16 September, 2009

देवाचा हप्ता


अगं आज परिक्षा ना ? १०० मार्कांचा पेपर आहे देवाला नमस्कार कर..सकाळच्या घाईत धावपळ करणार्‍या एका आईची मुलीला सुचना. मुलीने देवाला राम राम केला.

देवा पुढे क्षणभर शांत उभं राहून त्याला मनोभावे नमस्कार करायला आजकाल कोणालाच वेळ नाही. पण त्याच बरोबर देवाचे आशिर्वाद मात्र पाहिजे असतात. मग काय कशासाठीना कशासाठी धावत आसलेले आपण तो उपचार आटोपून घेतो. त्याच्या तर्‍हा तरी किती. जाता जाता साईबाबाची मुर्ती दिसली की गंधाची टिकली लावल्या सारखं मधलं बोट डोक्यावर लावून दुसर्‍याच क्षणी नजर फिरवून चालू लागणं, किंवा अदाब केल्या सारखं करून त्याला दाखवून द्यायचं बघ, हा तुझ्याकडे माझं लक्ष आहे. काहीजण तर फुटपाथवर ठेवलेल्या दान पेटीत टेलिफोन बिलाचा धनादेश टाकल्या सारखे एक-दोन रूपयाचं नाणं टाकत निघून जातात. फोर्टला सी.टी.ओ. समोरच्या फुटपाथवर एका छोट्या देव्हार्‍यात साईबाबाची मुर्ती ठेवून तो देव्हारा झाडाला टांगलेला आहे. तिथे भर गर्दीत काही जण चप्पल काढल्यासारखं करून डोकं टेकून उभे असतात. त्याना धक्के देत इतर जात असतात. एक शिवी हासडून पुन्हा मन एकाग्र करण्याच्या प्रयत्नात मस्टर चुकतं. नमस्कार करणार्‍याना देऊळ सदृश काहीही दिसलं तरी ते नतमस्तक होतात. चर्चगेट जवळच्या पारशी बावडी समोरही कैकजण सिग्नल पडेपर्यंत वाकलेले मी पाहिले आहेत. शनिवारच्या दिवशी मारूतीचा वार असल्याने त्याच्या पोटावरचा शेंदुर बोटाला आणि मग डोक्याला लावणारे मारूतीरायाला आपादमस्तक न्याहाळायला विसरून गेलेले असतात.

तात्पर्य काय ‘ देव अंतरात आहे ‘ हेच आपण विसरून गेलो आहोत. ते विसरलेल्यांसाठी देऊळ निर्माण केलं गेलं, जिथे जाऊन क्षणभर शांत व्हायला आपल्याला आता वेळ नाही. कोप नको म्हणून हप्ता देणं चालू आहे. चला मला सुद्धा नेटवर virtual पुजा करूदे.


4 comments:

  1. प्रभु,
    एक छान कथा आठवली.
    एकदा विष्णुंकडे नारद गेले आणि त्यांना म्हणाले,'देवा तुमचा सर्वात लाडका भक्त क़ोण आहे?'नारद हिरमुसले;त्यांना वाटलं देव म्हणतील 'अरे वेड्या तुच तर माझा सर्वात लाडका भक्त आहेस,कारण 'नारायण नारायण ' हा तुझा जप सतत चाललेला असतो'पण तसं काहिच देव म्हणाले नाहीत.
    देव म्हणाले आधी मी सांगतो तसं कर.देवाने पाण्याने भरलेली एक कळशी नारदाच्या डोक्यावर ठेवली आणि म्हणाले आता तु आता देवळाभोवती प्रदक्षिणा कर पण अट एकच आहे की तुझ्या डोक्यावरील कळशीतून पाण्याचा एक थेंबदेखिल बाहेर पडता नये.
    झाले.नारदाने प्रदक्षिणा घालायला सुरूवात केली आणि थोड्या वेळाने घाम पुसत तो देवाकडे आला आणि म्हणाला,' देवा मी आपली आज्ञा पूर्ण केली,पाण्याचा एकही थेंब न सांडता प्रदक्षिणा पुर्ण केली.देव म्हणाले वाः नारदा ऊत्तम झाले; पण मला सांग तु माझी आज्ञा पाळत असताना किती वेळा माझे स्मरण केलेस,किती वेळा माझे नाव घेतलेस? नारद म्हणाले देवा आपल्या आज्ञेप्रमाणे पाण्याचा एकही थेंब न सांडणे आवश्यक होते त्यामुळे माझे सर्व लक्ष त्याच कामाकडॅ लागले होते म्हणुन मी आपले नाव एकदाही घेऊ शकलो नाही. मग देव म्हणाले 'आता चल भूतलावर '
    भूतलावर एका शेतात देवानी नारदाला नेलं.तिथे कडकडीत ऊन्हात एक शेतकरी आपलं शेत नांगरत होता.थोड्या वेळांने जेवण्याची वेळ झाली.थकला-भागला शेतकरी आपली न्याहारी घेऊन एका झाडाखाली बसला,त्याने प्रथम डोळे मिटून देवाचे स्मरण केले,नाव घेतले,आणि मगच तोंडात अन्नाचा घास घेतला.देव नारदाला म्हणाले तो बघ,तोच माझा सर्वात लाडका भक्त आहे.नारद म्हणाले वाः देवा मी सतत तुमचे नाव घेऊन त्रिभुवनात फिरत असतो, लोक मला दक्षिणा देतात,भोजन देतात,नमस्कार करतात आणि तरी आपण मात्र ह्या यःकिश्चित शेतकर्याला आपला लाडका भक्त म्हणता हे कसे काय? देव हसून म्हणाले, नारदा हा गरिब शेतकरी दिवसभर इतके काबाडकष्ट घेऊन आपले आणि आपल्या कुटूंबियांचे पोट भरतो.त्याच्या इतक्या कठीण आणि व्यस्त आयुष्यातही तो सकाळी कामावर जाताना,दुपारी जेवताना, आणि रात्री झोपताना माझे नित्य स्मरण करतो; तुला तर मी एक साधेसे काम सांगितले तरी तुला माझा विसर पडला,मग विचार कर नारदा जो माणुस रोजच सतत आयुष्याशी झगडत असुनही,क्षणभर तरी रोज मला स्मरतो,तो माझा सर्वात लाडका भक्त होणार नाही का??

    तर सांगायचा मुद्दा हा की ज्याला त्याला जसं जमेल तसं त्याने देवाचं स्मरण केलं तरी हरकत नाही...कुठे तरी ते भाव देवापर्यंत पोचतातच.

    आणि एक वाचक म्हणुन सुचना करतेय,आपलं लिखाण नेहेमी फक्त 'ऊत्तम ते छान ' असंच असेल असं नाही,त्यामुळे 'बरे,साधारण,सुमार दर्जाचे' हेही विकल्प असावेत जेणेकरुन वाचकांना आपले योग्य ते मत नोंदविता येईल्.

    ReplyDelete
  2. अनामिका:

    एवढे कष्ट करून ही संपुर्ण गोष्ट टाईप केली म्हणून आभारी. आपली ओळख पटली असती तर बरं झालं असतं.

    ReplyDelete
  3. thanks for considering my request of adding 2 more options for reader's reactions....I don't think those will be required to use very often though!

    I am Sonali Athle from Mumbai..there wasn't any specific reason to write as an anonymous,but I am just an ordinary individual so selected that option just for sake of convinience.

    Keep writing...whenever I feel like it,I will post my comments!

    one more thing,normally I write in devnagri script and then cut n paste in the space for comments, but somehow it's not working here today (only on your blog) hence I have to write in english;it will be nice if u could do something about it!

    Regards.

    ReplyDelete
  4. नमस्कार,

    समविचारी लोकांचं लिखाण वाचण्यात नेहमीच आनंद होतो!

    शुभकामना.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates