Showing posts with label ईशान्य वार्ता. Show all posts
Showing posts with label ईशान्य वार्ता. Show all posts

19 May, 2022

एका व्रताची सांगता

संपादक श्री.पुरुषोत्तम रानडे

एप्रिल २०२२ पासून ईशान्य वार्ताचं प्रकाशन बंद केलं असं वाचलं आणि का कोण जाणे हायसं वाटलं. घरात एकुलता एक माणूस कमावता असताना महानगर टेलिफोन निगमच्या नोकरीला रामराम करून ईशान्येकडच्या जनतेला देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी सिद्ध होणं हिच एक कर्म कठीण घटना होती. १४-१५ वर्षांपुर्वी पुरुषोत्तम रानडेंनी हे शिवधन्युष्य हाती घेतलं आणि एप्रिल २०२२ पर्यंत अव्याहतपणे ईशान्य वार्ताचं संपादन, प्रकाशन, वितरण, लेखन..... (ही यादी कितीही वाढवता येईल) हा माणूस करीत राहिला. ध्येयनिष्ठा आणि अंगचे उत्तम गुण सोडून कसलंच पाठबळ नसतना राष्ट्रधर्मासाठी सतत कार्यरत राहिलेल्या या उत्तम पुरूषाची तळमळ मी जवळून पहात होतो. एखादं मासिक वेळच्यावेळी प्रकाशित करणं या मागे किती व्याप असतात हे त्यात काम केल्याशिवाय कळणार नाही. बरं महाराष्ट्रापासून हजारोमैल दूर असलेल्या ईशान्य भारतातील सात राज्यांचा लेखाजोखा आणि वार्तांकन एवढाच या मागचा उद्देश्य नव्हता तर तिथलं समाजमन मुख्यभूमीशी जोडलं गेलं पाहिजे अशी तळमळ होती आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची तयारी रानडे सतत करीत होते.

करोनाचा भयाण काळ आला आणि सगळ्यांच्याच जगण्याला संघर्षाची धार आली आणि कदाचीत त्यातच ईशान्य वार्ताचं प्रकाशन बंद करण्याचा समयोचीत निर्णय घ्यावा लागला. शिवाय आत्ताच्या आधुनिक प्रसारमाध्यमाच्या युगात प्रिंट मिडीया मागे पडत आहेच. कुठलीही बातमी सांगितली तरी नवीन काहीतरी सांगा असा समोरच्याचा भाव असतो. ते नव्या स्वरुपात येईलही, तुर्तास छपाई बंद आहे.

मासिक छापण्याच्या ताणातून संपादक श्री.पुरुषोत्तम रानडे सध्यातरी मोकळे झाले आहेत. अपवाद सोडता सगळीच प्रसार माध्यमं नकारात्मक घटनांचा रतीब घालत असल्याने येवढं सगळंवाईट घडत असताना, हे जग चालतं तरी कसं? असा प्रश्न पडतो, तेव्हा रानडेंसारखे अनेकजण सकारात्मक कामं निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे करीत असतात म्हणून; असं त्याचं उत्तर मिळतं.  गेलं एक तप हा यज्ञ चालू होता. एवढा काळ एखादं काम सातत्याने करीत रहाणं यालाच व्रत म्हणतात, रानडेंनी या एका व्रताची नुकतीच सांगता केली म्हणायचं.  

नरेंद्र प्रभू

या विषयी आणखी वाचा:

भारत जोडो

समर्पीत पत्रकार, संपादक : पुरुषोत्तम रानडे

ईशान्य वार्ता

ईशान्य वार्ताचं दमदार पुनरागमन

मिशन मणिपूर - एकांडय़ा देशभक्ताची वीरगाथा

राष्ट्रप्रेम शिकवावं का लागतं?

 


25 January, 2020

समर्पीत पत्रकार, संपादक : पुरुषोत्तम रानडे


सुखासीन नोकरी आणि चौकटीतलं जगणं याला देश सेवेसाठी तिलांजली देणारा समर्पीत पत्रकार, इशान्य भारतातील जनता देशाच्या मुख्य भागाशी जोडण्यासाठी अविरत प्रयत्नशील असलेला सव्यसाची संपादक आणि मनमिळावू सच्चा माणूस म्हणून पत्रकार पुरुषोत्तम रानडे यांना महाराष्ट्रातील जनता गेली कित्येक वर्षं ओळखते. गेली अकरा वर्षं ईशान्य वार्ताचे संपादक पद भुषवणारे पुरुषोत्तम रानडे दर महिन्याला हा अंक प्रसिद्ध करण्यासाठी जी धडपड करीत असतात त्याला तोड नाही. ईशान्य वार्तासारखं पुर्वांचलातील राज्यांच्या समस्या, प्रश्न आणि प्रगती या विषयांना वाहिलेलं मासिक महाराष्टात तेही मराठीतून यशश्वीरित्या चालावणं हे खरोखरच मोठ्या जिकिरीचं काम आहे. संपादक पदाबरोबरच पडेल ते काम करण्याची वृती, अनेक संकटांवर जिद्दीने मात करायची हातोटी, प्रसंगानुरूप मासिकातील लेख, त्याचा दरवेळी उंचावत जाणारा दर्जा या सगळ्यासाठी सतत झटणारे रानडे साहेब ईशान्य वार्ताच्या परिवाराला आणि जवळच्या मित्रांना नवे नाहीत. यांच्या या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्याना या वर्षीचा उत्तम पत्रकारीता पुरस्कार जाहिर केला आहे, त्याबद्दल  या समर्पीत पत्रकार, संपादकाचं मनापासून अभिनंदन.

पत्रकारीता आणि माध्यमं याना लोकशाहीचा चौथा खांब म्हटलं जातं. समाजाच्या स्वास्थ्यासाठी, प्रगतीसाठी आणि उज्वल भविष्यासाठी सदैव सतर्क असणारा सच्चा पत्रकार हा खरोखरच पाशवी सत्तेलाही खाली खेचू शकतो. नमवू शकतो. पण आजच्या काळातील बहुतेक प्रत्रकारीता ही कुठलातरी अजेंडा नक्की करून, सनसनाटी बातम्या देण्याच्या अहारी जावून, देश विघातक शक्तींना मदत करताना आढळते. समाज प्रबोधन करण्यापेक्षा समाजात दरी निर्माण करण्याचं काम करते. दहशतावादी, बलात्कारी आणि देशाच्या शत्रूची बाजू लढवू पहाणार्‍या अशा लोकांना पत्रकर कसं म्हणायचं असा प्रश्न निर्माण झाला असताना पुरुषोत्तम रानडेंसारखं व्यक्तिमत्व हा एक आशेचा किरण नक्कीच आहे असं आवर्जून म्हणावसं वाटतं. महाराष्ट्र साहित्य परिषदेने जाहिर केलेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि उज्वल पत्रकारीतेसाठी मन:पुर्वक शुभेच्छा!

15 September, 2019

फुटिरतावाद्यांवर मर्मांतक प्रहार!



ईशान्य वार्ताच्या सप्टेंबर २०१९ अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख: 


 पाक अधिकृत काश्मीरवर बालाकोटपेक्षाही मोठा हल्ला होवू शकतो असं म्हणून पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी अनेकांचं पितळ उघडं पाडलं आहे. त्यात पाकचा खोटारडेपणा तर जगासमोर आलाच पण पाकधार्जिणी भाषा करणारे भारतातील तमाम मुखंड उघडे पडले आहेत. बालाकोट झालंच नाही म्हणणार्‍यांना तर आता कुठल्या बुरख्याखाली तोंड लपऊ असं होऊन गेलं आहे. इमरान खानलाही आता मोदी है तो मुमकीन है असं वाटू लागलं आहे.

कलम ३७० आणि ३५अ रद्दबातल झाल्यानंतर देश खर्‍याअर्थाने एकात्म झाला असून लडाख आणि जम्मू-काश्मीर ही दोन्ही राज्य विकासाच्यावाटेवर आता वेगाने पुढे जातील अशी आशा करायला हरकत नाही. केंद्रसरकारकडून आजपर्यंत देशातील इतर राज्यांहून चौपटी पेक्षाजास्त दरडोई निधी एकट्या जम्मू-काश्मीर राज्याला मिळत असूनही तिथली परिस्थिती हालाकीचीच होती कारण कलम ३७० आड राहून खोर्‍यातील पाकधार्जिणे राजकारणी आणि हुरीयत सारखे बोके त्या लोण्यावर तावमारत होते. निधीचा हा प्रचंड ओघ विनासाय्यास आपल्या खिशात यावा या एकाच कारणासाठी त्याना तो विशेष दर्जा हवा होता. दाराला आतून कडी घालून दार उघडत नाही म्हणून हेच लोक ओरड करत होते. मोदी सरकारने गेली पाच वर्षं या परिस्थितीवर लक्ष ठेवून योग्य वेळी मर्मावर वार केला आणि दहशतवाद, विकासाआड येणारे पाकपुरस्कृत राजकारणी आणि तथाकथीत विचारवंतांची रोजीरेटी एकाच वेळी बंद करून टाकली.  

जम्मू आणि लडाखमधल्या जनतेने गेल्या सत्तर वर्षात खुप सहन केलं. आता त्यांच्या विकासाची वाट मोकळी झाली आहे. पण काश्मीरच्याही जनतेची स्थिती फारशी वेगळी नाही, किंबहुना या दोन प्रांतांपेक्षा काकणभर जास्तच हालाकीच्या परिस्थितीत तिथली जनता आयुष्य कंठीत आहे. त्या राज्यात शेवटचा मोठा कारखाना उभारला गेला तो १९५० साली, एवढं एकच उदाहरण तिथे विकासाची सार्वत्रीक बोंब का आहे याचं उत्तर द्यायला पुरेसं आहे. हा झाला इतिहास, पण तिथली आजची स्थिती काय आहे? काश्मीर खोरं आणि लडाखच्या जनतेच्या मनात काय आहे? याला सर्वात जास्त महत्व दिलं गेलं पाहिजे. यातली लडाखी जनता कलम ३७० आणि ३५अ रद्दबातल झाल्यानंतर ज्या उत्साहाने रस्त्यावर आली आणि आपल्या पारंपारीक नृत्याविष्काराने आनंद व्यक्त केला ते पाहून त्यांच्या मनातील भाव जगासमोर आले आहेत, जम्मू प्रांतही असाच उल्हसीत झाला आहे. प्रश्न उरतो तो काश्मीर खोर्‍यातील जनतेचा, त्यांच्या मनात काय आहे?

गेली बारा-तेरा वर्ष सातत्याने श्रीनगर आणि लडाखला भेट देत असताना मला तिथल्या परिस्थितीत होणारा फरक प्रकर्षाने जाणवला. विशेषत: गेल्या पाच वर्षात खोर्‍यातली जनता रोजच्या बंद आणि मोर्चांना कंटाळली हे ध्यानात येत होतंच. इंडीयामे यह होगा म्हणणारे आता आपण मिळून हे केलं पाहिजे इथपर्यंत आलेले आहेत. तरूण पिढीला दारीद्र्य झुगारून देऊन विकासाच्या वाटेवर वेगाने जायचं आहे. २००७ साली मोठ्या मुश्किलीने सेवा देणारे ड्रायव्हरच आज सलाम करून गाडीचं दार उघडत आहेत. हॉटेल मालक मुंबई महाराष्ट्रामधून येणार्‍या  पर्यटकांच्या सेवेला तत्पर आहेत आणि मुख्य म्हणजे ही गोष्ट ते मनापासून करायला पुढे येत आहे. काल वडीलांच्यामागून येणारा मुलगा आज पुढे आहे आणि वडील मागून येत आहेत. श्रीनगर शहरात अशी स्थिती असली तरी त्याच्या अगदी बाजूला असलेल्या खेड्यात किंवा सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगामसारख्या पर्यटन क्षेत्रात अद्याप हालाकीचीच परिस्थीती आहे. आता कलम ३७० रद्दझाल्यावर त्यांच्याच जीवनमानात नेमका काय फरक पडणार आहे? तर:  

  • जम्मू-काश्मीरच्या विकासाच्या मार्गातील अडथळा आता दूर झाला आहे.
  • १९४७ साली पाकमधून जम्मू-काशिरमध्ये आलेल्या हिंदूंनाही आता लोकसभेप्रमाणे राज्य विधनसभेसाठी मतदान करता येईल.
  • कागदावर असलेल्या अनेक योजना आता प्रत्यक्षात उतरताना दिसतील.
  • देश-विदेशतील कंपन्यां काश्मीरमध्ये गुंतवणूकीचा विचार करतील. टेक्नोलॉजीमुळे काश्मिरी जनतेचे जीवन अधिक सुसहय होईल. ऑक्टोबर २०१९ मध्ये श्रीनगरला होणारा उद्योजकांचा मेळावा ही नव्या युगाची सुरूवात असेल.
  • परिस्थिती सामान्य झाली तर काश्मीरमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होईल. यामुळे रोजगार वाढेल.
  • कलम ३७० हटवल्यानंतर नवे सदस्य पंचायत व्यवस्थेत काम करताना कमाल करुन दाखवतील.
  • नव्या व्यवस्थेत पोलिसांसह राज्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना अन्य राज्यांसारख्या सुविधा आणि भत्ते देण्यात येतील.
  • काश्मीर आणि लडाखमध्ये रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया लगेच सुरु होईल. ज्यामुळे युवकांना रोजगार मिळेल.
  • मुख्य म्हणजे कलम ३७० आणि ३५अ रद्दझाल्यावर काश्मीर खोर्‍यातली स्थिती वेगाने सामान्य होत असून हा लेख लिहून होईपर्यंत जीवित किंवा वित्त हानीची बातमी खोर्‍यामधून आलेली नाही, हे चित्र आश्वासक आहे.        
२०१९ च्या ऑगस्टमध्ये आणखी एक क्रांती झाली असून आपला खंडाप्राय असा बलशाली भारत देश खंडीत असल्यासारखा भासत होता, कलम ३७० हटवल्यावर त्या दुखर्‍या जखमेवर मलमपट्टी लावली गेली आहे. लवकरच भारताचं अभिन्न अंग असलेली जम्मू-काशीर आणि लडाख ही राज्यही विकासाच्या वाटेवर अग्रेसर होतील यात शंका नाही. १५ ऑगष्ट २०१९ चा स्वातंत्र्यदिन लेहच्या पोलो ग्राऊंड वर ज्या उत्साहात साजरा झाला त्याला तोड नाही.  

अखंड झाली आता
बलशाली भारतमाता
करु शर्थ न्यायला पुढती
जग ज्याची गाईल महती        
 

पंतप्रधान नरेंद मोदी यांचे आभार प्रगट करणारे असे अनेक बॅनर लडाखमध्ये ठिकठीकाणी लागले आहेत.





  
ईशा टुर्सचे संचालक आत्माराम परब आणि स्मिता रेगे यांनी लडाखचे खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांची लेह इथे भेट घेऊन लडाखमधील पर्यटनाविषयी आपला सकारात्मक दृष्टीकोन 
विषद केला.
  
कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला जे संबोधित केलं त्यात “जम्मू-काश्मीरमध्ये सर्वोत्तम टुरिस्ट डेस्टिनेशन बनण्याची क्षमता आहे. मला यासाठी देशवासियाच्या सहकार्याची आवश्यकता आहे” असं म्हटलं होतं. सांगायला आनंद वाटतो की श्रीनगर खोर्‍यात जमावबंदी असताना आणि तिकडे जाणार्‍या वाटा रोखल्यागेल्या असताना ईशा टुर्सने पंधरा दिवसात तिनशेहून जास्त पर्यटक लडाखला नेले आणि अशा कठिण काळातही घेतलेला वसा तसाच चालू ठेवला. यासाठी ईशा टुर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आत्माराम परब आणि त्यांचे सहकारी अभिनंदनास नक्कीच पात्र आहेत.   

मागील काही महिन्यात लष्कराने काश्मिरातील अतिरेक व जिहादचा कणा मोडून काढला आहे. एकामागून एक पाकचे दलाल-हस्तक मारून टाकण्याचा सपाटा लावला आहे. त्यांना पैसा पुरवणारे हुर्रीयत वा तत्सम दलाल शोधून त्यांच्या भानगडी चव्हाट्यावर आणायची मोहिम तपास यंत्रणांनी जोमाने राबवली आहे. या संयुक्त मोहिम व कारवायांनी जिहादचे व फ़ुटीरवादाचे पेकाट मोडलेले आहे. अशा प्रत्येक वेळी हे तथाकथित काश्मिरी नेते ३७० आणि ३५-ए कलमाच्या आश्रयाला जात असत. ही कलमे आपल्याला भारताचे बांधील बनवत नाहीत आणि स्वायत्तता देतात; असा त्यांचा कायमचा युक्तीवाद असे. अशा फ़ुटीरवादी बदमाशांचे भारतीय दलाल नेहमी भारताने दिलेल्या आश्वासनाचा हवाला देऊन ३७० कलम संपुष्टात आणण्याला विश्वासघात ठरवण्यात पुढाकार घेत आहेत. पण त्या प्रचारामुळे जनतेमध्ये मोठा गैरसमज होऊन बसलेला आहे. ही दोन्ही कलमे भारतीय राज्यघटनेचे कायमचे अंग नाही. तात्कालीन सोय वा तरतुद असेच त्याचे स्वरूप राहिलेले आहे. त्यात पुन्हा ३७० कलम हे संस्थाने खालसा करून तो प्रदेश भारताच्या संघराज्याशी जोडण्याशी संबंधित आहे. निजामाचे हैद्राबाद संस्थान वा अन्य राज्ये जशी भारतामध्ये विलीन करून घेण्यात आली, तसेच ते कलम जम्मू काश्मिरला लागू होत असते. त्यामुळे काश्मिरला कुठलाही विशेष दर्जा मिळालेला नाही. ३७० या कलमाला जोडून ३५-ए हे कलम घटनेच्या परिशिष्टामध्ये नंतर घालण्यात आले. तेही घटनासमिती वा भारतीय संसदेने चर्चा करून समाविष्ट केलेले नाही. ३५-ए कलम राज्यघटनेच ३५ या क्रमाकानंतर आढळणार नाही. कारण ते घटनेत नसून परिशिष्टात आहे.

३७० व ३५-ए अशा कलमांचा बागुलबुवा करून नेहमीच काश्मिरी वेगळेपणा जपण्याचा प्रयास तिथल्या फ़ुटीरवादी  व दिल्लीतल्या तथाकथीत उदारमतवादी गटाने केलेला होता. त्यामुळे़ परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. कारण या कलमांचा व तरतुदींचा आडोसा घेऊन इथे फ़ुटीरवाद माजवला गेलेला आहे. आता काश्मीर समस्येची दुबळी बाजू शोधून त्यावर सरकारने नेमका आघात केला आहे. म्हणूनच मोदी सरकार अभिनंदनास पात्र आहे. सरकार स्थापन झाल्यापासून ७० दिवसातच या सरकारने निवडणूकीत दिलेली आश्वासनं पूर्ण केल्याचा हा पुरावा आहे.  

लडाख प्रांताचा जम्मू-काश्मीर राज्यात समावेष केल्यापासूनच वेगळ्या केंद्रशाशीत प्रदेशाची मागणी होती. गेल्या ७०-७२ वर्षांपासून ही मागणी प्रलंबीत होती. २०११ पासून तर लडाख अ‍ॅटोनॉमस हिल कौसिलने जम्मू-काश्मीर राज्याचा ध्वज वापरायला नकार दिला होता. गेली सत्तर वर्षं काश्मीर खोर्‍यातील राजकारणी आणि विघटनवादी प्रवृत्तींनी लडाखला एकटं पाडलं होतं, एवढंच नव्हे तर त्यांच्या विकासाला खिळ घातली होती. सोशीक लडाखी जनतेने हे अत्याचार आजपर्यंत सहन केले. पण मतपेटीच्या राजकारणात दिल्लीतील तत्कालीन केंद्र सरकार त्यांच्या वेदनेकडे लक्ष द्यायला तर तयार नव्हतंच पण अलगाववादी ताकदींना आणखी बळ देत होतं. भौगोलिक, सांस्कृतीक, ऐतिहासीकदृष्ट्या काश्मीरपासून वेगळा असलेला हा प्रांत काश्मीरी राजकारणात विनाकारण ओढला गेला होता आणि प्रगतीपासून वंचीत राहिला होता. लडाखी मुलांना त्यांच्या व्यवहारात नसलेली उर्दू भाषा शाळेत सक्तीने शिकावी लागत होती. लडाखचे तरुण तडफदार खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांनी लोकसभेत भाषण करताना ही व्यथा बोलून दाखवली होती. सत्तर वर्षात प्रथमच लडाखचा आवाज संसदेत बुलंद झाला. पाकधार्जीण्या आणि देशविरोधी आवाजाला प्रथमच एवढ्या जबरदस्तपणे खडसावलं गेलं आणि  पुरोगामीत्वाच्या आड लपलेल्या प्रवृत्तींचा बुरखा टराटर फाडला गेला.                      
इथल्या देशभक्त जनतेने कारगील युद्धात भारतीय सैनिकांच्या खांद्याला खांदा लाऊन पाक विरुद्धच्या लढायीत भाग घेतला होता. अशीही जनता आता मुख्य प्रवाहात सामिल होत असून त्याचा आनंद लडाखच्या सर्वच भागात पहायला मिळत आहे. आता कलम ३७० आणि ३५अ रद्दझाल्यावर लडाखची जनता खर्‍या अर्थाने स्वतंत्र झाली असून मोकळा श्वास घेत आहे. लवकरच हा केंद्रशाशीत प्रदेश विकासाच्या वाटेवर अग्रेसर होईल यात शंका नाही.
 
तुरतूक, एलओसी पासून अवघ्या शंभर-दिडशे मिटरवर असलेलं गाव. या गावचा तरुण हुसेन बेग़ मला लेहमध्ये भेटला. तुरतूकला भेट द्या असं त्याचं म्हणणं होतं. बोलता बोलता भारतीय सैन्याचा विषय निघाला तेव्हा तो उल्हसीत होऊन म्हणाला “उनके साथ तो हमारा पक्का रिश्ता है।“ तीन महिन्यांचा मौसम सोडला तर इतर वेळी तो भारतीय सैन्यासाठी पोर्टरचं काम करतो. त्याला महिना २५ हजार कमाई होतेच पण, “हमारा गधा भी इंडीयन आर्मीसे महिना १५ हजार रुपया कमाता है। हमारे लडके भी आर्मी के बनाये स्कुलमे पढते है।“ असं तो सांगत होता. पासष्ट्च्या लढाईत त्याचं गाव पाक अधीकृत काश्मीरमधून  भारतात सामिल करून घेतलं गेलं.              
लडाखच्या नुब्रा व्हालीपासून ८३ किमीवर असलेल्या या खेड्यात २०१६ पासून सरकारने सामान्य पर्यटकांना प्रवेश द्यायला सुरुवात केली. त्या आधी नुब्रा व्हालीतल्या हुंडरपर्यंतच जाता येत असे. आताही जेमतेम तीन महिने तुरतूकमध्ये मोजकेच पर्यटक भेट देत असातात.



ईशान्य वार्ताच्या सप्टेंबर २०१९ अंकात लडाख: Show Must Go On या पोस्ट्लाही प्रसिद्धी देण्यात आली आहे. http://prabhunarendra.blogspot.com/2019/08/show-must-go-on.html

28 January, 2017

त्याना आपलं म्हणा




ईशान्य वार्ता’ जानेवारी १७ च्या अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख 

‘ईशान्य वार्ता’चा दिवाळी अंक नागालॅन्डचे राज्यपाल मा. श्री. पद्मनाभ आचार्य यांना भेट
 देताना आत्माराम परब आणि नरेंद्र प्रभू  
या वेळचा पुर्वांचलच्या आसाम, मेघालय आणि नागालॅन्डचा दौरा खासच होता. नागालॅन्डमध्ये साजरा होणारा ‘हॉर्नबील फेस्टीव्हल’ हे प्रमूख आकर्षण होतं. नागालॅन्डची राजधानी कोहीमापासून १२ कि.मी.वर असलेल्या किसामा गावात डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार्‍या या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला नागालॅन्डचे राज्यपाल मा. श्री. पद्मनाभ आचार्य यांचे पाहुणे म्हणून आम्ही उपस्थित होतो. नागालॅन्डच्या १७ जनजातींच्या नृत्याचे रंगारंग अविष्कार पाहताना भान हरपून गेलं. या कार्यक्रमाला शेजारील आसाम राज्याचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री मा. श्री. सर्वानंद सोनोवालही त्यांच्या राज्यातील बिहू सारखे अनेक नृत्य प्रकार सादर करणारं कला पथक घेऊन उपस्थित होते. नागालॅन्ड आणि आसाम या राज्यातील जनता विधायक कामाकरीता एकत्र येऊ शकते हे दर्शवणारी ही घटना गत काळातील अनेक जखमांवर नक्कीच फुंकर घालणारी होती.  
हॉर्नबील फेस्टीव्हल

‘हॉर्नबील फेस्टीव्हल’ या शासकीय कार्यक्रमाची सुरूवात उंगमा गावचे गुरूं (Guru Sangyusang Pongener of Ungma Village) यांनी पारंपारीक आशिर्वादाने केली तर रेव्ह. मोअ लोंगचारी या बाप्तीस चर्चच्या धर्मगुरूंनी धार्मिक प्रार्थना म्हटली. या नंतर तो कार्यक्रम खर्‍या अर्थाने शासकिय स्वरूपात सुरू झाला. नागालॅन्डचे मुख्यमंत्री टि.आर. झेलियांग यानी उद्घाटनपर भाषण केलं. इतर ठिकाणी अशा शासकिय कार्यक्रमाची सुरूवात यजमानाच्या भाषणाने झाली असती. इथल्या कार्यक्रमाचं हे एक वैशीष्ट्य म्हणता येईल. या एकाच गोष्टीवरून या उत्तर-पुर्वेकडच्या राज्यातील सामाजिक जाणिवा आणि समाजमनावर जमात आणि धर्माचा पगडा किती घट्ट आहे याची प्रचिती आली. असं असलं तरी शासकिय कार्यक्रमात असलेला त्यांचा सहभाग, शेजारील राज्याशी होऊ घातलेलं सौहाद्रपुर्ण सहचर्य आणि भारताशी भारतीय म्हणून निर्माण होणारी आपुलकीची भावना या गोष्टी खुप महत्वाच्या होत्या.

नागालॅन्डचे राज्यपाल मा. श्री. पद्मनाभ आचार्य यांना अभिवादन करताना ईशा टूर्सचे संचालक
 श्री. आत्माराम परब. 
मुख्य भूमीपेक्षा साधारण दिड तास आधीच होणारा सुर्यास्त जसा काळोखाचं साम्राज्य घेऊन येतो तशी तिथली वाहतूक मंदावत जाते आणि बाजारपेठाही बंद होतात, मात्र ‘हॉर्नबील फेस्टीव्हल’चे दिवस याला अपवाद होते. कोहिमाच्या बाजारात रात्रीच्या वेळी रस्त्यावर साजरा होणारा कार्निव्हल माहिमच्या जत्रेची आठवण करून देत होता. अनेक खाद्य पदार्थ, रंगी-बेरंगी वस्त्र प्रावरणं, इलेक्ट्रॉनीक सामान, मास्क अशा गोष्टींनी रस्ता भरला होता. भितीचं नामोनिशाण नसलेल्या या गर्दीत आम्हीही सामिल झालो होतो. कोहिमामधली गर्दी भारतातल्या कुठल्याही खुशालचेंडू शहरासारखीच भासत होती, पण हाही एक ‘इंडीया’ होता. दिमापूर, कोहीमा सारखी शहरं सोडली तर इतर भाग म्हणजे जिथे विकासाचा सुर्य अजून उगवायचा आहे अशी खेडी होत. तिथे त्या खर्‍या भारतात आजही विकासाची गंगा पोहोचलेली नाही. हॉर्नबील फेस्टीव्हलमध्येच भेटलेल्या सातार्‍याच्या डॉ. पाटील हेच सांगत होत्या. नागालॅन्डचे लोकाभिमूख राज्यपाल मा. श्री. पद्मनाभ आचार्य यांनी तिथे कार्यभार सांभाळल्या दिवसापासून महाराष्ट्रातील जनता आणि नागालॅन्डमध्ये सामाजिक कार्याचा एक पुल बांधायला सुरूवात केली आहे. डॉ. पाटील आणि त्यांच्या सोबत महाराष्ट्रामधून गेलेले ४५ डॉक्टर आठ दिवस नागालॅन्ड मधल्या ११ जिल्ह्यातील दुर्गम भागात जाऊन वैद्यकिय सेवा देत होते. हॉर्नबील फेस्टीव्हलचा उद्घाटनाचा दिवस हा त्यांच्यासाठी तिथला समारोपाचा दिवस होता.

गेल्या आठ दिवसात महाराष्ट्रामधून आलेल्या डॉक्टरनी किती मोलाची सेवा केली त्याचं वर्णन महामहीम राज्यपाल राजभवनावर त्यांची भेट घेतली तेव्हा आम्हाला विशद करून सांगत होते. या डॉक्टरनी जरी गाडी किंवा जीपमधून प्रवास केला असला तरी तो घोड्यावरून केल्यासारखा कठीण होता. जिथे रस्ते म्हणजे एक पायवाटच आहे, तिथल्या जनतेने अजून पक्के रस्ते पाहिले नाहीत, जिथे प्रथमोपचाराचीही सोय नाही अशा नागालॅन्डच्या दुर्गम खेड्यात जावून डॉक्टरनी जी सेवा दिली तशी सेवा प्रत्येकानी यथाशक्ती दिली पाहिजे म्हणजे तिथले लोक आपसूकच भारताशी बांधले जातील असं राज्यपालांचं म्हणणं होतं. शिक्षक, व्यापारी, कारखानदार, व्यावसायीक अशा अनेक थरामधील भारताच्या मुख्यभूमीवरील व्यक्ती हे कार्य करू शकते आणि त्याने ते करावं असं राज्यपाल मा. श्री. पद्मनाभ आचार्य यांचं म्हणणं होतं. इथल्या लोकांना भिक नको, त्याना बरोबरीची आणि सन्मानाची वागणूक हवी आहे. ‘त्याना आपलं म्हणा’ हीच काळाची गरज आहे. पुर्वांचलाची मागणी आहे. आम्हाला ते म्हणणं मनोमन पटलं होतं, अंतरमूख होवून आम्ही राजभवनाचा निरोप घेतला.

राजभवन भेटीच्या सुखद आठवणी मनात रेंगाळत असताना दुसर्‍याच दिवशी आसाममध्ये एक बाका प्रसंग उभा राहिला आणि भर दुपारी आम्ही गारठून गेलो होतो. नेमकं त्या वेळी राज्यपालांचं ते म्हणणं आठवून, राजभवनाच्या उबदार वातावरणात हे बोलायला ठिक आहे पण इथली जनता त्या लायकीची आहे काय? असा टोकाचा विचार मी  करू लागलो. त्याचं झालं असं: काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात जीप सफारीचा आनंद लुटण्यासाठी आम्ही आमच्या आरामदायी रिसॉर्ट मधून निघालो होतो. गावातल्या कच्च्या रस्त्यावरून आमच्या गृपच्या दोन गाड्यांपैकी एक गाडी पुढे निघून गेली होती. मागावून निघालेल्या दुसर्‍या गाडीच्या पुढच्या सिटवर बसून मी निसर्ग सौदर्याचा आनंद घेत होतो. समोर रस्त्याच्या मधोमध बकरीची दोन कोकरं पहूडली होती. चालकाने मोठमोठ्याने हॉर्न वाजवूनही ती हलायला तयार नव्हती. खाली उतरून त्याना बाजूला करू का? अशा प्रश्नाला चालकाने नकारार्थी मान हलवली. बाजूलाच चार-पाच आदिवासी मुलं खेळत होती. त्यांच्याशी आसामी भाषेत बोलून चालकाने त्या कोकरांना बाजूला करायला सांगितलं, पण काय झालं कोण जाणे, त्या मुलांनी जोरजोरात हाका मारून गाव जमा केला. दहा-बारा लोकुरवाळ्या बाया, आणखीन  मुलं, बापे असे पंचवीस-तीस लोक अचानक गाडी समोर येवून भांडू लागले. हॉटेलवाल्याचा उद्धार सुरू झाला. त्या कोकरापैकी एकाच्या पायाला जखम झाली होती. ती आमच्या गाडीमुळे झाली असून भरपायी दिल्याशिवाय गाडी जावू देणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्या कोकरांपासून किमान दहा फुटांवर आमची गाडी उभी होती आणि एवढ्या अंतरावरून त्याना जखम होणं अशक्य होतं. आमचा चालक तेच पुन्हापुन्हा सांगत होता, चालकाने समजावण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. मी समजावू का म्हणून विचारलं तर चालक नको म्हणाला. मी पुढच्या गाडीत फोन करून सदर घटना सांगितली. तडजोडीचे प्रयत्न करूनही काही मार्ग निघेना. जीप सफारीची वेळ निघून चालली होती. गाडीतली मंडळी वैतागली, रक्त सळसळू लागलं. “ही आदिवासी मंडळी असाच कांगावा करतात, जखमी कोकरू मुद्दामहून भर रस्त्यात ठेवून पैसे वसूल करण्याची ही पद्धत आहे. अशा गोष्टींना आम्ही का बळी पडायचं.” असं तावातावाने बोललं जात होतं. चालकाचा सय्यम सुटला आणि त्याने गाडी सुरू केली आणि गर्दी मधून पुढे न्यायला सुरूवात केली. तेव्हढ्यात एक इसम भला मोठा बांबू घेऊन गाडीची काच फोडायला पुढे सरसावला. चालकाने नमतं घेतलं. आम्ही हताश होवून बसलो असतानाच पुढे निघून गेलेली गाडी माघारी आली. त्या गाडीचा चालक खाली उतरला बाचाबाची सुरू झाली. त्याने आपली गाडी तिथे ठेवून आमची गाडी पुढे पाठवली. थोड्यावेळाने ती गाडीही जीप सफारीसाठी गेटवर आली आणि मी निश्वास सोडला.

जीप सफारीत काझीरंगा ज्याच्यासाठी ओळखलं जातं तो एक शिंगी गेंडा अगदी जवळून दिसत असतानाही मला ती कोकरं सारखी डोळ्यापुढे येत होती. हे लोक असं का वागतात? पर्यटकांना घेऊन एवढ्या दुरवर यायचं आणि असा अनुभव आल्यावर याना मदत तर सोडाच,  पण इथे कोण कशाला येईल? कालची राज्यपालांची भेट झाल्याला अजून चौवीस तासही झाले नव्हते. त्यांना आमचं दु:ख कसं कळणार......? सुर्य मावळतीला गेला आणि एक काळा अध्याय संपला म्हणून मी हॉटेल मधल्या खोलीत गेलो. मित्र कौस्तूभ पुढच्या गाडीत होता. त्याच्याजवळ खंत व्यक्त करीत असताना त्याने सांगितलेल्या गोष्टीने मी माझे डोळे उघडले, सुर्यास्तानंतर प्रकाश पडला. मी समजत होते त्याहून गोष्ट अगदी उलटी होती. माझ्या गाडी आधी पुढे गेलेल्या आमच्याच गृपच्या गाडीच्या मागच्या चाकानेच त्या कोकराला जखमी केलं होतं. त्या आदिवासिंचं म्हणणं रास्त होतं. मागाहून आमची गाडी नसती तर त्याना कसलीच नुकसान भरपायी मिळाली नसती. पुढे गेलेली गाडी आमची नसती तर फार मोठा गैरसमज घेऊन आम्ही पुर्वांचल सोडलं असतं.

प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते. ती समजली नाही तर गैरसमज हा ठरलेला. पुर्वांचलाबाबत एक अढी मनात कायमची घर करून राहीली असती. बकरीची कोकरं बोलणार नाहीत, संवाद आपणच साधायला हवा.


नरेंद्र प्रभू
सांताकृझ, मुंबई

                          

                                              

22 November, 2016

सर्जिकल ऑपरेशन आणि पुरोगामी दहशतवाद


ईशान्य वार्ता दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख 


जून २०१५ मध्ये भारतीय सेनेने म्यानमारच्या सीमेत घुसून १५८ दहशतवाद्याना ठार मारलं होतं. त्या आधी दहशतवाद्यानी घडवून आणलेल्या घातपाती कारवायात भारतीय लष्कराचे अठरा जवान कामी आले होते. सीमेवरच्या राज्यात अशा प्रकारचे हल्ले करून शेजारच्या देशात आश्रय घ्यायचा ही दहशतवाद्याची नेहमीचीच चलाखी. असे हल्ले वर्षोंवर्ष होत असूनही राजकिय इच्छाशक्तीच्या अभावी त्याचा चोख बंदोवस्त होत नव्हता. राजकिय निर्णयाचा अभाव असल्याने सेनादलाचे हात बांधलेले असायचे. केंद्रीय सरकारमध्ये सत्तापालट झाल्यावर मोदी सरकारने ‘ऍक्ट इस्ट’, ‘मेक इन इंडीया’ सारखी धोरणं आखून या प्रकारच्या कारावायांवर सर्वंकश नियंत्रण मिळवण्याचा तसंच समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न चालवला आहे.

दहशतवाद ही आता संपुर्ण जगाची समस्या असून त्याला कोणताही देश अपवाद नाही. या विरोधात उपाययोजना करायची असेल तर जागतीक नेत्यांचं एकमत होणं जरुरीचं आहे. गेल्या दोन वर्षात दिवसरात्र एक करून पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जगभरातील अनेक देशाचे दौरे केले आणि भारताचे हितसंबंध जपण्यांचं आणि त्यात वाढ करण्याचं महत्वाचं काम केलं. दहशतवादाचा मुकाबला करणं हासुद्धा त्या रणनितीचा एक भाग होता. आसामसारख्या राज्यात त्यानंतरच सत्ता परिवर्तन झालं. केंद्र सरकारच्या कृतीला जनतेचा पाठिंबा मिळाला.

देशाच्या पूर्व सीमेवर अशा प्रकारची कारवायी होत होती तोपर्यंत त्यावर देशभरातून फार मोठी प्रतिक्रिया येत नव्हती पण पाकिस्तानच्या सीमेत घूसून ‘सर्जिकल ऑपरेशन’ करून  दहशतवादी आणि त्याच बरोबर पाक सैनिकांना कंठस्नान घतल्यावर मात्र पाकिस्तानचे इथले हस्तक किंवा पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरलेले लोक संभ्रम निर्माण व्हावा अशी वक्तव्य करायला लागले आहेत. आजपर्यंत भारतीय सेनेवर देशातून असा संशय व्यक्त केला गेला नव्हता. लष्कराने केलेल्या कारवाईचे पुरावे मागितले गेले नव्हते मग आत्ताच ते का मागण्यात येत आहेत? पाकिस्तानचे भारतातले हे ‘डीप असेट्स’ खाल्ल्या अन्नाला जागत आहे काय? की जनता मोदींना डोक्यावर घेऊन नाचेल म्हणून भयभित झाले आहेत? मोदींना विरोध करायचा म्हणून ही पुरोगामी मंडळी आता थेट पाकिस्तानच्या सुरात सूर मिळवू लागली आहेत. या पैकी अनेकजण या पुर्वीच्या सरकाराचा भाग होते, कित्येकजण पत्रकार बनून अपप्रचार करीत आहेत, परकिय पैशावर पाळल्यागेलेल्या एनजीओचाही त्यात सक्रिय सहभाग दिसतो आहे.

ही मंडळी काय करतात तर ‘भारत तेरे टुकडे होंगे, इन्शाअल्ला... इन्शाअल्ला...’ असे नारे देणार्‍याला डोक्यावर घेऊन नाचतात, त्याची भलामण करतात. आम्हीपण सर्जिकल स्ट्राईक केले होते पण त्याचा गवगवा केला नाही असा तद्दन खोटा दावा करतात, औरंगजेबाला सुफी संताचा दर्जा द्यावा आणि त्याच्या विरोधातली सगळी विधानं पाठ्यपुस्तकामधून काढून टाकावित म्हणून उपोषणाला बसतात. (मग शंभूराज्याना कुणी मरलं? असा प्रश्न त्याना विचारायचा नसतो.) पाकिस्तानच्या टिव्ही वाहिन्यावरच्या चर्चेमध्ये भाग घेऊन मोदी सत्तेत असे पर्यंत भारत-पाक चर्चा होऊ शकणार नाही, त्यासाठी त्याना सत्ताभ्रष्ट करावं लागेल आणि पकिस्तानने या कामी आपल्याला मदत करावी म्हणून आर्जवं करतात. पाकिस्तानी कलाकारांचा कैवार घेऊन  दहशतवाद आणि कला या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणून बुद्धीभेद करतात. पाकिस्तानी सामान्य जनता आणि कलाकार किती महान आहेत याचे दाखले द्यायची अहमहमिका लागते. या कलाकारांच्या नांगीत किती विष भरलेलं असतं त्याची वानगीदाखल ही एकच गोष्ट लक्षात ठेवली तरी दृष्टी साफ होईल. जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेली हकिकत त्या पाकिस्तानी कलाकारांविषयी सगळं सांगून जाते. ती गोष्ट अशी:

जगजितसिंग या गझल गायकाच्या पुण्यतिथी निमीत्त गुलाम अली या पाकिस्तानी गायकाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खुद्द जगजितसिंग यांनीच आपल्या हयातीत पाकिस्तानी कलावतांना इथे आणू नये, असा आग्रह धरला होता. त्याचे कारण पाक कलावंत पक्के भारतद्वेषी असतात, असाच त्यांचा आरोप होता. किंबहूना त्याच कारणास्तव गुलाम अली याच्यावर भारतात यायला प्रतिबंध लागू झाला होता. ही माहिती आपल्यापर्यंत माध्यमांनी कशाला पोहोचवू नये? गुलाम अली याच्याविषयी किती सत्य आपल्यासमोर आणले गेले? एकदा भारतातून मायदेशी परत जाणारा हा गुलाम अली शेजारी बसलेल्या भारतीय दूतावासातील अधिकार्‍याशी गप्पा मारू लागला. तो अधिकारीही त्या गायकाचा चहाताच होता. मात्र हा प्रवासी भारतीय आहे याची गुलाम अलीला किंचितही कल्पना नव्हती, म्हणून तो मनमोकळा बोलत होता. अगदी खास पंजाबी भाषेत त्याने भारतीयांची काफ़ीर कुत्ते अशी अवहेलना चालवली होती. आपण सच्चे मोमीन म्हणजे मुस्लिम असल्याने काफ़ीरांचे पैसे, बायकांची मजा लुटतो, असे गुलाम अलीने मन मोकळे केले. मात्र इस्लामाबाद विमानतळावर उतरल्यावर त्या अधिकार्‍याने आपली खरी ओळख या गायकाला करून दिली. तेव्हा गुलाम अली गयावया करून माफ़ी मागू लागला. कारण शेजारचा प्रवासी पाकिस्तानी आहे अशा विश्वासाने त्याने मनमोकळे केले होते. पण त्यातून संभवणारा तोटा लक्षात आल्यावर गुलाम अली गांगरला होता. अर्थात अधिकार्‍याने त्याला दमदाटी वगैरे काही केली नाही. पण भारत सरकारला त्याविषयी माहिती दिल्यावर गुलाम अलीच्या भारतात येण्यावर वा कार्यक्रम करण्यवर प्रतिबंध लावण्यात आला. त्याचा फ़ारसा कुठे गाजावाजा झाला नाही. पण अनेक वर्षे हा प्रतिबंध कायम होता.

हा पाकिस्तानचा खरा चेहरा आहे. भारताशी प्रत्यक्ष युद्ध करून यश मिळवता येणार नाही याची पक्की खात्री असणार्‍या पाकिस्तानने वर्षानुवर्ष डावपेच आखून आपली माणसं भारतात पेरली आहेत. ते पाकिस्तानी हस्तक अतिशय मोक्याच्या जागा धरून बसलेत किंवा मोक्याच्या जागी बसलेल्यांनाच शत्रू त्याचे हस्तक म्हणून निवडत व नेमत आला आहे. त्यात बुद्धीजिवी, प्राध्यापक, कलावंत, पत्रकार, अधिकारी,राजकारणी अशा विविध पेशातील मंडळींची निवड होत असते. त्यांनी आपली बुद्धी समाजाच्या बुद्धीभेदासाठी पणाला लावावी, अशी कामगिरी त्यांच्यावर सोपवलेली असते. हेच ते घरभेदी तत्कालिन लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांना दिर्घकाळ माध्यमातून लक्ष्य करीत होते. सिंग यांच्या कालावधीमध्ये काश्मिरात लष्कराने मोठे यश मिळवलेले होते आणि अनेक जिहादी दहशतवादी उचापती सोडून मुख्यप्रवाहात येण्य़ाची प्रक्रिया सुरू झालेली होती. तिलाच शह देण्यासाठी लष्कर दिल्लीवर चाल करून येणार होतं अशा अफ़वा पिकवण्यात आल्या होत्या. दहशतवादाला वेसण घालणारी सिंग यांची मोहिम हाणून पाडण्यासाठीचे हे काहूर पद्धतशीरपणे माजवण्यात आलं होतं. देशामध्ये लष्करी उठाव होणार असल्याची अफ़वा पाकिस्तानने फ़ैलावलेली नव्हती तर इथल्या माध्यमवीरांनी आणि पत्रकारांनी ती तिखटमिठ लाऊन जनतेसमोर आणली होती. आता तीच मंडळी भारताचे लष्करी कारवाईप्रमुख लेफ़्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी घोषणा करतानाच पुरावे असल्याचे सांगितले असूनही त्यावर संशय व्यक्त करीत आहेत. 
 
या घरभेद्यांच्या कारवायामुळेच पाकिस्तानची सीमेवर कुरापती काढण्याची हिम्मत होते. मग सीमेवरच काय मुंबईवरही हल्ले होतात. मुंबई हल्ल्याच्यावेळीही सर्जिकल ऑपरेशन करता आलं असतं पण तत्कालिन गृहमंत्री कपडे बदलण्यात व्यस्त आणि तेव्हाचे मुख्यमंत्री आपल्या मुलाला सिनेमात प्रमोट करण्यासाठी अतिरेक्यांच्या भक्षस्थानी पडलेल्या हॉटेल ताजची सफर सिनेदिग्ददर्शकाबरोबर करीत फिरत होते. या घटनांचं गांभिर्यच हरवलं होतं. परिणामी हेच पुरोगामी हस्तक घटनेच live फुटेज पाकिस्तानात बसलेल्या त्यांच्या बॉसना पुरवीत होते तरी त्यांच्यावर कोणतीही कारवायी झाली नाही. ही पकिस्तानी अतिरेक्यांना केलेली थेट मदत होती. अशा प्रकारे भारताला युद्ध परवडणारं नाही असं एका बाजूला सांगत दुसर्‍या बाजूने दहशतवाद्याना थेट मदत करण्याचं काम याच पुरोगामी म्हणवणार्‍या मंडळीनी चालवलं आहे. या अशा गोष्टींमुळेच लष्कर आणि पोलिसांचं मनोबल खच्चीकरण होत असतं. त्याना थारा कोण देत हा खरा प्रश्न आहे. शेवटी अख्खा देश म्हणजे फक्त सैन्य नव्हे, की तेच फक्त लढतील. राजकारणी, नोकरशहा, पत्रकार, कलाकार आणि सामन्य जनता असे सगळे मिळूनच तो देश बनतो. हाच न्याय पाकिस्तानलाही आहे, त्यांचे कलाकार हे त्या देशाचा भाग आहे आणि पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र असेल तर ते कलाकारही त्या शत्रूचाच भाग आहेत. ते दहशतवाद्यांचे हस्तक असू शकतात. त्याना दिवाणखान्यात आश्रय का द्यायचा? ते कलाकार तरी वेगळे करता येतात पण त्यांचे भारतातले साथीदार ओळखणं गरजेचं आहे.

खरा धोका किंवा जास्त धोका कुणापासून? पाकिस्तानकडून की चीनकडून असाही एक प्रश्न निर्माण करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सतत होत असतो. तो धोका दोन्ही बाजूने आहे आणि आता तर हे दोन्ही शत्रू एक झाले आहेत. बलुचीस्तान या आपल्याच पाकव्याप्त काश्मिरमध्ये असलेल्या प्रांतात तिथल्या जनतेला चिरडून हे चालू आहे. तो भाग पाकिस्तानने चीनला आंदण दिला आहे. सीमेवर सैनिक लढतच आहेत, त्याना आपण घरात बसून मदत करू शकतो, कशी तर चीनी मालावर बहिष्कार घालून, ‘मेक इन इंडीया’ला साथ देऊन आणि पाकिस्तानच्या इथल्या पुरोगामी दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखऊन, निवडणूकात चारीमुंड्या चीत करून आपण आपल्यातला देशाभिमान जागृत असल्याचा पुरावा देवू शकतो. सर्जिकल ऑपरेशनच्या पुराव्यापेक्षा या पुराव्याची जास्त जरुरी आहे आणि हाच पुरावा या मंडळींचा बुरखा फाडून टाकेल.             
नरेंद्र प्रभू
सांताकृझ, मुंबई

02 July, 2016

मिशन मणिपूर - एकांडय़ा देशभक्ताची वीरगाथा




या आठवड्याच्या लोकप्रभा अंकात मी लिहिलेला 'मिशन मणिपूर' या पुस्तकाचा परिचय: 

http://www.loksatta.com/pustkachepaan-news/book-review-mission-manipur-1259272/

मिशन मणिपूर ही एकांडय़ा देशभक्ताची किंबहुना क्रांतिकारकाची वीरगाथा आहे. भय्याजी काणे आणि जयवंत कोंडविलकर या गुरू-शिष्याने पूर्वाचलाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंचेचाळीस वर्षांपूर्वी एका यज्ञाला सुरुवात केली आणि भय्याजी अनंतात विलीन झाल्यानंतरही तो धगधगत आहे. देशाचं स्वास्थ्य टिकून राहायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे ते उमगल्यावर क्षणाचाही विलंब न करता तेव्हाच्या रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक असलेले भय्याजी काणे आपल्या दहा-बारा वर्षांच्या शिष्योत्तमाला हजारो किलोमीटर दूर असलेल्या मणिपूर राज्यात घेऊन जातात काय आणि तिथल्या लोकांत देशप्रेमाची ज्योत पेटवतात काय, सगळंच मती गुंग करणारं आहे. पण हे करीत असताना अगदी रोजच्या रोज त्यांना जिवावर उदार होऊन तिथे वास्तव्य करावं लागलं. आपल्याबरोबर असलेल्या आपल्या विद्यार्थ्यांला देशप्रेमाचे धडे त्या रणभूमीवर देताना त्यांना कोणत्या परिस्थितीमधून जावं लागलं त्याचा जिताजागता इतिहास या पुस्तकात कथन केला आहे.

विविध जाती जमाती, पंथ, धर्म, भाषा आणि टोकाचं भौगोलीक वेगळेपण असलेली परिस्थिती असं असूनही भारत हा एक देश म्हणून एकत्र राहिला याला भाय्याजी काणे यां सारखे महापुरूष कारणीभूत ठरले आहेत. स्वातंत्र्य मिळालं पण त्याचा खरा फायदा सर्वांना मिळाला पाहिजे हे समजत होतं पण तिकडे पुर्वांचलात त्याचं वारंही पोहोचलेलं नव्हतं. अशा काळात जिकडे पोहोचायलाच आठ दिवस लागतात त्या ठिकाणी १९६७ साली रत्नागिरीमधला एक शिक्षक जातो काय आणि तिथे सर्व प्रतिकूलच असलेल्या परिस्थितीला तोंड देत उभा राहून कार्य सिद्धीस नेतो काय, सारंच अचंबीत करणारं. याच कार्याचा जिताजागता इतिहास म्हणजे हे पुस्तक आहे.                 

कीं घेतले व्रत न हें अम्हीं अंधतेने
लब्धप्रकाश-इतिहास-निसर्ग-मानें
जें दिव्य दाहक म्हणूनी असावयाचें
बुद्धय़ाचि वाण धरिले किर हें सतीचें

पराकोटीच्या देशप्रेमाने भारून गेलेली माणसंच हे असं म्हणतात आणि ते कृतीतही आणतात. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून ज्या खस्ता खाल्ल्या आणि जिवावर उदार होऊन बिटिश साम्राज्याला सळो की पळो करून सोडलं त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. पण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तरी देशापुढच्या समस्या किंवा देशाच्या एकात्मतेला असणारा धोका किंचितही कमी झालेला नाही. देशाच्या सीमावर्ती राज्यांमध्ये तर ही समस्या नेहमीच सतावत आली आहे. सीमावर्ती राज्य म्हटलं की जम्मू-काश्मीर हे राज्य नजरेसमोर येतं, पण तिकडे पूर्वाचलात आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालॅण्ड, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम या राज्यांमध्ये जो िहसाचार चालू असतो किंवा देशविघातक शक्ती कार्यरत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. शंकर दिनकर काणे (भय्याजी काणे) या शिक्षकाने हे जाणलं आणि समस्येला मुळातून हात घातला, शिक्षक पुढची पिढी घडवतो असं म्हणतात, भय्याजींनी ते म्हणणं पूर्वेकडच्या राज्यांमध्ये जाऊन करून दाखवलं. हे असंभव वाटणारं काम त्यांनी कसं केलं ते वाचताना अंगावर रोमांचं उभं राहतं.

असामान्य शिक्षक काय करू शकतो ते आचार्य चाणक्यांनी दाखवून दिलं आहे. भय्याजी असेच असामान्य शिक्षक होते आणि जयवंत कोंडविलकर या त्यांच्या शिष्याने त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी जे परिश्रम घेतले त्याला तोड नाही. युद्धभूमीवर लढत असताना सनिकांना देशाचं पाठबळ लाभतं, पण असं कुठलंच पाठबळ नसताना या दोघांनी हे कार्य केलं तेव्हा बुद्धय़ाचि वाण धरिलेयाची त्यांना जाणीव होती. भय्याजींनी हे कार्य कसं यशस्वी केलं ते समजण्यासाठी हे पुस्तक मुळातून वाचलं पाहिजे. जिवावर बेतणारे प्रसंग, फील्ड मार्शल करिअप्पा आणि फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची प्रत्यक्ष भेट, या सेनानींनी भय्याजींच्या कामाचं केललं कौतुक असे मनाला हेलावून टाकणारे प्रसंग या पुस्तकात येतात तेव्हा वाचकही सद्गदित होतो.

देशाच्या अनेक भागांत फुटीरतेला खतपाणी घालणाऱ्या शक्ती वाढत चालल्या आहेत. नुसता भूभाग म्हणजे देश नव्हे, तर तिथला समाज, तिथली माणसं एकोप्याने राहणार असतील तर आपला देश कुणी अस्थिर करू शकत नाही. पूर्वेकडच्या राज्यांमध्ये ही समस्या मोठय़ा प्रमाणावर आहे त्यावर नेमका उपाय काय ते सप्रमाण सिद्ध करून दाखवणाऱ्या कर्तृत्वाचा हा आलेख आहे.

गुरूचा हात पकडून शिकता शिकता जयवंत कोंडविलकर कधी कत्रे झाले, ते कसे घडले याचं चित्र हे पुस्तक वाचता वाचता वाचकाच्या डोळ्यांसमोरून सरकू लागतं. मिशन मणिपूर ही एका कर्मयोग्याच्या दीर्घ आणि खडतर जीवनाची गाथा आहे, असं या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ब्रि. (निवृत्त) हेमंत महाजन म्हणतात, ते सार्थ आहे. ही स्फूर्तिगाथा लेखक पुरुषोत्तम रानडे ( ईशान्य वार्ता मासिकाचे संपादक) यांच्या व्यासंगामुळे वाचकांसमोर येत आहे. पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर ते संपेपर्यंत वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्या लिखाणात आहे.

मिशन मणिपूर, लेखक : पुरुषोत्तम रानडे, श्री व्यंकटेश प्रकाशन मुंबई, मूल्य : रु. १५०

नरेंद्र प्रभू 

17 October, 2014

चिनी फटाके नकोच नको


दिवाळी तोंडावर आली असताना फटाक्याच्या बाजारात गर्दी उसळेल. सगळीकडे प्रकाशाची उजळण आणि उधळण करताना करोडो रुपयांचे फटाकेही फोडले जातील. पण हे फटाके आता चीनी बनावटीचेच असतात आणि स्वस्त म्हणून त्याला मागणीही असते. पण आता आपल्याला भारतीय म्हणून विचार करायची वेळ येवून ठेपलेली आहे. चीन हा आता भारताचा सगळ्याच क्षेत्रातला प्रतीस्पर्धी आहे आणि सीमावर्ती भागात चीनच्या हालचाली या सतत त्रासदायक होवून बसल्या आहेत. लडाखसारखा प्रांत असो की अरूणाचल प्रदेश मधले रस्ते बांधकाम, चीन सदोदीत भारताची अडवणूक करीत आला आहे.

अरूणाचल प्रदेशच्या सिमेवरच्या भागात चीनच्या बाजूने प्रशस्त सहा पदरी रस्ते, विमानतळ असं बांधकाम झालं असताना भारताने मात्र आपल्या सीमेत रस्त्यांचं बांधकाम करूच नये असंच चीनला वाटत आलं आहे. ही दादागिरी भारत सरकार आपल्या पातळीवर मोडून काढेलच पण एक भारतीय नागरीक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. आजच्या जगात व्यापार हे सुद्धा एक अस्त्र आहे. आणि ते सगळ्यानाच पुरून उरतं. आज भारताच्या सगळ्या बाजारपेठा चीनी मालाने तुडुंब भरल्या आहेत. कपडे, शोभेच्या वस्तू, इलेक्ट्रॉनीक उपकरणं इतकचं काय गणपतीच्या मुर्ती, आकाश कंदील, विजेचे दिवे, फळ फळावळ हे सगळंच चीनी होत चाललय. दिवाळीचा चीनी फराळ आला तर नवल वाटायला नको.  

सीमेवरच्या शत्रूला परत जा म्हणून सांगताना आता सैनिकांबरोबरच नागरीकही आपली भुमिका बजावू शकतात. चीनी मालाला नकार देवून आपण ती बजावली पाहीजे. फटाक्यांसारख्या आवाज आणि हवेचं प्रदुषण करणार्‍य़ा वस्तू तर कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.  चिनी फटाके तर नकोच नको.      



LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates