04 August, 2020

वनात येता


कोकणाकडे नेणारा रस्ता आणि आत्माने (Atmaram Parab) काढलेले फोटो पहाता पाहाता त्याची कविता बनून गेली...

आठवणीने शहारले मन कधी जावे त्या गावात

धरला रस्ता धावतसे मन गातो मी आनंदात


हलके झाले गात्र गात्र हे सोपी वाटे ही वाट

वार्‍यावर मग स्वार होऊनी इंद्राचा हो हा थाट  

 

विहंग दर्शन दूर दिसे मज हिरवे तळ कोकण माझे

आतुरले मन कधीच गेले निसटून हो हे तन माझे 

 

पाचूने हा हार घातला की घाटामधली ही वाट?

जलदांनी बघ धाव घेतली गर्दी केली हो दाट

 

चितारला हा कुणी देखावा कुणी ओतली बघ रास

कितीक वळणे जरी घेतली तरीही वाटे ती खास

 

इथे थाबूंनी आकाशाने रूप अपुले पाहिले जरी

जळही पाहे रूप कालचे भेटे त्याला उरोउरी


मनातले वन वनात येता उसळे ते कवितेतून

किती पाहिले तरीही उरते त्याचे हे निज दर्शन   



सर्व छायाचित्रे: आत्मारम परब


03 August, 2020

नाव हाकू कुठे?



असे वाटले गाठला हा किनारा 
अशी लाट विक्राळ आता फुटे 
पुन्हा घोर अंधार हा दाटला अन 
वल्हवू कशी नाव हाकू कुठे? 

असा घात आघात जिवावरी हा 
कशी लागली आग वणव्यापरी 
शिंदून पाणी जरी घातले हे 
कळेना कुठे या भरू घागरी  

जिवाला जिवाचा कोरा दिलासा 
सरोनी पुन्हा वाट आता उरे 
आरंभ याचा जेथून केला 
तेथेंच आलो भरे कापरे 

जळून गेले तण ते फुकाचे 
उगवेलना जीव जगण्या आता 
पाऊस आला देऊन गेला 
रुजवेलना कोंब हा मागुता 

23 July, 2020

रंगले आकाश सारे


काल आकाशाने सगळ्यांनाच रिझवलं, मग त्याची कविता झाली. 








रंगले आकाश सारे

या सखीला भुलवणारे

दंगली त्याच्याच रंगी

ती जशी राधाच का रे

 

रंग कुठला भावला

हा प्रश्न होता बावळा

सारेच आले खुलूनी येथे

खेळात रंगे सावळा

 

अन पिसारे फुलवणारे

मेघ ही आले सभोवती

उधळले आभाळ भर ते

रंगूनी रंगात जाती  

 

मग जराशी लाजली ती

लालीमा गालावरी तो

पिऊनी का ते टाकले

की नभ तिलाही रंग देतो

 

नरेंद्र प्रभू

01 July, 2020

करेल उपाय



विठू ठाकलासे उभा विटेवर

सदा माझा भार त्याच्यावर

जरी बंद झाले आज माझे द्वार

मनामध्ये सार माउलीचे

 

सरेल अंतर करेल उपाय

पडेल हा पाय वाटेवरी

पुन्हा दिंडी घेऊन चारी दिशांना

जाईन होईन वाटेकरी

 

जरासा विसावा जरी लाभला हा

नसे थार आता माझ्या जिवा

भ्रमंती जगाची खोळंबली ही

उद्या जाऊया पाहू वाटा नव्या 


03 June, 2020

तुझे सर्वरंगी रुप





तुझे सर्वरंगी रुप उदारा
कळले सांग कुणाला
खेळ तुझा न्यारा  

या ओळींची आठवण करून देणारी आजची संध्याकाळ. सकाळपासून घोंगावणारं वादळ जास्त धक्का न देता निघून गेलं, ढगांनी काळवंडलेल्या आकाशाने प्रकाश आवरता घेतला आणि आम्ही घराच्या खिडक्याही बंद केल्या, एवढ्यात पश्चिम प्रथम केशरी आणि नंतर रक्तवर्णात न्हावून निघाली. दुपारच्या निसर्ग नंतर आताचा हा निसर्ग केवळ अप्रतिम. शेवटचं छायाचित्र पुर्व दिशेचं.    







            

31 May, 2020

आठवणीतलं लडाख



६ वर्षांपुर्वीच्या लडाखच्या फोटोंची आठवण फेसबूकने करून दिली आणि ही कविता सुचली.   


असेल पडले असे चांदणे
हिमात असतील निजले पर्वत
शिखरावरती फडकत असतील
रंग पताका निरोप धाडीत 

असेल किलबील करीत बैसला
पक्षी निराळा निळा-पांढरा
झाडावरती जीवन हिरवे
जर्दाळूला शुभ्र फुलोरा 

असेल बदलत पट रंगांचे 
निळे सरोवर सुवर्ण मंडीत
असतील काहो सुडौल बदके 
लाटांवरती सुरेख डोलत

देतो आहे जवान माझा
खडा पहारा खिंडींमधूनी
असेल का हो कुणी बोलला
शब्द सुखाचा माझ्यावाचूनी?  

असेल बसला मित्र ताशी तो
वाटेवरती लावूनी डोळा
असतील जमले सखे तिथे रे
घेवून येतो अपुला मेळा

नरेंद्र प्रभू   
३१/०५/२०२०  













03 May, 2020

कुत्रे बिस्कीट



कुत्रे बिस्कीट... खुप दिवसांनी आठवली ही बिस्कीटं. तळ कोकणात त्या काळी (आता खरं तर त्याला कोणे एके काळी असंच म्हटलं पाहिजे) पाववाला सकाळीच शहरवजा गावामधून पाव, बिस्कीटं विकण्यासाठी सायकलने फेरी मारायचा. त्याच्या सायकलला घंटी ऐवजी ट्रकला असायचा तसा हॉर्न असायचा. तो पॉsss पॉsss करीत गावभर फिरायचा. पाववाल्याजवळ गिर्‍हाईक यायच्या अगोदर गावातले तमाम कुत्रे जमा व्हायचे. सायकलपासून थोडं  अंतर ठेवून मागून धावत रहायचे. बेकरीतल्या ताज्या पाव-बिस्कीटांचा दरवळ कुत्र्यांना मॉर्निग वॉक करायला भाग पाडायचा. पाववाला पाव-बिस्कीटं विकायला थांबायचा, मध्येच कधीतरी कुत्र्यांच्या दिशेने काही बिस्किटं फेकायचा. पुन्हा सायकलचा पॅडल मारून पॉsss पॉsss करीत रस्त्याला लागायचा.

आता यात कुत्रे बिस्कीटांची महती अशी की ती माणसाला आणि कुत्र्यांना दोघांनाही आवडायची. कुत्र्याला पावही आवडत असणार पण त्याला तो कोण देणार? रुपयाच्या नाण्याएवढीच असलेली ही बिस्कीटं मात्र कुत्र्यांना पाववाल्याकडून किंवा गाववाल्यांकडून मिळायची.

काल ही गोष्ट घरात सांगितली तेव्हा माझी मुलगी विचारायला लागली कुत्र्यांसाठी होती म्हणून त्या बिस्कीटांना कुत्रे बिस्कीटं म्हणायचे का? म्हटलं नाही, तेव्हाचे कुत्रे एवढे माजलेले नव्हते आणि गाववाले श्रीमंत नव्हते. कुत्र्यांना द्यायला ती इवलीशी बिस्कीटंच परवडायची, पाववाल्यामागे बिस्कीटांच्या वासामुळे कुत्रे फिरत रहायचे त्यामुळे असेल किंवा त्याच्याकडून त्यांना ती बिस्कीटंच मिळायची म्हणून असेल त्या छोट्या बिस्कीटांना कुत्रे बिस्कीटंअसं नाव पडलं.

आताचे कुत्रे माणसांनी खायच्या बिस्कीटांना हुंगून बघतात आणि तुम्हालाच लखलाभ होवो अशी चर्या करून निघून जातात. वक्त वक्त की बात है, काळाचा महिमा अघाद आहे. कुत्रंपण खात नाही ते माणूस खातो.                

02 May, 2020

स्वप्नांचा प्रवास






वाटा असती कधी न सोप्या
अवचित कधी ती वाट अडे
कडेकपारी सह्याद्रीच्या
घालून देती हेच धडे

पायवाटा माझ्या झाल्या म्हणत त्या वाटांचंच हमरस्त्यात रुपांतर करीत नसते अवघड काही रे म्हणणार्‍याचीही आज वाटांवरती काटे रे अशी अवस्था झाली आणि न सुटणारं हे कोडं कसं सोडवायचं अशी स्थिती आहे.

खरंच आज वाटा अडल्या आहेत आणि सगळं जगच बंदीवान झालं आहे. पायाला चाकं असलेल्याची तर पार कुचंबणा झाली आहे. पण हेही दिवस जातील आणि पुन्हा एकदा आपण सगळे नव्याने बाहेर पडूच....! आज ही खात्री वाटण्याचं कारण ठरला प्रिय मित्र आत्माराम परब. फेसबुक वॉच पार्टीवर चांगला पाऊण तास या पठ्ठ्याने गप्पांची मैफिल रंगवली. मी पुढे जाणारच या दुर्मम्य इच्छाशक्ती पुढे कोरोना हरेलच पण पुन्हा नव्याने जगभराची भ्रमंती सुरू होईल.  आत्मा बोलत असताना गेला दिड महिना दाटून आलेलं मळभ कुठल्याकुठे नाहीसं झालं आणि नव्या वाटा पुन्हा साद घालू लागल्या. त्याचं बोलणं सुरू असताना येणार्‍या  प्रश्नांवरून हे लक्षात येत होतं. मित्रहो मन प्रसन्न करणारे खुप छान क्षण होते ते. आपणही याचा आनंद या लिंकवर जाऊन लुटाच:



              

26 April, 2020

कृतज्ञता




मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारणअसं आपल्या तुकाराम महाराजानी सांगून ठेवलं आहे. हे प्रसन्न मन हे सिद्धीचं साधनही होवू शकतं.

मन गुरु आणि शिष्य । करि आपुलेंचि दास्य ।
प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगती ।।

असं मन प्रसन्न करण्याचं एक कारण काल घडलं.  प्रिय मित्र आत्माराम परब यांनी वेबीनारची लिंक पाठवली आणि पावणे दोन तासांची एक मैफिल जमून गेली. श्री. विभास जोशी (https://pragatileadership.com/team/vibhas-joshi) यांनी या वेबीनारची आखणी आणि सुत्र संचालन केलं होतं. अनेकदा ऐकलेले मुद्दे पण या नेमक्या वेळी खुप छान आणि सुत्रबद्धरितीने त्यानी मांडले आणि मनातली जळमटं दूर करून टाकली. त्यांचा  कृतज्ञता (Gratitude) व्यक्त करणे हा मुद्दा खरच खूप भावला. महिन्याभराच्या बंदमधून पुढल्या किती ते माहित नसलेल्या बंदकडे वाटचाल होत असताना स्थिरचित्त कसं रहावं आणि का रहावं हे ते जाता जाता सांगून गेले. म्हणाले कितीतरी कारणं असतील ज्यासाठी आपण आभार मानले पाहिजेत, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आत्माने अशा अनेक गोष्टीत मला सहभागी करून घेतलं आहे खरंच मी त्याच्या प्रती कृतज्ञ आहे.      

कशाबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे याची यादीच करायाला घेतली तर.... असा विचार केला आणि कितीतरी गोष्टी नजरेसमोर येवू लागल्या. जिवाभावाची माणसं बरोबर आहेत, रहायला घर आहे, जेवण मिळतय, वेगवेगळे पदार्थ करून बघता येत आहेत, विशेष म्हणजे प्रकृती उत्तम आहे, चावलेलं गिळता येतं, खाल्लेलं पचतय, पाय घरात असलेतरी ते चालताहेत, या लॉकडाऊनमधून बाहेर पडून पुन्हा नक्की भभारी घेऊ अशी खात्री आहे, आपण एकमेकांना मोबाईलवर पाहू शकतो; बोलू शकतो, राहून गेलेलं वाचन पुर्ण करू शकतो, शोशलमिडीयाचा वापर करू शकतो, छंद जोपासता येताहेत, याही परिस्थितीत हसू फुलवणारे मित्र आहेत, पक्षी आकाशात उडताहेत, जग थांबलेलं नाही, आपल्या जिवावर उदार होवून डॉक्टर; परिचारीक, पोलिस, सफाई कर्मचारी, किराणा दुकानदार, भाजीवाले, दुधवाले, औषध दुकानदार इ. सगळे आपल्याला सेवा पुरवत आहेत, लहान मुलं निरागसपणे हसताहेत, मुख्य म्हणजे आशा आणि जिद्द कायम आहे, देव पळालेले नसून कुणीतरी काळजी घेतय, मन मोकळं करायला मित्र नातेवाईक आहेत, गाणी-गोष्टी ऐकू शकतो, व्यायाम- योगासनं करयला भरपूर वेळ आहे,  ध्यान लावू शकतो, कुटुंबाला वेळच वेळ देवू शकतो ही यादी आणखी वाढवू शकतो या सगळ्या गोष्टींबद्दल  मी आज  कृतज्ञ आहे. घरात बंद झालो असलो तरी आनंदी आहे. कोरोनावर उपाय सापडेलच पण त्याला मनावर स्वार व्हायला द्यायचं नाही हे आपल्या हाती आहे.    

राजास जी महालीही संत तुकडोजी महाराजांची कविता लहानपणी शिकलो होतो त्या कवितेचा अर्थ आत्ताकुठे समजू लागलाय. त्यातली पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे ही ओळ मनाला भावली.            

नरेंद्र प्रभू 

20 April, 2020

जंगलची वाट - काझिरंगा



काझिरंगा.... लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचलेलं हे राष्ट्रीय उद्यान पहिल्यांदा पाहिलं ते नोहेंबर २००५ मध्ये. आसामच्या विद्यार्थी आंदोलनानंतर राजकीय स्थिती बदलली असली तरी पुन्हा बाबाची संध्या मुळावर आल्यासारखा प्रकार होता. बॉम्बस्फोट, बंद चालूच होते आणि त्या रणधुमाळीतच बायको मुलीसह पुर्वांचलाचा २१ दिवसांचा दौरा करायचं ठरवलं आणि आम्ही निघालोही. कोलकाता, गुवाहाटी फिरत होतो तरी काझिरंगाला पोहोचल्यावर मुक्कामाला आल्यासारखं वाटलं, कारण बाकीची जमतील ती ठिकाणं पहायची पण काझिरंगा बघायचंच असं नक्की केलं होतं. संघ्याकाळी सात सव्वासातला मिट्ट काळोखात काझिरंगाच्या बोनानी लॉजमध्ये पोहोचलो तेव्हा या जंगलाचं स्वरूप लक्षात आलं नव्हतं. कारण त्या आधी दोन तासांचा प्रवास हा काळोखातच झाला होता.


दुसर्‍या दिवशी वरच्या छायाचित्रात दाखवलेल्या वाटेने काझिरंगात प्रवेश केला आणि अजून त्यामधून बाहेर पडता आलेलं नाही. या जंगलाने मनात घर करून ठेवलयं. पुढे अनेकदा आत्माराम परब यांच्याबरोबर इथे जात राहिलो. प्रत्येक वेळी हे जंगल नव्याने उलगडत जातं. हत्तीच्या उंचीचं गवत असलेल्या या नॅशनल पार्कमध्ये रान हत्ती, वाघ, हरणं असे अनेक प्राणी असले तरी इथला राजा आहे तो एकशिंगी गेंडा. त्याचं दर्शन झालं आणि तो पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रुपात दर्शन देत राहिला. पहिल्यांदा पाहिला तो हत्तीवरून सफारी करताना, नंतर संध्याकाळच्यावेळी एका मचाणावर चढण्यासाठी जात असताना काही कळायच्या आत अगदी चार हाताच्या अंतरावर दोन धुडं अचानक सामोरी आली आणि मागोमाग गार्डने घायीघायीत पुन्हा जीपमध्ये बसण्याची सुचना केली. एवढा जवळ आलाय तर फोटो घेवूया असं वाटत होतं पण त्या पेक्षा जिवाची भिती वाटत असल्याने मागे सरलो. पण त्या दिवशी त्याने सर्वांग दर्शन द्यायचं ठरवलं असावं, सुर्य अस्ताला गेल्याने आम्ही माघारी परतताना जीप थांबली कारण गेंड्याचं धुड वाटेलगतच आपल्याच नादात चाललं होतं. आता तर फ़ोटो घेतलेच शिवाय व्हिडीओही घेतला. व्हिडीओ काढातोय म्हटल्यावर त्याने रस्ता ओलांडताना सगळ्या पोज दिल्या. काझिरंगाची भेट सार्थकी लागली. 




                                            

19 April, 2020

जंगलची वाट - ताडोबा




ही ताडोबामधली वाट, हो वाटच... रस्ता म्हणायला इथे माणसाने केलेल्या खुणांपेक्षा जनावरांनी केलेल्या खुणांच जास्त, त्याचंच राज्य आहे तिथे. आपल्यासारख्या माणसांना तिथे खाणाखुणांनीच बोलायचं असतं आणि काही दिसलं की आsssवासायचा असतो. आता यातल्या खाणाखुणा करायच्या सुचना आमचे टुर लिडर रत्नदीप पाटील यांनी दिल्या होत्या तर आsssवासणे हे आपसूकच व्हायचं. असो, तर ताडोबाच्या जंगलात फिरत असताना त्या दिवशी नशीबाने आमची जीप बंद पडली आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळा अनुभव घ्यायची संधी मिळाली. जीपमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करेपर्यंत आम्हाला खाली उतरावं लागलं, एरवी मात्र असं उतरायला परवानगीच नसते. भर दुपारी त्या वाटेवर वाळलेल्या पाल्यापचोळ्यात पाय ठेवला आणि जंगलाने संवाद सुरू केला. मातीची न तुडवलेली ढेकळं बोलू लागली. आम्हाला असे अचानक आपल्या जागेवर उतरलेले पाहून काळतोंडी माकडं आणि त्याची वात्रट पोरं हातातली कामं टाकून का...य? अश्या भावनेने पाहू लागली आणि नंतर य:किंचीत मानव अशा नजरेने आमच्याकडे दुर्लक्ष करती झाली. चार दोन हरणं थोडी थबकली आणि जरा अंतर राखून चरायला लागली. कोतवालाने (Drongo) तर लक्षच दिलं नाही. एरवी गावी कोकणात आम्ही याला किरकावळा म्हणायचो त्यानेही एखादा कटाक्षही टाकला नाही किंवा विविध आवाज काढण्याच्या आपल्या कलेने इतर वन्यजिवांना काही सांगितलंच असेल तर ते आम्हाला कसलं कळणार? या सगळ्याचं काही वाटून न घेता काही फोटो काढले आणि मार्गस्थ झालो. मुक्कामावर आल्यानंतर मात्र आमचा रुबाब बघण्यासारखा होता, कारण आम्ही पुन्हा माणसात आलो होतो. इथे दुर्लक्षण्याची पद्धत वेगळी असते.  





                                      

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates