24 July, 2021

बारमाही लडाख



अनेक अतर्क्य, अशक्य वाटणार्‍या कितीतरी गोष्टी आत्माराम परब या माणसाने केल्या आहेत असं मी मागच्या पोस्ट म्हटलं होतं ते याचंसाठी कारण ईशा टुर्सने लडाख बारमाही करून टाकलं आहे. मे ते ऑक्टोबर लडाखला सहली तर नेल्याच पण नंतर नोव्हेबर ते फेब्रूवारी आणि एप्रिल अशा सहली नेऊन बहार आणली आहे. 

विंटर लडाखच्या सहली लोकप्रिय करून आणि सोबत चादर ट्रेकचा आनंद देऊन शेकडो पर्यटक लडाखला आणले. २०१८ च्या जानेवारीत अशाच एका सहलीचं नेतृत्व मी केलं होतं. गोठलेल्या नदीच्या प्रवाहावर चालणं आणि वजा ३५ तपमानात तंबूमध्ये रात्री काढणं असा अनुभव व एक आगळीच शक्ती ही सफर देऊन गेली. चादर ट्रेक बरोबरच पोलो ग्राउंडवर झालेला प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मी कधीही विसरू शकणार नाही. वजा २५ तपमानात हजारो लडाखी झेंडावंदनाला आले होते. कडाक्याच्या थंडीत लेह फुलून गेलं होतं. 

गेल्याच वर्षीच्या डिसेंबरमध्ये आम्ही मोजकेच मित्र लडाखला गेलो होतो. महामारीच्या सर्व समस्यांवर उत्तर शोशून आत्माने आम्हाला आग्रहाने तिथं नेलं होतं. तीही लडाखची एक हिवाळी सफर होती. कुठलीच बंधनं नसल्याने आम्ही मनसोक्त लडाख फिरलो. गोठलेल्या प्रवाहावर लोळण घेतली. वाट फुटेल तिकडे गेलो, जेवाचं लडाख केलं.

जपानचा चेरी ब्लॉसम जगप्रसिद्ध आहे, तसाच फुलोरा लडाखच्या अ‍ॅप्रिकॉटच्या झाडांना येतो. सगळी व्हाली फुलून जाते. सहा वर्षांपूर्वी ईशाटुर्सने ‘अ‍ॅप्रिकॉट ब्लॉसम’ च्या सहली सुरू केल्या. त्या मोसमात खरंच स्वप्नातली दुनिया पाहाता येते. 

आणि मग येतो तो लडाखच्या पर्यटनाचा मुख्य सिझन लडाखचा उन्हाळा. लडाखचा उन्हाळा असं म्हटलं तरी तिथे सुखद हवामान असतं. गेल्यावर्षी कोरोनामुळे लडाखमध्ये उन्हाळ्यात जाता आलं नाही, पण या वर्षी मी चाललोय. अगदी काही तासात निघणार आहे. माझी ही लडाखची २१ वी सफर. ही सफर तर होईलच पण तीला लागून लगेच आम्ही झंस्कार व्हालीच्या सहलीला जाणार आहोत. तेव्हा मंडळी आल्यानंतर पुन्हा भेटू, 

वॉर्म-अप साठी हे दहा भाग लिहिले... धन्यवाद.

भाग १: मुक्काम तर येणारच

भाग २: क्यामेरा क्या तेरा

भाग ३: जागेपणीचं स्वप्न

भाग ४: स्वर्गारोहण

भाग ५: पचेल तेच खावं

भाग ६: ब्रो

भाग ७: सीमा रक्षक

भाग ८: युटी (Union Territory) अच्छा है?

भाग ९: आत्मा रंगी रंगलो

भाग १०: बारमाही लडाख




 









20 July, 2021

‘आत्मा’ रंगी रंगलो


 

पहिल्या लडाख सफरीत लडाखला पोचल्यावर दुसर्‍याच दिवशी आत्माराम परब हे वेगळंच रसायन आहे हे आम्हा मित्रांच्या लक्षात आलं. बरोबर आलेल्या प्रत्येकाला सहलीचा पुरेपूर आनंद घेता आला पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. सहलीत कबूल केलेली ठिकाणं सोडून कितीतरी जास्त देण्याचा त्यांचा प्रयत्न पाहून आम्ही चकीत झालो होतो. बोलता बोलता आम्ही सांगून टाकलं की “आम्ही दिलेले पैसे फिटले, आता आमच्याकडून तुम्ही हवं ते काम करून घ्या.” मग शेवटच्या दिवसापर्यंत ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असंच सगळं चालू होतं. श्रीनगरला शेवटच्या दिवशी आता ही सफर संपणार आणि आपले पाय पुन्हा जमिनीवर येणार म्हणून मन खट्टू झालं. पण माझ्या बाबतीत असं व्हायचं नव्हतं, त्या सहलीच्या शेवटालाच माझी एक अनोखी सफर सुरू व्हायची होती.

लडाखहून परत आलो आणि चार-दोन दिवसातच आत्माराम परबांचा फोन आला. काहीतरी कारण काढून त्यानी भेटूया म्हणून सांगितलं, भेटलो. जबरदस्त इच्छाशक्ती आणि अपार उत्साह असलेला हा माणूस अगदी प्रत्येक भेटीत मनाला भिडत गेला. कुठलीही गोष्ट ‘केली’ न म्हणता ‘झाली’ म्हणणारा, मैत्रीला जागणारा, नफा-नुकसानाचा विचार न करता झोकून देणारा, कुणालाही अगदी कुणालाही; बिनधास्त भेटणारा असा हा ‘आत्मा’ आत्तापर्यंत माझ्यासाठी आत्मारम परब होता. पण एका दिवशी बोलता बोलता त्याने “मला माझे सगळे मित्र ‘आत्मा’म्हणून हाक मारतात, तेव्हा तुम्हीही आत्माच म्हणा” असं म्हणाला. मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं पण त्याने हट्ट सोडला नाही आणि मग तो माझ्यासाठीही ‘आत्मा’ झाला. अशी माणसं नशीबात असावी लागतात. आत्माशी मैत्रं जुळलं आणि जीवनातल्या एका नव्या अध्यायाला सुरूवात झाली. त्याच्या पोतडीतून कधी काय बाहेर येईल याचा नेम नाही. कोरोना काळातही लडाख, अजंठा-वेरूळ-औरंगाबाद, बारा मोटेची विहिर, दोनदा कोकण या ठिकाणी त्याने उचलून नेलंच. पण त्याधी अनेक सहलींवर अनेकदा नेलं. घासून घासून टूर लिडर बनवलं. गेल्या पंधरा वर्षात माझ्या परिघाच्याबाहेर नेवून त्या बाहेरची दुनिया दाखवली. 

या आधीच्या पोस्टमध्ये त्याचा आत्माराम परब असा उल्लेख केला त्याकर फेसबूक वर त्याने अभिप्राय दिला तो असा: 

Atmaram Parab

प्रत्येक क्षण डोळ्यासमोरुन जात आहे. किती तरी वेगळी आव्हान होती त्यावेळी पण खूप मजा यायची. कारण सोबतचे पर्यटक सुद्धा त्या आव्हानं कडे एक अनुभव म्हणूनच बघत होते त्यामुळे सर्वच काही सोपं वाटायचं. 2003 मध्ये इशा टुर्स केल्यापासून साधारण 2009 पर्यंत इशा टुर्स मध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची थेट संपर्क होता. आणि तोपर्यंत सहलीला येणारी मंडळी मला "आत्मा" या नावाने हाक देत होती. पुढे त्याचं आत्माजी, आत्मारामजी, सर अशी बरीच विशेषण लागली जी मला आवडत नाहीत.

Narendra Prabhu च्या या लिखाणामुळे ते पुन्हा अनुभवण्याचा आनंद घेतो आहे

त्याच्या बरोबरच्या कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पहिल्याच सफरीत लेहहून कारगीलला जाताना कडा कोसळल्याने वाट अडली होती, दुपारची वेळ, सगळेच सकाळपासूनच्या प्रवासाने दमले होते. गाड्या थांबल्या, याने नेहमीप्रमाणे जाऊन पाहिलं तर काही दगड धोंडे बाजूला केले तर आमच्या गाड्या निघतील एवढी वाट तयार होवू शकेल असं वाटलं. मग काय आत्माने दगड बाजूला करायला सुरूवात केली, तो करतोय ते हे पाहून ड्रायव्हर पुढे झाले आणि दगड बाजूला करू लागले, मग आम्हीही उरतलो, दहा मिनीटात वाट मोकळी झाली आणि गाड्या पुन्हा मार्गस्थ झाल्या. नेतृत्वाचे गुण त्याच्या अंगी भरले आहेत. मी कसं करू? असा प्रश्न त्याला पडत नाही.            

आणखी एक प्रसंग: एकदा असेच आम्ही लडाखची दमछाक करणारी टूर संपवून मुंबईत परतलो. मी घरी आलो आंघोळ केली आणि मोबाईल पहातो तर हा घरी न जाता विमानतळावरून थेट मित्रांना भेटायला गेला होता, निमित्त होतं ‘मैत्री’ दिवसाचं. कसं जमतं हे याला. त्याचे ते फोटो पाहून मी चक्रावून गेलो. मनाला काही भिडलं, भावलं की कविता सुचते तशी ती तेव्हाही सुचली: 

जीवन सुंदर बनवायला तुझ्यासारखा एकच मित्र पुरे
आयुष्यातले थोडेच क्षण तुझ्यासोबत जगलो खरे
त्या क्षणांचा सोबती मित्रा तुच होतास
थोडा कमी किंवा थोडा जास्तही नव्हतास

जगता जगता एक दिवस तू मला भेटलास
कसा कोणजाणे पण माझ्या हृदयात बसलास
आता हळूहळू कळतय तू म्हणजे नक्की काय आहेस
कधी भाबडा तर कधी नुसता यार आहेस

मतलबी मिठ्यांची दोस्ती मला कधी जमली नाही रे
पण तू समोर आल्यावर आवेगही आवरता आला नाही रे
म्हणूनच म्हणतो, जीवन सुंदर बनवायला फक्त तुच पुरे
शंभर दोस्तांच्या गरड्यापेक्षा तुझा एकच हात दे रे
नरेंद्र प्रभू
०२/०८/२०१५


कदा असेच आम्ही पुण्याला जायला निघालो, वाटेत मला पिकअप करून गाडी सुरू करताना आत्मा काही तरी शोधायला लागला. फोन करून एक रिंग दिली आणि चला... म्हणून गाडी सुरू केली. मग मी विचारलं काय झालं? तर म्हणाला मोबाईला हरवला बहुतेक. लोणावळ्याला फुड मॉलवर मी म्हटलं, अरे मोबाईल हरवला आणि तू एवढा शांत कसा? तर म्हणाला वैतागून तो कसा मिळणार? मिळायचा असेल तर मिळेलही. 


मित्रांना भेटायचं तर काळवेळ ना पहाता भेटायचंच हा याचा बाणा असतो. अतूल चुंबळे यांना ते अमेरीकेला जायला दुसर्‍या दिवशी निघणार होते तेव्हा रात्री साडेबाराला आम्ही त्याना भेटायला पुण्याला पोचलो होतो. पावसात मुंबईहून निघून गावी पोचताना वाट वाकडी करून वैभवाडीजवळच्या रानातल्या आडगावात, जोरदार पाऊस व रात्रीच्या काळोखात जावून त्या मित्राचं घर शोधून काढलं आणि ‘गावी आलो की येतो’ हे शब्द खरे केले होते. बेभान पावसात देवबागला जावून संजय मोंडकरला भेटणे हे मी विसरू शकत नाही, तसंच त्याचं राज्यपालाना भेटणं, दलाई लामांची भेट या गोष्टीही वेड लावणार्‍याच. जे आत्माला भेटलेत त्यांचेही असेच अनुभव असतील आणि जे अजून भेटलेले नाहीत त्यांनी एकदा भेटून बघाच, या माणसात (आत्म्यात) आपण हरवून जाल हे नक्की. गेली चौदा वर्षं मी त्याचा अनुभव घेतोय. सहली, प्रदर्शन, मेळावे, फोटोग्राफी, ट्रेकिंगपासून गावी एकत्र जाणं, अनेक उपक्रम राबवणं यात आत्माचा सतत सहवास लाभणं ही भाग्याची गोष्ट आहे.

अनेक अतर्क्य, अशक्य वाटणार्‍या कितीतरी गोष्टी या माणसाने लिलया केल्या आहेत, त्यातल्या अनेक ‘लडाख प्रवास  अजून सुरू आहे...’ आणि ‘हे प्रवासी गीत माझे‘ या दोन पुस्तकात लिहिल्या आहेत, ती पुस्तकं जरूर वाचावीत अशी विनंती आहे. 

भाग १: मुक्काम तर येणारच

भाग २: क्यामेरा क्या तेरा

भाग ३: जागेपणीचं स्वप्न

भाग ४: स्वर्गारोहण

भाग ५: पचेल तेच खावं

भाग ६: ब्रो

भाग ७: सीमा रक्षक

भाग ८: युटी (Union Territory) अच्छा है?

भाग ९: आत्मा रंगी रंगलो

'लडाख प्रवास  अजून सुरू आहे...' या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचं प्रकाशन (ऑस्ट्रेलिया)

लडाखचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांच्यासोबत टीम ईशा 









19 July, 2021

युटी (Union Territory) अच्छा है?

अपुर्व उत्सव

सप्टेंबर २०१९ ची टूर ही टूर लिडर म्हणून लडाखची शेवटची सफर झाली. नंतर कोवीड १९ ने सगळेच मार्ग बाधीत केले. (त्यातही आम्ही डिसेंबर २० मध्ये लडाखला गेलोच त्याची एक पोस्ट टाकिनच.) तर त्या लडाख केंद्र शाशीत झाल्या नंतर मी तिथल्या लोकांशी केलेला संवाद खाली दिला आहे.     

१६ सप्टेंबर २०१९

पहाटे चार वाजता गो एअरच्या विमानाने मुंबई सोडली आणि अडीज तासांनी लडाखची धरती सोनेरी सुर्यकिरणात माखून निघालेली दिसायला लागली. लडाखचं विहंगम दृष्य पाहून नवख्याला तो रुक्ष प्रदेश वाटेल, पण मला त्याचे अंतरंग चांगलेच परिचयाचे होते. या सप्टेंबरमध्ये १९व्या वेळी जातानाही मला त्याचं तेव्हढंच आकर्षण होतं जेवढं आत्माराम परब यांच्या सोबत दिलेल्या पहिल्या लडाख भेटीच्या वेळी होतं. मात्र कलम ३७० हटवल्यानंतर ची ही माझी पहिली भेट. या वेळी नेहमीप्रमाणे श्रीनगरला न जाता मुंबईहून थेट लेह गाठलं. हवेत चांगलाच गारठा होता. लडाखच्या हिवाळ्याला नुकतीच सुरूवात झाली होती. विमानतळाबाहेर नुरबू हा तरुण लडाखी मित्र स्वागताला हजर होता. विमानतळावर नेहमीचा उत्साह आणि आपुलकीचा भाव जाणवत होता. नुरबू बरोबर लेह गाठलं. हॉटेल मुन्शी कॉन्टीनेंटलचे व्यवस्थापक राजन शर्मा हसत मुखाने सामोरे आले. कुठेही कलम ३७० हटवल्याचा तणाव किंवा कुठलाच वेगळेपणा जाणवत नव्हता. लेह आपल्याच नादात मस्त होतं.

थोडी विश्रांती झाल्यावर स्वागत कक्षात राजनजींशी गप्पा रंगल्या असतानाच तिथे बसलेल्या एका इसमाकडे लक्ष गेलं. थोड्याच वेळात “कैसे हो?” विचारत त्याच्याशी गप्पांना सुरवात झाली. हा माणूस भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना न्यायला आलेल्या टॅक्सीचा चालक होता. तो कधीही निघून जाईल म्हणून मी लगेच विषयाला हात घातला, अर्थातच मला लडाखला केंद्रशाशित प्रदेश बनवलं गेलं त्याबद्दल त्याचं मत विचारायचं होतं.

मी:   युटी (Union Territory) अच्छा है?

तो:    हा! अच्छाही है हमारे लिए।

मी:   क्यु ?

तो:   अब हमे श्रीनगर नही जाना पडेगा. इधरही अच्छा स्कुल खुलेगा।

मी:   कितने बच्चे है आपके?                     

तो:    छे।

मी:   किधर रहते हो?

तो:    इधर ही, लेह।

मी:   गाव किधर है आपका?

तो:    तुरतुक।

मी:   नाम क्या है?

तो:    हसन

मी:   सब इधर पढते है?

हसन: नही, दो गावमे है।

मी:   उधर स्कुल है?

हसन: हा... है, सेना चलाती है।

मी:   कितना खर्चा आता है,

हसन: जादा कुछ नही, सब सेना उठाती है।

मी:   सरहद के उसपार आना जाना होता है?

हसन: नही, वहा हमारे रिश्तेदार है, कभी मिलना है तो बाघा बॉर्डर से आते है।

मी:   हम उसे अटारी बॉर्डर कहते है।

हसन: वही, उधरसे आते है, बडी तकलिफ़ मे है, बहोत महंगाई है उधर, कुछ नही मिलता.

मी:   आपका एमपी कौन है?

हसन: जेटीएन (जामयांग त्सेरींग नामग्याल)

मी:   उधरभी वही?

हसन: हा पुरे लडाख मे एकही खासदार है।      

मी:   वह कुछ करेगा आपके लिये?

हसन: हा करेगा ना!

हसन नाव सांगितलं नसतं तर तो थेट लडाखी बौद्ध दिसत होता. पहिल्याच दिवशी जमिनी हकिकत समजत होती.

१७ सप्टेंबर २०१९

सकाळी लवकर उठून कारगिलला जायला निघालो. वाटेत पथ्थरसाहेब गुरूव्दाराला थांबलो. भारतिय जवानांकडून चालवल्या गेलेल्या या शिखांच्या पवित्र गुरुव्दारात प्रसाद तर मिळालाच पण तिथल्या जवानांकडून नास्ता घेण्यासाठीही आग्रह होत होता. परंतू तिथे न थांबता पुढे निघालो. आता थेट द्रासचं कारगिल युद्ध स्मारक गाठायचं होतं. मॅग्नेटीक हिल, सिंधू-झंस्कार संगम, मुनलॅंड, लामायुरू, फोटू-ला, नमकि-ला, मुलबेक करत कारगिलला पोहोचलो. कारगिल बाजारपेठेत थोडा ट्राफीक जाम होता. सगळी बाजारपेठ गजबजलेली होती. ती मागे सारत द्रासा गावातलं कारगिल युद्ध स्मारक गाठलं. स्मारकापुढे नतमस्तक होऊन पुन्हा कारगिलला हॉटेलमध्ये आलो. सगळी आवराआवर झाल्यावर हॉटेल मालक सादीकभाईंची (यांनी कारगिल युद्धाच्या वेळी भारतीय नागरीकांना, पत्रकारांना, सरकारी अधिकार्‍यांना आपल्या हॉटेल्मध्ये आसरा दिला होता.) भेट घेतली. सलाम-दुवा झाल्यानंतर रात्री निवांतपणे बोलायला सुरूवात केली.      

मी:         युटी (Union Territory) अच्छा है?

सादीकभाई:   अभी तो सब असमंजस मे है।

मी:         क्यो?

सादीकभाई:   आगे क्या होता है देखते है!   

मी:         क्यो? कुछ होने वाला है?

सादीकभाई:   नही... वैसी बात नही है। अभी सब शांती तो है, लेकिन श्रीनगर मे सब पाबंदी हटने के बाद मालूम पडेगा। कुछ लोग जो अपने नेता की बात मानते है वह हालात बिघाडनेकी कोशीश करेंगे। ३७० हटनेके बाद हॉटेल खाली पडा है। धंदा चौपट हुवा है। अब देखते है आगे क्या होगा। १९९० मे श्रीनगर मे मिलिटंसी शुरू हो गयी। लगातार पंद्रह साल हालात बिघडते चले गये। यहा कोई नही आता था। फीर २००४ से कुछ सुधार होने लगा। १५ साल मिलिटंसीने खाये, उसके आगे यह एक साल कुछ नही है। लेकीन वादे पुरे होने चाहीये। लोग बेचैन है।

मी:         बाकी हॉटेलवाले क्या कह रहे है?

सादीकभाई:   सब देखना चाहते है, आगे क्या होगा?

मी:         आपको भरोसा क्यो नही है की सब अच्छा होगा? 

सादीकभाई:   क्युकी ७० साल मे कुछ नही हुवा, अब मोदिजी कह रहे है... होगा। सब देखना चाहते है। होगा तभी मान जायंगे। बोलने से क्या होता है? जमिनी हालात सुधरने चाहिये। अब श्रीनगरसे यहा कोई नही आता है। मतलब सैलानी नही आते है।

मी:         हम लोग भी श्रीनगरसे आनेवाले थे, लेकीन डायरेक्ट लेह आये और अब यहा कारगिल पधारे है।     

सादीकभाई:   इंशाअल्ला सब ठिक होगा।

मी:         होना चाहिये। हॉटेल ओनर्स असोसियशन क्या कर रहा है? कुछ रिप्रेझेंटेशन दिया की नही?      

सादीकभाई:   देंगे तो भी किसको देंगे?

मी:         अभी ले. गव्हर्नर आजायेंगे उनको देना।

सादीकभाई:   अब सब अगले सिझन के इंतजार मे है।  

१८ सप्टेंबर २०१९

कारगिलहून निघालो, वाटेत खालसरला थोडं थांबलो, अक्रोड घेतले आणि पुन्हा लेह गाठलं. सगळीकडे सामान्य व्यवहार सुरू होते. कसलाही तणाव नव्हता.

१९ सप्टेंबर २०१९

आज सिंधू व्हालीत फिरायचं होतं. थिकसे मॉनेस्ट्रीला गेलो, तिथे बौद्ध धर्मगुरू दलायी लामा यायचे होतो म्हणून लगबग चालली होती. मनाली-लेह मार्गावर नेहमी प्रमाणे वाहतूल सुरू होती. लेह बाजार, हॉल-ऑफ-फेमला पर्यटक नेहमी सारखेच गर्दी करून होते.

२० सप्टेंबर २०१९

नुब्रा व्हालीत प्रवेश करायच्याआधी खारडुंग-ला हा जगातला सर्वोच्य मोटरेबल रोडवरचा पास  सामोरा येतो. तिथे पर्यटकांची गर्दी होती. नुब्रा व्हालीत स्थिती सामान्य होती.

२१ सप्टेंबर २०१९

ब्रॉड बॅन्डची लाईन टाकण्याचं काम 

हुसेन बेग, तुरतूक 
काही पर्यटक मित्र नुब्रा मधून तुरतूकला जायला निघाले. आम्ही शेयॉक मार्गे पॅगॉन्ग लेक कडे निघालो. वाटेत ब्रॉड बॅन्डची लाईन टाकण्याचं काम जोरात सुरू होतं. विकासाची पावलं दिसत होती. भारत-तिबेट सिमेवर खडा पहारा देणारे आयटीबीपीचे जवान सिमेकडे निघाले होते. वाटेत लागणरी टांगसे, शक्ती, कारू ही गावं आणि तिथले लडाखी नेहमीप्रमाणे आपापल्या कामात मग्न होते.

२२ सप्टेंबर २०१९

आज लेह जवळच्या साबू गावात फेरफटका मारला. इथे निवृत्त शिक्षक श्री. त्सेरींग नुरबू यांची भेट घेतली. गेली कित्येक वर्ष आपलं निवृत्त जीवन शांतपणे जगणार्‍या या जाणत्या लडाखी माणसाला बोलतं करण्यासाठी तोच प्रश्न विचारला:   

मी:         युटी (Union Territory) अच्छा है?

त्सेरींग नुरबू:  हा बहोत अच्छा है?

मी:         क्यो ?

त्सेरींग नुरबू:  यह हमारी पहलेसेही डिमांड रही है। हमारी भाषा, संकृती, परंपरा, त्योहार, शादी, चाल-चलन आदी सब के सब श्रीनगर व्हाली से अलग है। भारत देश को  आजादी मिलनेके पहले से हम अलग ही थे। हमे किसीने पुछा तक नही की हमे किधर जाना है? हमे व्हाली से जबरन जोड दिया गया। सत्तर साल बित गये हमे न्याय की तलाश थी। अब हमे न्याय मिलेगा। हम खुद हमारा सरकार चलायेंगे। किसीके सामने हाथ फैलानेकी जरूरत नही है। अबा हमारे साथ जाजती नही होगी। भेदभाव नही होगा।               

मी:         क्या जाजती होती थी? कैसा भेदभाव?

त्सेरींग नुरबू: एकही PRC की बात देखो।   

मी:         PRC ख्या है?

त्सेरींग नुरबू: परमनंट रेसिडेंट सर्टीफिकेट मतलब PRC, यह नही होगा तो सरकारी नौकरी नही मिल सकती। हमे पिआरसी पाने के लिये बहुतही लडना पडता था। चार पिढीयोंका नाम सरकारी जमिन-खाता मे होगा तोही किसीभी लडाखी को पिआरसी मिलता था वर्ना नही। मा का नाम होने से भी नही मिलता था। कोई घर जमायी किया और वह हिमाचल प्रदेश या तिबेट से होगा तो उसे पिआरसी नही मिलता था। इससे बहोतही दिक्कत होती थी। वही दुसरी ओर पिओके से कोई भी आया और उसने व्हालीवाली लडकीसे शादी की तो उसे तुरंत  पिआरसी मिलता था। यह सरासर अन्याय ही है। अब वह दूर हो गया है।                 

मी:         अब विकास होगा? आप यह मनते है?

त्सेरींग नुरबू: होगा... जरूर होगा। उन्होने... मोदीजीने जो कहा वह किया है। हमे उनपर भरोसा है। उन्होने युटी की बात की थी, वह दे दिया। इतना आसान नही था वह। फिर भी हुवा, युटी होनेसे सब लोग बहोत खुश है। अब विकास होगा। वह भी दिन थे जब मै किसी कारण या काम से श्रीनगर जाता था। वहा पक्की सडक देखता था, ब्रिज देखता था तो मन ही मन मे बहोत दुख होता था। हमारे गाव मे यह क्यो नही है?  यहा, लडाख मे ना पक्की सडक थी, ना ब्रिज। हम लोग पॉपलर के पेड, खंबे डालकर ही काम चलाते थे। कच्ची सडक थी। सब पैसा व्हालीवाले खा जाते थे।

            श्रीनगरमे जाते थे तो वहा हमारे साथ दुय्यम व्यवहार होता था। बस मे से उतरने के बाद हमारे पिछे-पिछे दो-तीन कश्मीरी चलने लगते थे। हमे “बोट कनस्पा, बोट कनस्पा” करके पुकारते थे, यह एक गाली है। आखो मी आसू आते थे। कुछ बोला तो मारपीट पर उतर आते थे। सब सहना पडता था। अब हम सही मायने मे आझाद हो गये है। हमे युटी मिल गया है।             

शिक्षक श्री. त्सेरींग नुरबू

असेंब्लीमे हमे सिर्फ २% प्रतिनिधीत्व था। हमे कौन पुछता था? कोई नही। बहोतही बुरी हालत थी हमारी।

            हमे, हमारे बच्चोंको स्कुल मे जबरन उर्दू सिखना पडता था। हमारा क्या ताल्लूख था उर्दू से? हम पर वह थोपी गयी थी। फिर यहा प्रायवेट स्कुल खोले गये, जिसमे उर्दू से छुटकारा मिल गया। हमारे बच्चे वहा सिखने लगे।

मी:         यह सब ठिक है, पर विकास कैसे होगा?  

त्सेरींग नुरबू: क्यु नही होगा? अब दिल्ली से यहा डायरेक्ट पैसा आयेगा। विकास होगा। अब लुटपाट नही होगी। हमारी सरकार होगी, ले.गव्हर्नर होगा। दादरा नगर-हवेली, पॉन्डेचरी मे विकास हुवा है। यहा भी होगा। सरकार अब ध्यान दे रही है। दिल्ली मे नयी सरकार बनतेही रक्षा मंत्री राजनाथ सिंह यहा पधारे थे। प्रधान मंत्री मोदी खुद चार बार यहा आये है। उन्होने जो कहा वह किया। अब हमारा हक कोई नही छिन सकता।             


त्सेरींग नुरबू भारावलेले होते. किती सहन केलं त्यांनी. १९६३ साली पॅगॉन्ग लेक जवळच्या शाळेत त्याची बदली झाली होती. लेहहून चालत निघाले की तीन दिवसांनी ते पॅगॉन्गला पोचायचे. मधे भिषण अशा चांगला पासचा त्याना सामना करावा लागत होता. आज त्यांची सुन तिकडच्या शाळेत आहे. कालच आम्ही पॅगॉन्गला जाऊन आलो होतो. रस्ता रुंदी करणाचं काम जोरात सुरू होतं. विकास लडाखच्या दारात, दर्‍या खोर्‍यात पोचला आहे.

२३ सप्टेंबर २०१९

दुपारचा साडे अकरा बाराचा सुमार होता. शांती स्तूपाच्या पायथ्याशी असलेल्या द पॅलेसमध्ये थोड काम होतं. त्या हॉटेलच्या दारात भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावलेली मोटार उभी दिसली. हळू हळू आणखी वहानं आली. त्या मोटारीच्या चालकाला बोलतं केलं.            

मी:   आपका नाम क्या है?            

तो:    डोरजे.      

मी:   डोरजे यहा कैसी रॅली है?

डोरजे: हम पंचायत चुनाव जित गये है।

मी:   तो क्या हुवा, इतना जल्लोश क्यु है?           

डोरजे: युटी मिला गया है? 

मी:   युटी (Union Territory) अच्छा है? 

डोरजे: हा अच्छा है। 

मी:  उससे क्या होगा?

डोरजे: दिल्ली से यहा डायरेक्ट पैसा आयेगा।

मी:   उस पैसेसे क्या होगा?  

डोरजे: स्कुल बनेगा, कॉलेज बनेगा, अस्पताल बनेगा। 

मी:   कौन बनायेगा?

डोरजे: मोदीजी, अमित शहाजी  

मी:   यहा कोई नही है?

डोरजे: है ना, हमारा जेटीएन  (जामयांग त्सेरींग नामग्याल) है।    


थोड्याच वेळात लेहच्या मॉल रोडवर लडाखचे खाजदार जामयांग नामग्याल मिरवणूकीने येताना दिसले. एक छोटीशी सभा झाली. भारत माता की जय चा जय जयकार झाला. वातावरणात कमालीचा उत्साह होता. 

२४ सप्टेंबर २०१९

लेह विमनतळावरून विमानाने श्रीनगरकडे झेप घेतली. श्रीनगरच्या विमानतळावर उतरताना खिडकीच्या झडपा बंद करण्याच्या सुचना दिल्या गेल्या. विमानात अंधार पसरला. बाहेर उजेड असताना आत मात्र अंधार होता. हा केलेला अंधार होता. श्रीनगरमध्ये कित्येक वर्षं कोंबडा झाकलेला आहे त्याची जणू ही प्रतिकात्मक बाजू होती. लडाखने प्रकाशाकडे झेप घेतली असताना श्रीनगर मात्र चाचपडत होतं. घरी आलो तेव्हा टिव्हीवर बातमी होती श्रीनगर खोर्‍यातल्या सफरचंदाच्या बागेतून सरकारने थेट खरेदी चालवली असून तीन दिवसात बॅंक खात्यात पैसे जमा होत आहेत. आता तरी त्यांच्या डोक्यात प्रकाश पडूदे. उजाडूदे. लक्ख प्रकाश पडूदे.          

18 July, 2021

सीमा रक्षक


द्रास युद्ध स्मारक


द्रास येथील युद्ध स्मारकाला पहिली भेट



लेहला पोचलो तेव्हाच आत्तापर्यंत पाहिलेला नजारा डोळे दिपऊन टाकणारा वाटला होता. असा प्रदेश, अशी माणसं कधीच पाहिली नव्हती. सगळंच अद्भूत होतं. क्षणोक्षणी श्वास कोंडायला लावणारे रस्ते आणि खडा पहारा देणारे सैनिक. देशाच्या इतर भागात फिरताना सैनिकांचा वावर क्वचितच आढळून येतो. पण एकूणच लडाखमध्ये अर्धीअधिक लोकसंख्या ही केंद्रीय कर्मचार्‍यांची असते आणि त्यात लष्कर, सीमा सुरक्षा दल (BSF), सीमा सडक संघटन, सीआयएसफ (Central Industrial Security Force), आइअटीबीपी (Indo-Tibetan Border Police), Special Frontier Force (SFF) इत्यादी लष्करी आणि अर्धलष्करी दलं लडाखमध्ये कार्यरत आहेत. या जवानांना पाहिलं की आपला ऊर अभिमानाने भरून येतो.                    

लडाखच्या मॉलरोडवर गप्पा करत चालत असताना दोन सैनिकांनी आम्हाला थांबवलं आणि कुठून आलात अशी चौकशी केली. मुंबई असं सांगितलं तेव्हा त्यानी हात मिळवून बोलायला सुरूवात केली. ते नाशिक आणि सांगलीचे होते. पाचेक मिनिटांचा तो संवाद कायम आठवत राहातो. आपल्या कुटूंबापासून हजारो मैल दूरवर सीमेवर पहारा देणार्‍या सैनिकांना आपल्या घराची तर आठवण येतेच पण मातृभाषेत बोलाणारा भेटला की किती बोलू आणि किती नको असं होतं. २००७ साली लडाखमधून फोन लावणं हे एक दिव्य असायचं. एक तर समोरच्याला  बोलणं उशीरा ऐकू यायचं किंवा पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसरा विचारल्यावर मिळायचं. अशा परिस्थितीत सैनिक आपल्या माणसाशी बोलायला फार आसावलेले असायचे. त्या चार-पाच वर्षात ईशा टूर्सने सैनिकांना भेटण्याचे अनेक कार्यक्रम आखले आणि तो सिलसिला आजपर्यंत कायम आहे. मग कारगील विजय दिन, रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन सोहळा अशा दिवसांचं औचित्य साधून सहली नेणं, सैनिकांशी संवाद साधणं असे कार्यक्रम सुरू झाले. 

लडाख सहलीत द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट देणं हा एक भावूक क्षण असतो. तोलोलींग टेकड्याच्या पार्श्वभूमीवर डौलाने फडकणारा तिरंगा, शहीद स्मारक, कॅप्टन मनोज पांडे गॅलरी, विजय स्मारकाचा परिसर, दूरवर दिसणारी टायगर हिल, कॅप्टन विक्रम बात्रा पॉईंट हे सर्व पहाताना मन हेलावून जातं आणि अभिमानाने उर भरून येतो. द्रास युद्ध स्मारकाला दिलेली प्रत्येक भेट वेगळी असते. खास नमूद करण्यासारख्या दोन भेटी म्हणजे जुलै २००७ आणि ऑगष्ट २०१० ची. २६ जुलै २००७ ला आम्ही लेह-कारगील असं करत द्रास येथील युद्ध स्मारकाजवळ पोहोचलो तेव्हा तिथे मिलिटरी पोलिसांनी गाडी उभी करायलाही मनाई केली. नाइलाजाने आम्हाला निघावं लागलं, स्मारकापासून दोन किलोमिटरवर शे-दिडशे जवान दिसले म्हणून गाडी थांबवली तर ते ही त्या दिवशीच्या सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी म्हणून श्रीनगरहून अधिकृतरीत्या आले होते, पण त्यानाही थोडा उशीर झाला म्हणून पुढे जायला मज्जाव करण्यात आला होता. मग आम्ही तिथेच सैनिकांची भेट घेतली. साधारण आर्ध्या-पाऊण तासाने वॉर मेमोरीयलवरून निरोप आला आणि ते तिकडे जायला निघाले, त्यांच्या मागोमाग आम्ही पुन्हा मागे गेलो, आता मात्र आम्हाला प्रवेश देण्यात आला आणि फळांचा रस देऊन स्वागतही केलं गेलं.                                    

ऑगष्ट २०१० मध्ये वॉर मेमोरीयलजवळ पोचायलाच रात्रीचे १० वाजून गेले होते. त्या काळोखातही आम्ही तिथे गाड्या थांबवल्या आणि फक्त दर्शन घेवून निघतो म्हटलं. तिथल्या प्रमूख लष्करी अधिकार्‍यापर्यंत निरोप पोचला आणि आम्हाला पाच मिनीटं थांबायाला सांगण्यात आलं. संपूर्ण वॉर मेमोरीयलला वीज पुरवठा करणारे जनरेटर सुरू करण्यात आले.   सगळा परीसर प्रकाशला आणि मग सर्वांनी मनसोक्त पहाणी केली. 


६ ऑगष्ट २०१९ रोजी, भारत सरकारने जम्मू-काश्मीरला भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये मंजूर केलेला विशेष दर्जा किंवा मर्यादित स्वायत्तता रद्द केली, त्या आधी २५  जुलैला आम्ही लडाखची टूर घेऊन श्रीनगरला दाखल झालो होतो. श्रीनगरला भारतीय लष्कराची जबरदस्त हालचाल दिसून येत होती. काहीतरी घडणार आहे याची चाहूल लागली होती. तेव्हाचा तो माहोल आणि मग सप्टेबरमध्ये मी पुन्हा लेहला गेलो तेव्हाचा नजारा दोन्ही कायम लक्षात रहाण्यासारखे आहेत. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने ३७० चं नको असलेलं जोखड फेकून देण्यात आलं होतं आणि लडाखला केंद्रशाशीत करण्यात आलं होतं. लडाखच्या प्रत्येक घरात, रस्त्यावर सगळीकडेच आनंदोत्सव साजरा केला गेला होता. कित्येक पिढ्यांपासूनचं दास्य नाहीसं झालं होतं, त्याचा इतीवृतांत पुढच्या भागात.    












 


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates