11 July, 2026

गाजलेली मैफिल आणि निळाईची गाज



थबकल्या झिम्माड धारा, स्तब्ध ही उनाड वारा

नाविकाचे गीत माझ्या, ऐकती करिती किनारा

लोक भेटायास आले, निशब्द होऊन गेले

शब्द-शब्द कवितेतला अन् भावही वेचून गेले

सागराचे गुज त्याच्या, साठले गीतात होते   

वादळाची स्पंदने, धडकून कापरे भरीते

 आदळे हदयात माझ्या, आंधळा अफाट दर्या

स्वार तो झाला तयावर, पेलले आकाश लिलया  

सचैल न्हाली सांज होती, हरपलेले भान होते

कोण कोणाला मिळाले? का कुणा ठाऊक होते?  

                                                 नरेंद्र प्रभू

काल प्रभादेवी मुंबईत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या पु. ल. कट्ट्यावर लेखक, कवी कॅप्टन वैभव दळवी यांचा निळाईची गाज हा बहारदार कार्यक्रम सादर झाला आणि गेले आठ दिवस मुंबईत बरसणारा पाऊस दोन तासात रसिक मनावर कोसळून गेला. तुडुंब भरलेल्या नॅनोसभागृहात गर्दी ओसंडून वहायला लागली आणि आयोजकांना रसिकांसाठी दुसरं दालन खुलं करावं लागलं. निळाईची गाज ऐकायला सागराला उधाण यावं तशीच गर्दी लोटली होती आणि जमलेल्या श्रोत्यांना कॅप्टन वैभव दळवी यांनी तृप्त करून सोडलं. त्यांच्या कवितेचा भावार्थ, अत्यंत नेटकं आणि प्रभावी सादरीकरण, त्याला लाभलेली दृकश्राव्य माध्यमाची साथ आणि टाळ्यांचा कडकडाट मैफिलीला सातवे आसमान पार घेऊन गेला.

·         कविता आणि आयुष्याची लय: संवादाची सुरुवात कवितेच्या सामर्थ्याबद्दल झाली. कॅप्टन दळवी यांनी स्पष्ट केले की, आपल्या दैनंदिन जीवनातील साध्या गोष्टींपासून ते विश्वाच्या विशालतेपर्यंत सगळीकडे कवीचे मन आणि गाणे दडलेले असते.

·         लहानपणीचे संस्कार: कॅप्टन दळवी यांनी शिवडी-लालबाग येथील गिरणगावातील त्यांच्या बालपणाबद्दल सांगितले. त्यांचे वडील, जे स्वतः एक कवी होते, त्यांनी त्यांना अनेक नामवंत साहित्यिक व्यक्तींशी ओळख करून दिली, ज्यामुळे त्यांची साहित्यातील आवड निर्माण झाली.

·         समुद्र आणि वादळाचे अनुभव: समुद्राशी त्यांचे नाते खूप घट्ट आहे. त्यांनी 'भरून आलं आभाळ' आणि 'जहाज बुडता बुडता' या कवितांद्वारे समुद्राचे सौंदर्य आणि वादळातील त्याचे रौद्र रूप यावर भाष्य केले आहे.

·         शिस्त आणि सर्जनशीलता: गणवेशातील शिस्त आणि कवितेतील मुक्त अभिव्यक्ती यांचा मेळ कसा साधता, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, युनिफॉर्म हे त्यांचे कर्तव्य आहे, तर कविता ही त्यांची आत्माभिव्यक्ती आहे .

·         जीवघेणा प्रसंग: त्यांच्या कारकिर्दीतील एक अत्यंत थरारक प्रसंगाचे वर्णन त्यांनी केले, जेव्हा अटलांटिक महासागरात त्यांचे जहाज बुडत होते. त्यांनी आणि त्यांच्या टीमने धैर्याने आणि युक्तीने त्या संकटावर कशी मात केली, हा प्रसंग अतिशय प्रेरणादायी मुळापासून ऐकण्यासारखा आहे.

·         भारतीय सैनिकांना आदरांजली: कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी त्यांची गाजलेली कविता 'कोण लागतो रे तो तुमचा?' सादर केली. आपल्या भारत देशाच्या सियाचीन सारख्या दुर्गम सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या त्यागाचे आणि त्यांच्या संघर्षाचे मर्म या कवितेतून त्यांनी मांडले आहे.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी च्या पु. ल. कट्ट्यावरदर शुक्रवारी अशी मैफिल जमत असते, जमलं तर नव्हे जमवून याच.

ता. क. या कार्यक्रमाचा दुसरा भाग इथेच सादर व्हावा अशी मागणी रसिकांमधून कार्यक्रम संपता संपता केली गेली हेच या कार्यक्रमाचं फलित आहे.      



09 July, 2026

निळाईची गाज

 


स्पिती व्हॅली मधलं लांझा हे जीवाश्म गाव (Fossil village). समुद्रसपाटीपासून १४५०० फुट उंचीवरच्या या गावात फिरताना पायाखालच्या जमिनीवर तुम्हाला जीवाश्म सापडले तर ते नवल नाही. लाखो वर्षांपूर्वी समुद्र तळाला झालेल्या फार मोठ्या हालचालीतून हिमालयाची निर्मिती झाली आणि त्यावेळी समुद्रात असलेले जलचर अचानक पणे एवढ्या उंचीवर उचलले गेले आणि कालौघात जीवाश्मांची घडण झाली. नील नभाने मंडित बर्फाच्छादित हिमालयाचे दर्शन घेत असतानाच कधीकाळी समुद्राचा भाग असलेले हे जीवाश्म न्याहाळत होतो आणि सोबत लाभली होती ती सागरांच्या लाटांवर वर्षानुवर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या कॅप्टन वैभव दळवी या अवलियाची. मुंबई ते चंदीगड हा विमान प्रवास करत असताना साधारण अशाच उंचीवर कॅप्टन वैभव दळवी यांनी त्यांचं समुद्रायन हे पुस्तक भेट म्हणून दिलं आणि कॅप्टन दळवींची प्रत्यक्ष ओळख व्हायच्या आधीच पुस्तक रूपाने त्यांच्याशी जवळीक साधली गेली होती. प्रवासाच्या धामधुमीत पुस्तक वाचायला मिळालं नाही पण या पुस्तकाचे लेखक वैभव दळवी बरोबर असल्याने त्यांच्या अनेक सागर सफारींच्या चित्तवेधक कहाण्या ऐकायला मिळाल्या. लांझा  गावात महासागराची भेट अशा दोन प्रकारे झाली आणि नंतरच्या प्रवासात ती वृद्धिंगत होत गेली.

आपला निसर्ग सुंदर भारत देश उत्तुंग हिमालय आणि अथांग दर्या यांनी संपन्न आहे पण या सागराची अनेक भली बुरी रूपं गेली तीस-पस्तीस वर्षं अनुभवलेल्या कॅप्टन वैभव दळवी यांनी लिहिलेलं समुद्रायन पुस्तक खूप गाजलं, माहितीजालत उपलब्ध असलेल्या त्यांच्या अनेक कविताही दळवींच्या प्रतिभेची चुणूक दाखवतात. अशा या दर्यावर्दी लेखक कवीला प्रत्यक्ष भेटण्याची आणि ऐकण्याची संधी आपल्याला चालून आली आहे.

'पु. ल. कट्टा'  उपक्रमांतर्गत “निळाईची गाज” हा खास कार्यक्रम उद्या म्हणजे शुक्रवारी, १० जुलैला रसिकांसाठी विनामूल्य सादर होणार आहे. संध्याकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत चालणार्‍या या कार्यक्रमाला आपण नक्की यायचं आहे कारण पाऊसही  निळाईची गाज ऐकायला उसंत घेणार असे म्हणाला आहे. कॅप्टन वैभव दळवी आपल्या कवितेत म्हणतात:

 

झेलला मी सागराचा वार ऐसा जीवघेणा,

काय होता भार त्याचा, हे तुम्हा कैसे कळावे?

धाडशी त्या नविकांचे शूर असे झुंजणे की;

पाहता ते वादळांनी थांबुनी मागे वळावे.

 

ती अनुभूती, ती गाज लेखकासोबत वाटून घ्यायची असेल तर नक्की याच!   





15 December, 2025

आत्माची भ्रमणगाथा

 


असे पाहतो जीवन त्याचे फिरत्या चाकावरी
किती पहा हे देश पाहिले धडकी भरते उरी
जरा विसावा नसतो त्याला उडतो तो अंबरी
आत्माची ही भ्रमणगाथा देशोदेशांतरी


जरा जाऊन येतो म्हणतो इतके का ते सोपे?
वळणा वळणा वरती बसले दडून असतील धोके
संकटांवरी स्वार होऊन ऐटीत येतो जातो
किती अनोखे देश नेत्री भरुनी येतो

दीडच दशकामध्ये त्याने पार केली शंभरी
नाही विसावा अजून म्हणतो जाईन देशांतरी
वायुपुत्र हनुमानच जणू हा हुंकार पुन्हा भरी
गड्यांनो... चला जाऊया देऊन हात पूला त्याच्या करी

नरेंद्र प्रभू
१५ डिसेंबर २०२५






LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates