रह होता पण निधीअभावी तसं करणं शक्य झालं नाही. पण हाती घेतलेलं काम पुर्ण झालं, पंधरा दिवस का होईना गंगा शुद्धीकरणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवता आला. स्वर्गीय गंगा आपलं विलोभनीय रुप घेवून पृथ्वीवर आली. इथल्या मातीचं तीने सोनं केलं. जनतेची भरभराट केली. त्याच्या बदल्यात आपण मात्र तीची विटंबना केली. आतातरी जागं होवूया. पाणी आणि त्याचं महत्व यावर अजून किती कंठसोस करावा लागणार हा आजचा खरा प्रश्न आहे.      

नरेंद्र प्रभू
        


19 October, 2009

देवा याना माफ कर


आज दिवाळीचे चार दिवस संपत आले. मागे उरला फटाक्यांचा कचरा, धुर आणि काजळी, आणि हो ठाण्यात अग्नीशमन दलाच्या सात जवानांचे मृतदेह. दिवाळी पहाट सारखे स्तुत्य उपक्रम एका बाजूला आणि दुसर्‍या बाजूला गल्ली-बोळात, रस्त्या-रस्त्यावर अनिर्बंधपणे वाजवले जाणारे फटाके. हल्ली मुलांचे डॉक्टर पालकांना सांगतात चॉकलेट आइस्क्रीम तो बच्चोंका हक है त्याच चालीवर पालक मुलांबरोबर स्वतःही फटाके वाजवण्याचा हक्क बजावताना दिसले. भल्यापहाटे पासून रात्री उशीरा पर्यंत वेळेची मर्यादा ओलांडून हे बजावण चालू होतं. हे ताळतंत्र सोडून वागणं नेहमीचच झालं आहे दिवाळी फक्त निमीत्त. आता बाविस तारखेला कुणीही निवडून येवो फाटाक़्यांपासून होणारं प्रदुषण मात्र तेवढच असणार याची खात्री देतो.

हे असे विनाशकारी फटाके पर्यावरणाचं दिवाळं वाजवतातच पण चीनी बनावटीचे हे फटाके वाजवून आपणच चीनच्या अर्थव्यवस्थेला भक्कम करतो आहोत. दुसरा मुद्दा असा की नुकत्याच परतणार्‍या मांसूनने ग्लोबल वॉर्मींगचे धोके स्पष्ट केले आहेत. सिंधुदूर्ग जिल्ह्यात एका दिवसात एवढा पाऊस पडला की त्याने मागचे सर्व विक्रम मोडले. विध्वंस केला. जागतिक तपमान वाढीचा हा धोका आता आपल्या दारात नव्हे घरात आला आहे. आता घश्याचे,द्म्याचे विकार बळावतील, आवाजाचा त्रास तमाम जनतेला झाला असणारच (वाजवणार्‍यानादुद्धा होतो, ते कानात बोटं घालून वाजवतात). या सर्व गोष्टी सर्व प्रकारच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा संगितल्या जात आहेत पण....., आपण स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारून घेतली तर त्याला कोण काय करणार. आपण येवढच म्हणू शकतो, देवा याना माफ कर ते आपल्या बरोबर आमच्याही पायावर कुर्‍हाड चालवताहेत.


14 October, 2009

या नरकासूरांपासून वसूंदरेला कोण वाचवणार ?


शाळंना सुट्ट्या पडल्या आणि दिवसभर हातात पिस्तूलं घेऊन फट्... फट्... आवाज करत एकमेकांच्या मागे धावणारी मुलं दिसू लागली. जसजशी दिवाळी जवळ येईल तसतसे फटाक्यांचे आवाज वाढत जातील. करमणूकीची अनेक साधनं उपलब्ध असतानाही आणि या फटाक्यांमुळे पर्यावरणाला किती हानी पोहोचते ते माहीत असतानासुद्धा शिकलेली पालक मंडळी असं का वागतात हा खरच मोठा प्रश्न आहे. ‘फटाक्याचे तोटे’ हा प्रोजेक्ट पुर्ण करून एक अभ्यास हातावेगळा झाला म्हणून आनंदाने फटाके वाजवणारी मुलं जेव्हा मी पाहीली तेव्हा मात्र कपाळावर फटाके मारून घ्यावेसे वाटले. ‘सगळे वाजवतात, त्यात आपले’ असं म्हणून त्यात भर घालण्यापेक्षा फटाके न वाजवता प्रदूषणाला आळा घालणं किती महत्वाचं आहे हे आता तरी समजलं पाहीजे.

फटाक्यांमुळे प्रचंड प्रमाणात ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण होतं. रक्तदाब वाढणे, बहीरेपण येणे, दमा, खोकला असे विकार बळावणे, स्वसनक्रियेचे आजार होणे असे अनेक त्रास फटाक्यांमुळे उद्भवतात. आगी लागण्याचा संभव असतो. फटाक्यांच्या कारखान्यात लहानमुलं काम करतात. त्यांच्या शरिरावर फटाक्यांच्या दारूचा वाईट परीणाम होवून ती प्राणाला मुकतात. कालच मतपेट्या बंद झाल्या, दिवाळीनंतर त्या उघडतील तेव्हा निवडणूकांचा निकाल लागल्यावर राज्यकारभार हातात घेवू इच्छिणारेही फटाके लावून प्रदूषणात भर घालतील.

आपण एकच करू शकतो ‘फटाके वाजवू नका’ असं आवाहन करू शकतो.


25 September, 2009

नागडे पाय

देवाचा हप्ता या ब्लॉग पोष्ट मध्ये ‘लोक साईबाबा पुढे चप्पल काढल्यासारखं करतात पण प्रत्यक्षात बुट, चप्पल पायातच असतात’ हे माझं म्हणणं एवढ्या लवकर बुंबरँग होवून माझ्यावरच उलटेल असं मला वाटलं नव्हतं. अगदी सात दिवसात देवाने मला माझं ते विधान सपशेल मागे घ्यायला लावलं. त्याचं काय झालं महाराजा, गेले चार-पाच दिवस सकाळच्या वेळी मला एक साक्षात्कार होतोय. सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडलो की अनेक अनवाणी, नागडे पाय रस्त्यावरून चालताना दिसतात. (हो मी फक्त पायच पाहतो.) दोन दिवस दुर्लक्ष केलं पण ते तसे समोर येतच राहीले. सकाळीच नव्हे तर संध्याकाळी सुद्धा. हा काय प्रकार म्हणून बायको जवळ चौकशी केली तेव्हा उलगडा झाला. नवरात्रात हल्ली हे असं करतात. हे म्हणे व्रत आहे. नवरात्रात नऊ दिवस अनवाणी, अन्नपाण्या शिवाय रहायचं. (दिवसाच हा. रात्री खावून ‘पिवून’ नाचायचं).

वा..! मी या भक्तांचे चरण बघून धन्य झालो. कित्तेक जण तशी सवय नसल्याने असे काही चालतात की ती अजब चाल बघत रहावी. पण अशा टाचा घासून देव कसा पावणार ? (मला आणखी एका साक्षात्काराची वाट बघावी लागणार.) नऊ दिवस मोच्याचा धंदा बसणार, झालच तर त्या उघड्या पायांवर एखाद्याचा चपलेचा पाय पडणार.

(वर दिलेला फोटो हरेक्रिष्णजीच्या सौजन्याने)

नरेन्द्र प्रभू


13 August, 2009

रोगराई पसरवणारे मास्क


स्वाईन फ्लू मुळे अचानक शहरांचं चित्र बदलत चाललं आहे. अगोदर पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचार्‍यांच्या तोंडावर आणि शस्त्रक्रिया विभागात दिसणारे मास्क आता सर्रास सगळ्यांच्या तोंडावर दिसू लागले आहेत पण त्याच्या तर्‍हा तरी किती ? सर्जिकल,एन 95, साधे, थर्मल पासून हात रूमाल, ओढण्या, पदर सगळच तोंडावर आलं आहे. बरं हे सगळं तोंडावर असलं तर ठिक आहे. गळ्यात, कपाळावर, नाका खाली, हातात. मास्क ताईता सारखे जवळ असले म्हणजे झालं. ज्या रुमालाने हात फुसणार तोच तोंडावर. या सगळ्या गडबडीत जीव जंतूंचं भांडार घेऊनच आपण फिरतो आहोत याच भान नसतं. कित्तेक लोक मास्क बाजूला करुन थुंकताना दिसले, शिंकताना दिसले. हेच मास्क आता रस्त्या रस्त्यावर पडलेले आढळतात. मास्क स्वच्छ पाहिजेत, रोज बदलले पाहिजेत, ते दुसर्‍याच्या संपर्कात य्रेता कामा नयेत. थोडक्यात मास्कची काळजी घेतली तर ते आपल्या आरोग्याची काळजी घेणार. असो, सद्या शिंप्यांची दुकान तेजीत आहेत आणि साठेबाजांची चलती आहे एवढं खरं.


11 August, 2009

स्वाईन फ्लूची दहशत

देशात विशेषतः महाराष्ट्रात सध्या स्वाईन फ्लूचा धुमाकूळ चालू आहे. त्याच्या उन्माद माजवणार्‍या बातम्या प्रसारमाध्यमातून ऎकायला मिळाताहेतच पण अशा वेळी मायबाप सरकार कडून सामान्य नागरीकांची जी अपेक्षा आहे ती मात्र पुर्ण होताना दिसत नाही. दहशत मग ती २६/११ ची असो की स्वाईन फ्लूची जनता निर्नायकी असल्यासारखी आहे. ज्यांनी नेतृत्व करायच ते हात वर करून बसलेत. लोक हवालदील झाले असताना राज्याला दिशानिर्देश देणारं सरकार नाही की कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. राज्य सरकार काही निर्णय घेणार नाही, मग निर्णय कुणी घ्यायचे तर स्वयंघेषीत सुभेदारांनी, जिल्हाधिकार्‍यानी, शाळाचालकांनी, महापालिका आयुक्तांनी आणि सरते शेवटी मुलांच्या पालकांनी. आम्ही फक्त मलीदा खाणार, अर्धवट बांधकाम झालेल्या पुलांची उद्घाटन करणार, नवीन टेंडरं काढणार, स्वतःची थोबाडं असलेले बोर्ड लावून अनाहूत सल्ले देणार आणि शहर विद्रूप करणार, नवीन टोल नाके उभे करणार, भुखंड हडप करणार्‍या या डुक्करांनीच दहशतीच्या स्वाईन फ्लूची लागण व्हायला दिली आहे, जेणे करून येत्या निवडणूकीत जनतेने महागाई विसरावी, आपली शेखी मिरवण्यासाठी याना दही-हंडी, गणेशोत्सव पाहीजे. सज्जनतेचे आव आणलेली यांची कटाआऊट मोठी आणि शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक शोधावे लागतात.

या सगळ्या सावळ्यागोंधळात एकेका सुभेदाराचं फावलय. एक दादा आपल्या जिल्ह्यातली शाळा-कॉलेजं बंद ठेवतो तर शाळांचे सुभेदार मनमानी निर्णय घेताहेत. एकाच रस्त्यावरची एक शाळा बंद तर दुसरी उघडी. मेडिकलवाले दामदुप्पटीने पैसे वसुल करून मास्क विकताहेत. लोक आता स्वाईन फ्लू विसरे पर्यंत एकच मास्क लावून फिरणार त्यामुळे स्वाईन फ्लू राहिला बाजूला पण दुसर्‍याच रोगाची शिकार होणार. पण एक आशेचा किरण दिसतो आहे वसई-विरारचा धडा राजकारण्यांनी विसरू नये. तोपर्यंत असे दादा, भाई, रावजी, पंत आजुबाजुला फिरकलेच तर जरा त्यांच्या तोंडावर खोका. प्रतिक्रीया पहा.


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates