Showing posts with label पर्यावरण. Show all posts
Showing posts with label पर्यावरण. Show all posts

08 May, 2022

सदाफुली


सदाफुलीचं फुलझाड मला नेहमीच आवडत आलंय. एखाद्या हसतमुख माणसासारखी सदाफुली रोजच फुलत असते. दोन रंगांची ही फुलं लहानपणापासून पहाता आली तरी आता अनेक रंगी सदाफुलीची फुलझाडं हे  नाविन्य राहिलेलं नाही. नर्ससरीतल्या रक्तवर्ण रंगांच्या छोट्याश्या सदाफुलीने माझं लक्ष वेधून घेतलं  आणि इतर झाडांबरोबर ती गॅलरीत दाखलही झाली. झुपकेदार फुलांनी रोज स्वागत करणारं हे झाड एक दिवशी सकाळी जरा नाराज दिसलं. सध्याच्या गरमीत सकाळ-संध्याकाळ पाणी देवूनही एका फांदीने मान टाकली होती आणि तिच्यावरील फुलं कोमेजून गेली होती. जवळ जावून पाहिलंतर त्या फांदीला किड  लागलेली. माहित असलेले उपाय करूनही एक-एक फांदी सुकत गेली आणि आता ही एकच राहिली, पण आज तीच्यावर हे बहारदार फुल उमललं, हे निसर्गाचं देणं...!

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वधर्म न सोडता आनंद देत रहायचं हा मंत्र निसर्ग आपल्या अशा कृतींमधून सतत देत असतो. आपल्या अर्ध्याअधिक फांद्या गमाऊनही उरलेला देह घेऊन हे फुलझाड असं तजेलदार फुल मिरवतय...., हे किती दिवस टिकणार माहित नाही पण त्याने दिलेला हा आनंद मात्र दिर्घकाळ स्मरणात राहील. असं एक तरी सदाफुलीचं झाड नजरेसमोर असावं; जे सदोदीत आनंदीत रहायला शिकवेल, सदाच्या कटकटीतही फुलत राहील.



24 August, 2018

निसर्ग मित्र



एक दिवसाची सहल, निसर्ग पर्यटन, उत्तम जेवण-खाणं आणि निसर्गाबद्दलचं कुतूहल क्षमवणारं ज्ञान हे सगळं एकत्र अनुभवायचं असेल तर निसर्ग मित्र, व्दारा राजेंद्र भट, बेंडशिळ, बदलापूर पुर्व इथे गेलं पाहिजे. आम्ही नुकतेच त्या ठिकाणी जाऊन आलो. चहा, नाष्टा, जेवण यावर ताव मारला आणि मुख्य म्हणजे श्री. राजेंद्र भट आणि सौ. भट यांच्या सहवासात एक दिवस आनंदात गेला.

कृषीतज्ज्ञ श्री.राजेंद्र भट

१९९० साली बेंडशिळच्या उजाड माळावर  राजेंद्र भट या शहरी माणसाने थोडी जमीन खरेदी केली. उघड्या बोडक्या जागेवर अनेक प्रयोग करीत शेतीला सुरूवात केली. निसर्गाकडून घेताना त्याचं धन पुन्हा त्यालाच परत करत एक आदर्श निर्माण केला. सेंद्रीय शेती म्हणण्यापेक्षा निसर्ग शेती केली आणि निसर्गाकडून घेताना त्यालाही भरभरून परत केलं.

रासायनिक खतं, औषधं सोडाच पण जमिन न नांगरताही  शेती करता येते याचं प्रात्यक्षीक पहायचं असेल तर निसर्ग मित्रला भेट दिलीच पाहिजे. गांडूळ, बेडूक, किटक, पक्षी हे शेतकर्‍याचे (पर्यायाने मानवाचे)  मित्रच आहेत असं नव्हे तर ते सतत काम करणारे कामगारही आहेत. जीवनाची ही साखळी कसं काम करते ते इथे अभ्यासता येतं.

अनेक कृषी पर्यटन केंद्रांमधून मनोरंजन हाच मुख्य उद्देश्य असतो पण इथे मात्र कृषी विशयक ज्ञानाचा लाभ होतो.  प्रत्यक्ष शेती, विविध पिकं, पळझाडं, फुलझाडं यांचं दर्शन घ्यायचं असेल तर इथे जाण्याला पर्याय नाही.

कृषीतज्ज्ञ  राजेंद्र भट यांनी पाच एकरात बहुपीक पद्धतीने बहारदार शेती केली आहे.  भात, आंबा, नारळ या बरोबर कोको, कॅफी, काळी मिरी, मसाल्याची झाडं, नागवेल, हळद, सुरण   हे तर दिसतच पण ड्रागन फ्रुटचं झाड आणि त्याला लागलेली फळं पाहून मन तृप्त होतं. पर्यावरणाचा होणारा र्‍हास हा आजचा कळीचा मुद्दा आहे. नुकताच केरळ राज्यात आलेला महापूर हे त्याचं जितं जागतं उदाहरण आहे. नैसर्गिक स्त्रोतांचा वेगाने होणारा विनाश आपल्या परीने थांबवायचा असेल तर काय करता येईल याचं  उत्तर  शोधण्यासाठीही इथे जाता येईल.
                                    
या भूमीने मानवाला दान द्यावे
पाहिजे तितूकेच त्याला ते मिळावे
या करांनी या भूईला दान द्यावे  
आणि मातीतून पुन्हा ते रुजावे

निसर्ग मित्र
व्दारा राजेंद्र भट, बेंडशिळ, बदलापूर पूर्व
9324601272


08 March, 2017

जुगल तिवारी



जुगल तिवारी

कच्छच्या रणात जाऊन पक्षी वैभव पहायचं म्हटलं तर ते नवख्या माणसाला अशक्यप्राय वाटेल, मुळात कच्छच्या रणात पक्षी पहाणं ही संकल्पनाच पचनी पडणारी नाही. असं असलं तरी जुगल तिवारी हा माणूस तिथले पक्षी दाखवण्याची किमया करून दाखवतोच. मोटी-विरानी या गावात आपल्या होमस्टेच्या माध्यमातून आपल्याशी संपर्कात आलेला हा अवलीया अथक जगभ्रमंतीवर असणारा माझा मित्र आत्माराम परब याला कसा काय भेटला (अशी माणसं आकर्षीत करणारा चुंबक त्याच्याजवळ आहे) हे अजून माहित करून घ्यायचं आहे. तर आत्मामुळेच मी या जुगल तिवारीच्या वाटेला गेलो. आणि एकदा का तुम्ही जुगल तिवारींना भेटला की ते तुम्हाला हाताला धरून आजू-बाजूचा सगळा परीसर दाखवतात. तसा वैराण वाळवंटात गणती होणारा हा प्रदेश एरवी फिरण्यासाठी कुणीच निवडणार नाही. पण आत्माने हा माणूस पारखला आणि मग आत्मा, त्याचा मित्र-परिवार आणि ईशा टुर्सचे पर्यटक गेली सात-आठ वर्षं इथे जात आहेत आणि या परिसराची आणि अर्थातच जुगल तिवारीच्या सान्निध्याची मजा लुटत आहेत.

जवळचं काटेरी झुडुपांचं रान, बनी ग्रासलॅंड, चारी-ढंड वेटलॅंड, लायलारी नदीचं कोरडं पात्र, व्हाईट रन, मांडवी, मोढवा किनारा अशी ठिकाणं पहावी तर ती जुगल तिवारी यांच्या सोबतच. एरवी फारसं इथे कुणी फिरकणार नाही, आपण जातो तेव्हाही तिथे कुणी माणसं आलेली नसतातच. डिस्कव्हरी चानेललाही पाच-पाच एपिसोड एवढी सामग्री पुरवणारा आणि चित्रणादरम्यान स्वत: त्याचा भाग असलेला हा महाभाग आपल्यासोबत असला की काय पाहू आणि काय नको असं होऊन जातं. जुगल तिवारींचा कटाक्ष पण तसाच असतो, प्रत्येक गोष्ट पत्येकाला समजलीच पाहिजे, काही चुकलं तर तेच जरा नाराज होतात. हा माणूस त्या रणच्या प्रेमात पडला आहे. स्वत: पक्षी तज्ज्ञ असलेला, जैव विविधतेची माहिती असलेला, बिएचएनएसचा पक्षी अभ्यासक, विज्ञानाचं पदवीत्तर शिक्षण घेतलेला, मुख्य म्हणजे परीसर आणि निसर्गाची आवड, जाण तसंच अभ्यास असलेला, तिथल्या माणसांना रोजगार पुरवणारा माणूस सोबतीला असला की कोणत्याही सिजनमध्ये ‘रण’ हा ‘उत्सव’ बनून जातो. तिथे एकदा तरी गेलंच पाहिजे.    












11 June, 2016

पाऊस आला आला रे !




नील नभातून झरते पाणी
पाऊस आला आला रे
मोर पिसारा फुलवित सार्‍या
वनात नाचता झाल रे

चमकत विज ही वरून आली
गगन भेदीते सारे रे
गडगडूनी ढग फुटून गेले
वर्षावाची हाळी रे  

गुरे वासरे चौखूर उधळूनी 
सैरावैरा झाले रे
ओलेत्याने पक्षी बघती
कुठे आसरा आहे रे

झर झर पागोळ्यांच्या धारा
जमीन ओली झाली रे
बघता बघता ओहळ भरूनी
दौडत दौडत आले रे

आभाळाचे देणे आहे
धरतीसाठी लेणे रे
नील नभातून झरते पाणी
पाऊस आला आला रे



नरेंद्र प्रभू 

08 January, 2015

किरण पुरंदरेंची धम्माल शीळ


Kika profile
दिवसभराच्या कामाचा थकवा क्षणार्धात दूर करणारी शीळ काल ऎकली आणि एरवी या आनंदाला आपण का मुकतो असा प्रश्नही पडला. मुळात निसर्गाचाच एक भाग असलेले आपण त्याच्यापासून एवढे दूर जातो की मग अरे! हे रोज आपणाला साद घालत असतं हे ही विसरून जातो. मॅजेस्टिक गप्पांमध्ये काल किरण पुरंदरेंची मुलाखत होती. ‘सखा नागझिरा’ पासूनची त्यांची ओळख काल आणखी दृढ झाली. हा माणूस पक्षांशी बोलतो एवढं माहित होतं पण काल त्यांची सुभग, नाचण, गरूड, पोपट यांच्या आवाजातली शीळ ऎकली आणि थक्क झालो.



वानरांच्या नेत्याचा 'भद्या' चा आवाज 

जंगल, पक्षी, प्राणी हे तर आपणाला नातेवाईकांहून ही प्रिय आहेत असं सांगताना लहनपणापासून आपण त्यांच्या प्रेमात कसे पडलो याचा सगळा पट किरण पुरंदरेंनी काल उलगडवून दाखवला आणि निसर्ग प्रेम म्हणजे काय याचा साक्षात्कार घडवला. नागझिर्‍याचे चारशे दिवस, तिथे घडलेले वाघीणीचे दर्शन, मग थरकाप उडवून देणारा जंगलचा माहोल,  भल्यामोठ्या अस्वलीणीचं तीच्या पिलावळीसह घडलेलं दर्शन, यांचं प्रत्ययकारी वर्णन ऎकताना अंगावर रोमांच उभे राहिले. खरंच हा माणूस आपल्याला  आवडेल त्या प्रकारेच आपलं आयुष्य जगला. किती वेगळे अनुभव त्यांनी घेतले. व्यंकटेश माडगूळकरांपासून सालीम अली पर्यंत निसर्ग प्रेमींचा त्यांना लाभलेला सहवास सगळंच जाणून घेताना प्रथमच गाव सोडून मुंबईला आल्याचं वैशम्य वाटलं.


अस्वलाचा आवाज

भूतदया दाखवण्यासाठी पक्षांना खावू घालू नये, त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम तर होतोच पण कबूतरासारख्या पक्षांचा त्रासच माणसाला जास्त होतो आणि कबूतरांच्या विष्ठेत वीस हून जास्त विषाणू असतात, जे दम्यासारख्या रोगाला आमंत्रण देतात. अशोकासारखी निरुपयोगी झाडं लावण्यापेक्षा काटेसावर, पळस आणि पांगारा ही झाडं लावावीत. काटेसावर ज्याला शाल्मली असंही नाव आहे त्या झाडावर साठ पेक्षा जास्त पक्षी येतात. भारतीय झाडं लावल्यानेच इथल्या पर्यावरणाला त्याचा फायदा होणार आहे.

सुभगाशी केलेला संवाद





  
 

17 October, 2014

चिनी फटाके नकोच नको


दिवाळी तोंडावर आली असताना फटाक्याच्या बाजारात गर्दी उसळेल. सगळीकडे प्रकाशाची उजळण आणि उधळण करताना करोडो रुपयांचे फटाकेही फोडले जातील. पण हे फटाके आता चीनी बनावटीचेच असतात आणि स्वस्त म्हणून त्याला मागणीही असते. पण आता आपल्याला भारतीय म्हणून विचार करायची वेळ येवून ठेपलेली आहे. चीन हा आता भारताचा सगळ्याच क्षेत्रातला प्रतीस्पर्धी आहे आणि सीमावर्ती भागात चीनच्या हालचाली या सतत त्रासदायक होवून बसल्या आहेत. लडाखसारखा प्रांत असो की अरूणाचल प्रदेश मधले रस्ते बांधकाम, चीन सदोदीत भारताची अडवणूक करीत आला आहे.

अरूणाचल प्रदेशच्या सिमेवरच्या भागात चीनच्या बाजूने प्रशस्त सहा पदरी रस्ते, विमानतळ असं बांधकाम झालं असताना भारताने मात्र आपल्या सीमेत रस्त्यांचं बांधकाम करूच नये असंच चीनला वाटत आलं आहे. ही दादागिरी भारत सरकार आपल्या पातळीवर मोडून काढेलच पण एक भारतीय नागरीक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. आजच्या जगात व्यापार हे सुद्धा एक अस्त्र आहे. आणि ते सगळ्यानाच पुरून उरतं. आज भारताच्या सगळ्या बाजारपेठा चीनी मालाने तुडुंब भरल्या आहेत. कपडे, शोभेच्या वस्तू, इलेक्ट्रॉनीक उपकरणं इतकचं काय गणपतीच्या मुर्ती, आकाश कंदील, विजेचे दिवे, फळ फळावळ हे सगळंच चीनी होत चाललय. दिवाळीचा चीनी फराळ आला तर नवल वाटायला नको.  

सीमेवरच्या शत्रूला परत जा म्हणून सांगताना आता सैनिकांबरोबरच नागरीकही आपली भुमिका बजावू शकतात. चीनी मालाला नकार देवून आपण ती बजावली पाहीजे. फटाक्यांसारख्या आवाज आणि हवेचं प्रदुषण करणार्‍य़ा वस्तू तर कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.  चिनी फटाके तर नकोच नको.      



25 September, 2014

लोटे परशुराम ते परशुराम कुंड


परशुरामाने जोडलेला दुवा

त्रेता युगापासून संपुर्ण भारत वर्षात एक आख्याईका बनुन राहीलेल्या भगवान परशुरामाने त्या काळात  हिंदुस्थानभर संचार केल्याच्या खुणा सापडतात. आपल्या असामान्य पराक्रमाच्या जोरावर त्यानी दुष्ट आणि नराधम राज्यांचा निप्पात केला आणि धर्माचं राज्य स्थापन करण्यासाठी जिवाचं रान केलं. 

परशुरामाने बाण मारून समुद्र मागे हटवला आणि कोकण प्रांताची निर्मिती केली असं म्हटलं जातं. भारतात समुद्रालगतच्या अनेक ठिकाणी हिच कथा सांगितली जाते. कोकण प्रांताला तर परशुराम भूमी म्हणूनच ओळखलं जातं. तिकडे देशाच्या पुर्वोत्तर राज्यातही परशुरामाच्या पराक्रमाच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मातृ आणि पितृ भक्त परशुराम तर जगविख्यात आहे. पित्याच्या आदेशाला शिरसावंद्य मानून त्याने स्वत:च्या आईचंच शिर धडावेगळं केलं आणि पुन्हा पिता प्रसन्न होताच आईसाठी जीवन मागून घेतलं. आईच्या हत्तेचं हे पाप धुण्यासाठी त्याने ज्या कुंडात उडी टाकली त्या लोहीत नदी मधल्या कुंडाला परशुराम कुंड म्हणून ओळखलं जातं. त्या काळापासूनच दर संक्रातीला या कुंडात स्नान करण्यासाठी हजारो श्राद्धाळू एकत्र येत असतात. 

या वर्षीच्या मकरसंक्रातीच्या पवित्रस्नाच्या वेळी पन्नास हजार भाविकांनी परशुराम कुंडाला भेट दिली. त्यापैकी तीस हजार यात्रेकरू भारताच्या विविध भागातून आले होते अशी माहिती लोहीत जिल्ह्याच्या वाक्रो प्रांताचे अतिरीक्त सहाय्यक आयुक्त श्री. दाक्तो रिबा यांनी दिली आहे. यात्रेकरूंची ही संख्या गतवर्षा पेक्षा कमी आहे असंही रीबा म्हणाले. यात्रेकरूंची ही घटती संख्या प्रशासनालाही अपेक्षीत नव्हती.

आपल्या अरुणाचल प्रदेश राज्यातला लोहीत जिल्हा निसर्गसंपदा आणि सौदर्याने भरलेला आहे. या जिल्ह्यातून वाहणार्‍या लोहीत नदीवरूनच या जिल्ह्याला लोहीत हे नाव दिलं गेलं आहे. अनेक पौराणिक आणि ऎतिहासिक कथांशी जोडल्यागेलेल्या या ठिकाणी पर्यटनाला खुपच वाव आहे. शहरी प्रदुषणाचा मागमुस नसलेला हा प्रांत बर्फाच्छादीत शिखरं, खळाळते जलप्रवाह, नद्या, सदाहरीत जंगलाने परीपुर्ण असून पर्यटकाना सदोदीत साद घालत आहे. इथली गावं देश विदेशातील पर्यटकांच आकर्षण ठरू शकतील एवढी देखणी आहेत आणि त्यानी आपली पारंपारीक नृत्य आणि कलांची जपणूकही केली आहे. पर्वतारोहण, राफ्टींग, जंगल सफारी आणि हत्तीवरून फेरफटका मारणं  अशा पर्यटनाच्या अनेक संधी असूनही त्या दृष्टीने हा भाग अजून दुर्लक्षीत राहीला आहे. परशुरामकुंड हे अरुणाचल मधील तिर्थस्थळ,  भालुकपॉंग, दिरांग, बोमदीला, से ला पास,  ही चिन-भारत युद्ध भूमी,   तळ्याचं तवांग या सर्वांचा इतिहास-भूगोलात असलेला उल्लेख एवढाच आपला असलेला संबंध असं न राहाता हिमालयाच्या कुशीत वसलेला अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा भाग असलेला कोकण प्रांत यांचं नातं परशुरामकुंड तसंच पर्यटनाच्या निमित्ताने घट्ट झालं तर विविधतेत असलेली एकात्मता या म्हणण्यालाही काही अर्थ प्राप्त होईल, नाही का?  

                     

24 September, 2014

जंगल संपत्तीचा विनाश


ईशान्य वार्ता या मासिकात आलेला माझा लेख :  
विकासाच्या नावाखाली भकास होत जाणारी वनसंपदा ही अवघ्या जगाचीच समस्य होवू घातली आहे.  एकेकाळी आपला पश्चिम घाट हा इथल्या जैव विविधतेसाठी प्रख्यात होता, आजही आहे पण विकासाच्या नावाखाली त्याच्या नरडीला नख लावायला इथले राजकर्तेच पुढे सरसावले आहेत. तिकडे अमेरिकेत कॅलिफोर्नियात समुद्र किनाऱ्यालगत,  प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या आणि खूप उंच वाढणाऱ्या 'रेडवूड' या वृक्षाचं जंगल आहे. विशेष म्हणजे जगात हा वृक्ष इतरत्र कोठेही आढळत नाही. फर्निचरच्या व्यवसायासाठी अमेरिकन लाकूड कंपन्या या वृक्षाची सर्रास तोड करतात. जंगल संपत्तीचा विनाश हा किती घातक ठरू शकतो याचा धडा उत्तराखंडाने दिल्याला अजून वर्षही झालेलं नाही.

हिमालयाच्या कुशीत वसलेलं देवभूमी उत्तराखंड निसर्ग सौदर्याने ओसंडून वाहात होतं. या राज्यात काय नाही ते विचारा. गंगा, यमुना, भागीरथी, अलकनंदा, मंदाकिनी, धवलगंगा, पुष्पावती, भिलंगणा, सोंगनदी सारख्या नद्या, नैनिताल, मसुरी, रानीखेत अशासारखी तीन डझन थंड हवेची ठिकाणं, बिनसर, जिम कॉर्बेटसह चार अभयारंण्य. आणि या निसर्गसंपदे बरोबरच बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री हरिव्दार, हृषीकेश, गौरीकुंड, गुप्तकाशी, रुद्रप्रयाग, हेमकुंड साहेब, जोशीमठ, कर्णप्रयाग, देवप्रयाग अशी हजारो वर्षाची धार्मिक परंपरा लाभलेली तिर्थक्षेत्रं. या सर्व संपदेवर माणसाची वाईट नजर पडली आणि त्याच्या स्वार्थानेच या प्रदेशाचा घात केला. लोभापायी नद्या, पहाड, जंगलाचा ताबा घेतला गेला. हे सर्व करताना १९९८ साली रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठची भूस्खालनाची घटना आणि तिने झालेली जीवित तसंच वित्तहानी दुर्लक्षीली गेली. अलकनंदा नदीला चार दशकापुर्वी आलेल्या महापुराचा सर्वांनाच विसर पडला. ते रौद्रतांडव विसरल्यामुळेच  आणि पर्यावरण तज्ज्ञांकडून वारंवार देण्यात येणारा धोक्याचा इशारा नजरे आड केला गेल्यानेच  त्याहून मोठा प्रलय गेल्याच वर्षी पाहावा लागला.

वनसंपदेचा मानवाला असलेला फायदा किंबहूना त्या वनसंपदेवरच टिकून असलेला माणूस आज त्या त्या वनांचाच वैरी झाला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया असो की आपला पश्चिम घाट संपत्तीच्या हव्यासापायी ही वन क्षेत्रं आक्रसत चाललीत पण तिकडे दूर पुर्वोत्तर राज्यांमध्येही हिरव्यागार वनराजींनी व्यापलेलं हजारो एकर जंगल वणव्यांच्या भक्षस्थानी पडत आहे. या आगी मुद्दामहून लावल्या जात आहेत हे विशेष. फिरत्या शेतीच्या (jhum cultivation) अघोरी हव्यासामुळे इथली जंगलं अगदी दर वर्षी आगीच्या भक्षस्थानी पडतात आणि हिमालयाच्या पर्वतराजींमधली ही अमुल्य जंगलं नष्ट तर होतातच पण तिथले डोंगर उघडे बोडके होवून आपणच विनाशाच्या सीमारेषेवर येवून उभे राहतो हे तिथल्या जनतेच्या लक्षातही येत नाही. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात या भागात फेरफटका मारल्यास पर्वतच्या पर्वत जळत असतात आणि आसमंतात धुराचे लोटच्या लोट उठत असतात. अरुणाचल प्रदेश आणि मणीपूर मध्ये हे दृष्य या महिन्यात नेहमीच पाहायला मिळतं. भारत सरकारच्या वन सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहाणीत जे तथ्य समोर आलं आहे ते खरंच थरकाप उडवणारं आहे. या सर्वेक्षणानुसार दरवर्षी 2100 चौरस किलोमीटर जंगल जाळण्यात येतं.  नेमकी आकडेवारी पाहायची झाली तर 2009 साली 1000 चौ.कि.मी., 2010 साली 2118 चौ.कि.मी., 2011 साली 1119 चौ.कि.मी., एवढा संपन्न जंगलांचा भाग आगीच्या भक्षस्थानी पडला आणि त्या जमिनीवर स्थलांतरीत किंवा फिरती शेती केली गेली. शेकडो वर्षांच्या कालखंडात उभी राहिलेली जंगलं नष्ट झाली आणि त्याखालची हजारो वर्षापासून संरक्षीत असलेली उपजावू जमीन धुतली गेली. या जळीतकांडामुळे उघडी पडलेली जमीन हे उद्या येवू घातलेल्या संकटाची नोटीसच आहे.

आपल्या भारत देशातला पुरवांचलाचा प्रदेश म्हणजे हिमालयाच्या अंगाखांद्यावरचा आणि म्हणूनच निसर्गसंपदेचं वरदान लाभलेला भाग आहे. वनसंपदे मुळे त्या खालच्या जमीनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते, जर वरची जंगलंच नष्ट झाली तर मात्र त्या उघड्या बोडक्या जमीनीची धुप तर होईलच पण पाणी साठवण्याची क्षमता नष्ट होवून तो सगळा टापूच वैराण होवून जाईल. ब्रम्हपूत्रा, जीया बोरोली, शोणीत अशा अनेक नद्या याच भागात वाहात असून इथल्या जनतेला पाण्याचं दुर्भिक्ष जाणवू देत नाहीत. पण या नद्यांच्या आजूबाजूची जंगलं नाहीशी नष्ट तर मात्र या नद्यांचं पाणी आटून जाईल. पुर्वांचलाची शुभ्र बर्फाच्छादीत शिखरं, प्रसन्न मोकळी आल्हादायक हवा, हिरवागार परिसर आणि खळाळत्या नद्या या सर्वांमुळे हा भाग तिथे गेलेल्या प्रत्येकालाच भुरळ घालतो. अशा ठिकाणची जंगलं जर नाहीशी झाली तर उत्तरंचलात अलिकडेच झाली तशी ढगफूटी झाली तर काही काळायच्या आतच होत्याचं नव्हतं होईल आणि सगळीकडे हाहाकार माजेल. नंतर निसर्गाला दोष देण्यात काहीच अर्थ उरणार नाही. अशी आपत्ती आल्यावर नेहमीच निसर्गाच्या नावाने बोटं मोडली जातात. पण या सगळ्या आपत्तीची तयारी आपणच करून ठेवतो. वर दिलेली आकडेवारी या तयारीचीच जाणीव करून देत आहेत. पुर्वांचलात काहीही दुर्घटना घडली की त्याचा दोष चीनच्या माथी मारण्याची आपल्याला सवयच झाली आहे. ते काही अंशी खरं असलं तरी आपल्याच हाताने आपण लावलेल्या या आगीना आपणच जबाददार आहोत. चीन कितीही नीच असला तरी त्याला या बाबतीत तरी दोष देता येणार नाही.

काही वेळा नैसर्गिक वाटणार्‍या आपत्ती या मानव निर्मितच असतात. फक्त माणसाने हळूहळू त्या आपत्तीची तयारी केकेली असते आणि निसर्ग एकच घाव घालून ती खुली करून टाकतो. जगातली सर्वात तरूण आणि पृथ्वीच्या उत्पती नंतर सर्वात शेवटी तयार झालेला ठिसूळ प्रदेश म्हणजे हिमालय. जोराच्या वार्‍यानेही या जमीनीची सतत धुप होत असते. तिव्र डोंगर उतारावरून वाहत येणारे प्रवाह तर ही माती घेवून पठारी प्रदेशाकडे सतत धाव घेत असतात. याला अडवायचं कुणी? निसर्गानेच याचं उत्तर शोधलं आणि वनराई आणि वृक्षांच्या मदतीने ही धुप थांबवली. जमीन थोडी स्थिर झाली. या झाड झाडोर्‍याच्या मदतीने तिथल्या कष्टाळू भुमीपुत्रांनी आपलं जीवन सुखकर नसलं तरी सुसह्य बनवलं आहे. तिथली जनाता निसर्गाच्या कलाने घेत आपलं जीवन जगत आहे तो पर्यत निसर्गही त्याला साथ देणार पण हा निसर्गाचा आधार आपल्या हातानेच आपण काढून घेतला तर मात्र मग इथे हात द्यायला कुणीच उरणार नाही. 

आगीचे वणवे पेटले की तिथली निसर्ग संपदा नष्ट होते. ही निसर्ग संपदा म्हणजे केवळ झाडंच नसतात तर त्यांच्या आश्रयाने रहाणारे हजारे प्राणी, पक्षी, जीव-जीवाणू, सरपटणारे प्राणी, किटक, मुंग्या, अनेक सुक्ष्म प्राणी या सर्वांचीच आहूती दिली जाते आणि त्यांचा आधीवासच नष्ट केला जातो. किती तरी जाती कायमच्या नाहीशा होतात. हे नुकसान तर पुन्हा कधीही भरून येणार नसतं.   उत्तराखंडाचे तांडव आता हिमालयातील सर्व राज्यांसाठी धोक्याची घंटा ठरली आहे. गंगेसारखे रौद्र रुप जर ब्रम्हपुत्रेनं घेतलं तर तिथल्या अनेक राज्यात उत्पात घडू शकतो. विनाशाच्या या इशार्‍यांनी आपण जागे होणार आहोत का हा खरा प्रश्न आहे. भारतात दरवर्षी दहा लाख हेक्टर जंगल नष्ट होत आहे असा अभ्यासकांचा अंदाज आहे. आपल्या पश्चिम घाटाचीही अशीच घुसमट होत आहे. सह्याद्रीच्या कुशीत चंगळनगर्‍या उभ्या राहात आहेत. जैवविविधतेचं जागतिक वारसास्थळम्हणून घोषीत झालेल्या याच सह्याद्रीच्या संदेदनशील भागाचं संरक्षण, संवर्धन करण्यासाठी सुचवलेल्या उपायांकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करून त्याला विरोधही करण्यात येत आहे. पश्चिम घाटाच्या दर्‍या-डोंगरामधून रस्त्यांची, शहरीकरणाच्या प्रकल्पाची कामं होवू घातली आहेत. कोकणातल्या स्थानिक जनतेचा विरोध डावलून धनदांडग्यांचं हित जपलं जात आहे. माथेरानचा ४९८ चौरस कि.मी.चा टापू २००२ च्या फेब्रुवारीत पर्यावरण संवेदनशीलम्हणून घोषीत केला गेला आणि २००३ मध्ये  मात्र ते क्षेत्र २१५ चौरस कि.मी.वर आणलं गेलं. महाराष्ट्रातल्या सर्वच नद्यांच्या पात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असून बारमाही वाहणार्‍या कित्येक नद्या आता पावसाळ्यातच तग धरून असतात आणि पाऊस निघून गेल्यावर कोरडया पडतात. नदी पात्रात सोडण्यात येणार्‍या रासायनीक द्रव्य आणि मळीमुळेही इथला आधीवास धोक्यात आला आहे. अवैध खाणींच्या मुद्द्यावरून गोव्यातील खाणी गेली दोन वर्ष बंद आहेत. पण त्या  आधीच केलेल्या अनिर्बंध खोदकामामुळे तिथल्या निसर्गाची पर्यायने जनसामान्यांच्या सपत्तीची फार मोठी हानी झाली आहे. जैवविविधतेच्या आणि अन्नसाखळीच्या वरच्या  स्थानावर असलेल्या वाघांच्या संखेत वेगाने होणार्‍या गळतीमुळे ती साखळीच धोक्यात येणार आहे. या सर्वाचे तिव्र आघात इथल्या जैवविविधता,  हवामान,  पूरस्थिती,  लोकांची उपजीविका, सुरक्षितता यावर होत असतो याचं भान वेळीच ठेवलं गेलं नाही तर हिमालयातली सुनामी सह्याद्रीत यायला वेळ लागणार नाही. पर्यावरण संवर्धन आणि जतन ही आता लोक चळवळ झाली पाहिजे.  

आगीच्या वणव्यात जळणारी ही जंगलं हवामान बदलालाही आमंत्रण देत आहेत. नुकताच अर्धा अधिक महाराष्ट्र गारपीटीने चेचून निघाला. उभी शेतं भूईसपाट झाली, हजारे उडते पक्षी प्राण गमावून बसले, तीच हालत उघड्यावरच्या जनावरांचीही झाली. त्या आस्मानी मार्‍यापासून माणूसही सुटला नाही. नुकतंच जरा थांबलेलं आत्महत्येचं सत्र पुन्हा सुरू झालं. विनाशाला आपण थांबवू शकत नसलो तरी त्याला निमंत्रण तरी देता कामा नये. नैसर्गिक संकट आलं की मग मागे वळूनही पाहाता येत नाही.


11 September, 2014

यांचं काय झालं?








दरवेळी लडाखला जाताना एक दिवस श्रीनगरला रहायचो, मुख्यत: नगीन लेकच्या हाऊसबोट मध्ये. २००७ पासूनचा हा रिवाज या वर्षीही जुलै महिन्यात पाळता आला. आयबीएन लोकमतची टीम बरोबर असल्याने यावेळी आत्मा आणि मी एक दिवस लवकर श्रीनगरला गेलो होतो. आयबीएनची अमृता आणि कॅमेरामन रमेश सोबत होते तशाच रेणू दिदिही होत्या. नगीन लेकच्या संथ पाण्यातून निवांत गप्पा मारत फेरफटका मरला आणि संध्याकाळी हाऊस बोटमध्ये बसून श्रीनगरचं सौदर्य न्याहाळताना आयुष्यातले आनंदाचे अमुल्य क्षण अनुभवले.

त्याच श्रीनगरमध्ये आज हा हाकार उडाला आहे. अख्खं श्रीनगर पूराच्या पाण्याने वेढलं आहे. काही जीव गेले, उरलेले वाचण्यासाठी धडपड करीत आहेत.                      

त्या दिवशी तलावातल्या बदकाकडे बोट दाखवत रेणू दिदि म्हणाल्या होत्या “एकट्याने सगळ्या जीवनसंघर्षातून तरून जाण्याची निसर्गाची मूळ प्रवृत्ती आहे. ते बदक बघा एकटंच फिरतय.” तेव्हा कुठे माहित होतं की काही दिवसात हा संघर्ष आणखी तेव्र होणार ! निसर्गानेच एका प्रहारात दल लेक,  नगीन लेकची वाताहात करून टाकली. कुणालाच फोन लागत नाही, कशाचाच पत्ता नाही. तिथल्या हाऊस बोट, शिकारे यांचं काय झालं?



                       


06 May, 2014

कावळ्याचं घर आहे शेणाचं


खिडकी बाहेरच्या झाडावर काल कावळा घरटं बांधत होता. आजूबाजूच्या काटक्या जमा करून त्याचं ते काम चाललं होतं. उंच अगदी झाडाच्या टंशीवर त्याने घर बांधायला घेतलं होतं. म्हटलं यंदा पाऊस लवकर येणार आणि भरपूरही पडणार. पक्षांनी उंचावर घर बांधलं की पाऊस भरपूर, मध्यावर बांधलं की मध्यम आणि खाली बांधलं तर कमी पाऊस पडणार असं म्हटलं जातं. पक्षांना हवामानाचा अंदाज येतो, पावसाच्या आगमनाची वेळ कळते असं म्हणतात. ते खरंही असलं पाहिजे नाही तर त्याना जगणं मुश्किल होईल. (तसं ते आज झालंही आहे. सोसायटीने आजच झाडांची छाटणी केली आणि कालपर्यंत पक्षांनी सुरक्षीत ठरवलेली जागा उजाड करून टाकली.)

भारतीय शेती ही मांसूनवर अवलंबून असते आणि आपला शेतकरी त्या मान्सूनचा अंदाज निसर्गात होणार्‍या बदलांवरून पुर्वांपार करीत आला आहे. हल्ली सरकारी खाती शेतकर्‍यांना मदत केल्याचा आभास निर्माण करतात आणि त्याला आणखी खोलात ढकलण्याचं कर्म करतात. राजकारणाचा धंदा झाल्यापासून तर सरकारी (अधिकारी)  कोण आणि सरकार (राजकारणी) कोण हेच कळेनासं झालं आहे. भारतीय हवामान खातं दरवर्षी हवामानाचा अंदाज वर्तवतं. या वर्षीही त्यानी तो वर्तवला आहे आणि यंदा कमी पाऊस पडेत असं भाकीत ऎकण्यात आलं. त्यांचं ते भाकीत दरवर्षी खोटं ठरतं तसं यंदाही ठरो. हवामान खात्याच्या कावळ्यांच शेणाचं घर या वर्षीच्या पावसात आणि सोळा तारीखला लागणार्‍या निकालात वाहून जावो.   

मित्रहो ते भाकीत खोटंच आहे आणि यंदा कमी पाऊस पडेत असं त्यानी मुद्दाम ठसून सांगितलं आहे कारण त्या अंदाजाच्या आड राहून त्यांना भ्रष्टाचार करता यॆणार आहे किंवा त्या भ्रष्टाचाराची पार्श्वभूमी त्यानी तयार केली आहे. अवर्षण, महापूर या सारखी संकटं म्हणजे चंगळ अस समिकरण हल्ली सरकारी पातळीवर रुढ झालेलं आहे. पण अशी संकटं येवो अथवा न येवो आपली झोळी भरली गेली पाहिजे म्हणून नेपथ्य करायचं आणि मग ठरवलेलं नाटक वठवायचं हा शिरस्ता झाला आहे. पाऊस कमी पडला तर मग कृत्रीम पाऊस पाडता येईल, तो पाडण्यासाठी विमान खरेदी करावं लागेल, विमान खरेदी करायच म्हणजे मग त्याचा उपयोग करून पाऊस पडला काय न पडला काय, पण आपले हात तर ओले होतील, असा आपल्या फायद्याचा कुटील विचार करून पाऊस पडणारच नाही असं कारस्थान कागदोपत्री केलं गेलं आहे. हे करताना मग त्याचा परीणाम म्हणून  दुष्काळ पडणार सांगितले तर शेअर बाजार कोसळेल, परकीय गुंतवणूक कमी होईल, शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या बँका डबघाईला येतील, खते, बी-बियाणे, फवारणीची औषधे, शेतीची अवजारे आदी उद्योगधंदे बंद पडतील, साठेबाजीने महागाई वाढेल, शेतकरी आत्महत्या करतील अशी कारणे देत दरवर्षी, 'सरासरी पाऊस चांगलाच होईल' असे सांगितले गेले. गेल्या पासष्ट वर्र्षांच्या इतिहासात हवामान खात्याने केवळ दोनदाच दुष्काळाची माहिती दिली आणि त्या दोन्ही वेळा दुष्काळ पडला नाही.

मात्र या वेळी हवामान विभागाच्या 'लक्षवेधी' अंदाजांबद्दल शंका येणे रास्त आहे. या वेळी आवर्जून दुष्काळाची भीती निर्माण केली जात आहे. मान्सून सरासरीपेक्षा कमी होणार असल्याच्या भाकितामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, या चिंतेने गुंतवणूकदार शेअर विक्री करू लागले आहेत. यात एफएमसीजी कंपन्यांची जास्त विक्री ग्रामीण भागांत असल्यामुळे पावसाचा त्यांच्या कामगिरीवर परिणाम होऊन त्यांच्या शेअरना लगेच फटका बसला आहे. गारपिटीने आधीच खचलेल्या शेतकऱ्यांना तर धडकी भरविणारा हा अंदाज आहे. असे इतर तोटे झाले आणि शेतकर्‍या बरोबरच देश खड्ड्यात गेला तरी चालेल. सरकारी बाबूंच्या कृत्याचा पर्दाफाश करणारा लेख आजच्या लोकसत्तात आला आहे तो खाली देत आहे जरूर वाचा:    

किरणकुमार जोहरे
Published: Tuesday, May 6, 2014

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजांवर सरसकट शंका घेणे रास्त मानले जात नाही, तरीही तसे करणारा हा युक्तिवाद.. यंदा मान्सून उत्तमच होणार, अशी चिन्हे मांडणारा आणि हवामान खात्याने दूरचे निकष वापरण्याऐवजी स्थानिक स्थितीकडे का पाहिले नसावे, असा प्रश्न विचारणारा..

अर्थशास्त्राचे कोणतेही पुस्तक हेच सांगते की, भारतीय शेती हा फार मोठा जुगार आहे. शेतकरी जिंकण्याच्या आशेवर जुगार खेळतो. जुगाराच्या पटावर एका वेळी शंभर कौरवांनी खेळावे अशी व्यवस्था नसते; तरी शेतकऱ्याचा जणू प्रतिपक्ष बनलेले व्यापारी, दलाल, कर्ज देणाऱ्या बँका, सावकार आदी मंडळी कौरवांप्रमाणे नेहमी फायदाच पाहतात. व्यापाऱ्यांनी व्यापार न करता दानशूर कर्ण बनावे अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल खरे, परंतु नफा कमावताना शोषण होणार नाही अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी करणे यातही काही गर आहे का? द्रौपदीला दावावर लावावे त्याप्रमाणे शेतकरी आयुष्याचे सर्वस्व पणाला लावत असतो.. अशा वेळी हवामान खात्याची भूमिका 'चाणाक्ष शकुनीमामा'प्रमाणे असते.. कशी, ते पुढे पाहू.

पाचवी 'साऊथ एशियन क्लायमेट आऊटलूक फोरम' ('सॅसकॉफ') परिषद पुण्यात झाली. आतापर्यंत सॅसकॉफचे अंदाज नेहमीच चुकले आहेत. परिषदेत भारताने मनाचा मोठेपणा दाखवत स्वत:कडे सरासरीपेक्षा कमी मान्सून ठेवून घेत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश व म्यानमार असा इतरत्र सरासरी मान्सून वाटून दिला. शेतकऱ्यांना घाबरविण्यासाठी हिरवा-पिवळा आलेखाचे प्रसारमाध्यमांना वाटपदेखील झाले. नर्ऋत्येकडून ईशान्येकडे सरकताना कमी असलेला मान्सून अचानक उडी मारत, वायव्य आणि उत्तर ईशान्येला वाढून सरासरी कसा बनतो याचे 'विज्ञान' मात्र अनाकलनीय आहे. आगमनाची तारीख माहिती नाही तरी मान्सूनचे स्वरूप सांगून हवामान विभाग मोकळे झाले.
अधिकृत अंदाजांचे 'गौडबंगाल'

गेल्या ५२ वर्षांपासून 'हवामान संशोधन केंद्र' म्हणजेच 'इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मिटिरिऑलॉजी' (आयआयटीएम) हवामान खात्याच्या उद्धारासाठी व अचूक मान्सूनच्या माहितीसाठी कटिबद्ध आहे. आयआयटीएम व अर्थ सिस्टम सायन्स ऑर्गनायझेशन (ईएसएसओ)ने भारतात वार्षिक सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यानंतर आपल्या हवामान खात्याने (आयएमडी) एक टक्का आणखी घटवत ९५ टक्केच पाऊस होईल अंदाज जाहीर केला. जूनपासून किमान दोनदा बदलाच्या अटी लागू करीत मान्सून अंदाजात फेरफार करण्याचे हक्कही स्वत:कडे राखून ठेवले. सांख्यिकीय मॉडेलने आकडेमोड करीत दिले गेलेले हे अधिकृत अंदाज होय.

डिसेंबर-जानेवारीतील उत्तर अटलांटिक व उत्तर प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानातील फरक, फेब्रुवारी-मार्चमधील विषुववृत्तीय दक्षिण हिंदी महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान, फेब्रुवारी-मार्चमधील पूर्व आशियातील समुद्रसपाटीवरील दाब, जानेवारीचे वायव्य युरोपचे जमिनीलगतचे तापमान आणि फेब्रुवारी-मार्चमधील विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील उबदार पाण्याचे तापमान या पाच घटकांचा वापर करीत हा अंदाज दिला गेला. हेच पाच घटक का निवडले, कन्याकुमारीचे सोडून युरोपच्या जमिनीलगतच्या तापमानाचा भारताशी संबंध किती, तसेच हिमालय व सहय़ाद्री पर्वतरांगांवरील तापमान, वारे, दाब असे भारतीय घटक का आवश्यक वाटले नाहीत..? हे आणि असे प्रश्न 'सर्वज्ञ' हवामान खात्याला कोणीही विचारायचे नाहीत, हा अलिखित नियम आहे.
'फिक्सिंग'चा 'गेम'?

खेळ सुरू होण्याआधीच प्रतिपक्षाने नांगी टाकली की 'बाय' मिळाल्याने न खेळताही दुसरा संघ विजेता ठरतो. खो-खोसारख्या खेळात याला मान्यता आहे. याला 'मॅच फििक्सग' असे कुणी म्हटले तर, यंदा हवामान संशोधन केंद्र आणि हवामान खाते यांनी 'मान्सून फििक्सग'चा 'गेम' केला आहे असेच मानावे लागेल. कारण पाच टक्क्यांपर्यंत त्रुटी असलेले हे अंदाज ९० टक्क्यांपासून १०१ टक्क्यांपर्यंत पावसाच्या सर्व शक्यता देतात. म्हणजे पाऊस कमी होवो, सरासरी (चार महिन्यांत ८७० मिलिमीटर) होवो किंवा नॉर्मलपेक्षा जास्त होवो, आकडेमोडीमुळे हवामान विभागापुढे मान्सूनला नांगी टाकावीच लागेल.

भारतासारखा मान्सून नाही, तरी भारतीय मान्सून अंदाज कसे वर्तवावे याचे धडे भारतीय 'अनुभवी' शास्त्रज्ञांना, अमेरिका व कॅनडा देत आहेत ही मोठी 'आंतरराष्ट्रीय गंमत' आहे. 'अमेरिकन एक्सपरिमेंटल क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर'च्या शास्त्रज्ञांनी १जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी ८८ टक्केपावसाचा निष्कर्ष काढला. त्यासाठी एप्रिलचे केवळ पहिले दहा दिवस निवडले. एकपासून तीसपर्यंत असे वेगवेगळे कमी-अधिक दिवस निवडून कितीही वेगवेगळे मान्सून-निष्कर्ष मिळवता येतील. म्हणजे पाऊस कसाही पडला तरी हवामान खात्याचे अंदाज किती अचूक आणि खात्रीने सुधारले हे पटवून देता येईल हे 'गौडबंगाल'देखील समजून घ्यायला हवे.
या वेळी 'एल निनो'च्या भीतीचा बागुलबुवा उभा केला गेला आहे. पेरू या देशाजवळ, प्रशांत महासागरात पूर्वेला पाण्याचा प्रवाह जास्त गरम झाला की बाष्पीभवन जास्त होऊन पाऊस आधीच समुद्रात कोसळून जातो व मान्सून खराब होऊ शकतो असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे निम्म्या वेळा काहीही प्रभाव न दाखविणारा एल निनो (ख्रिस्ताचा मुलगा असे मच्छीमारांनी दिलेले नाव) प्रवाह १९९७ मध्ये सर्वात उष्ण असतानादेखील भारतातील मान्सूनवर काहीच फरक पडला नव्हता.

कृत्रिम पावसासाठी फासे?
दुष्काळ पडणार सांगितले तर शेअर बाजार कोसळेल, परकीय गुंतवणूक कमी होईल, शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या बँका डबघाईला येतील, खते, बी-बियाणे, फवारणीची औषधे, शेतीची अवजारे आदी उद्योगधंदे बंद पडतील, साठेबाजीने महागाई वाढेल, शेतकरी आत्महत्या करतील अशी कारणे देत दरवर्षी, 'सरासरी पाऊस चांगलाच होईल' असे सांगितले गेले. गेल्या पासष्ट वर्र्षांच्या इतिहासात हवामान खात्याने केवळ दोनदाच दुष्काळाची माहिती दिली आणि त्या दोन्ही वेळा दुष्काळ पडला नाही.
मात्र या वेळी हवामान विभागाच्या 'लक्षवेधी' अंदाजांबद्दल शंका येणे रास्त आहे. या वेळी आवर्जून दुष्काळाची भीती निर्माण केली जात आहे. मान्सून सरासरीपेक्षा कमी होणार असल्याच्या भाकितामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, या चिंतेने गुंतवणूकदार शेअर विक्री करू लागले आहेत. यात एफएमसीजी कंपन्यांची जास्त विक्री ग्रामीण भागांत असल्यामुळे पावसाचा त्यांच्या कामगिरीवर परिणाम होऊन त्यांच्या शेअरना लगेच फटका बसला आहे. गारपिटीने आधीच खचलेल्या शेतकऱ्यांना तर धडकी भरविणारा हा अंदाज आहे.
नेमक्या अशा वेळी, दुसरीकडे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या नावाखाली अब्जावधी रुपयांच्या विमानांकरिता अमेरिकेशी करार करण्यासाठी हवामान संशोधन संस्थेचा अट्टहास सुरू आहे. एक तर, जमिनीवरून अग्निबाणांच्या मदतीने रसायनांचा ढगात मारा करीत पाऊस वाढवायचे व कमी करण्याचे तंत्र रशिया व चीन वापरते आहे; तेव्हा आपण मात्र विमानांकडेच पाहात आहोत. परंतु मुद्दा असा की या विमानखरेदीच्या तुलनेत, समुद्राचे खारे पाणी बाष्पीभवन करीत गोडे करण्यासाठी येणारा खर्च अत्यल्प आहे. त्याच्या काही पटींनी अधिक खर्च करीत कृत्रिम पावसाचा मुंबईकरांसह एकंदर देशावर होणारा 'प्रयोग' खरोखर महाग म्हणायला हवा. विमानाने ढगात जाऊन रसायनांचा फवारा अपघात व अपयश या दोन्हीमुळे घातक आहे. अशा वेळी सरकारने, केवळ 'पांढऱ्या हत्ती'ला चाऱ्याची सोय होईल. त्यामुळे असे निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे.
आकडेमोडीने भीती निर्माण करीत मान्सूनलाच नव्हे तर येणाऱ्या प्रत्येक सरकारलाही हवामान खाते आपल्या तालावर नाचवू पाहात आहे. शेतकऱ्यांचे 'मसिहा' बनत हवामान खात्याला विविध प्रोजेक्ट्सच्या नावाखाली अब्जावधी रुपये जनतेच्या खिशातून यापुढेही ओढता येतील. त्यामुळे नवीन आलेल्या सरकारला हवामान खात्याची 'हवा-ए-अंदाज' सुधारण्यांकडे पाहावे लागेल. राजकीय समीकरणे बदलत असताना हवामान खात्याची भाकिते वैज्ञानिक आधारावर किती आणि राजकीय डावपेचाचा भाग किती याबाबतही नक्कीच 'संशोधना'स वाव आहे.
गारपीट, विजांची वादळे, पक्ष्यांचे स्थलांतर, पक्ष्यांची घरटी बांधण्यासाठीची धावपळ आदी अनेक घटक महाराष्ट्रात मान्सून लवकर व पुरेपूर बरसण्याचे संकेत देत आहे. त्यामुळे घाबरून जाण्याआधी हवामान खात्याची 'हवा' तपासून घ्यायची गरज आहे. 'चीत भी मेरी, पट भी मेरा' असे म्हणत देशभरातील शेतकऱ्यांना नाचविणाऱ्या तरी 'मैं सबसे बडा खिलाडी' अशा आविर्भावात वावरणाऱ्या हवामान खात्यालाही चाप हवा.   
लेखक भौतिकशास्त्र व मान्सूनचे अभ्यासक असून लेखात व्यक्त झालेली मते वैयक्तिक आहेत.

त्यांचा ई-मेल  kkjohare@hotmail.com                                          

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates