18 July, 2021

सीमा रक्षक


द्रास युद्ध स्मारक


द्रास येथील युद्ध स्मारकाला पहिली भेट



लेहला पोचलो तेव्हाच आत्तापर्यंत पाहिलेला नजारा डोळे दिपऊन टाकणारा वाटला होता. असा प्रदेश, अशी माणसं कधीच पाहिली नव्हती. सगळंच अद्भूत होतं. क्षणोक्षणी श्वास कोंडायला लावणारे रस्ते आणि खडा पहारा देणारे सैनिक. देशाच्या इतर भागात फिरताना सैनिकांचा वावर क्वचितच आढळून येतो. पण एकूणच लडाखमध्ये अर्धीअधिक लोकसंख्या ही केंद्रीय कर्मचार्‍यांची असते आणि त्यात लष्कर, सीमा सुरक्षा दल (BSF), सीमा सडक संघटन, सीआयएसफ (Central Industrial Security Force), आइअटीबीपी (Indo-Tibetan Border Police), Special Frontier Force (SFF) इत्यादी लष्करी आणि अर्धलष्करी दलं लडाखमध्ये कार्यरत आहेत. या जवानांना पाहिलं की आपला ऊर अभिमानाने भरून येतो.                    

लडाखच्या मॉलरोडवर गप्पा करत चालत असताना दोन सैनिकांनी आम्हाला थांबवलं आणि कुठून आलात अशी चौकशी केली. मुंबई असं सांगितलं तेव्हा त्यानी हात मिळवून बोलायला सुरूवात केली. ते नाशिक आणि सांगलीचे होते. पाचेक मिनिटांचा तो संवाद कायम आठवत राहातो. आपल्या कुटूंबापासून हजारो मैल दूरवर सीमेवर पहारा देणार्‍या सैनिकांना आपल्या घराची तर आठवण येतेच पण मातृभाषेत बोलाणारा भेटला की किती बोलू आणि किती नको असं होतं. २००७ साली लडाखमधून फोन लावणं हे एक दिव्य असायचं. एक तर समोरच्याला  बोलणं उशीरा ऐकू यायचं किंवा पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसरा विचारल्यावर मिळायचं. अशा परिस्थितीत सैनिक आपल्या माणसाशी बोलायला फार आसावलेले असायचे. त्या चार-पाच वर्षात ईशा टूर्सने सैनिकांना भेटण्याचे अनेक कार्यक्रम आखले आणि तो सिलसिला आजपर्यंत कायम आहे. मग कारगील विजय दिन, रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन सोहळा अशा दिवसांचं औचित्य साधून सहली नेणं, सैनिकांशी संवाद साधणं असे कार्यक्रम सुरू झाले. 

लडाख सहलीत द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट देणं हा एक भावूक क्षण असतो. तोलोलींग टेकड्याच्या पार्श्वभूमीवर डौलाने फडकणारा तिरंगा, शहीद स्मारक, कॅप्टन मनोज पांडे गॅलरी, विजय स्मारकाचा परिसर, दूरवर दिसणारी टायगर हिल, कॅप्टन विक्रम बात्रा पॉईंट हे सर्व पहाताना मन हेलावून जातं आणि अभिमानाने उर भरून येतो. द्रास युद्ध स्मारकाला दिलेली प्रत्येक भेट वेगळी असते. खास नमूद करण्यासारख्या दोन भेटी म्हणजे जुलै २००७ आणि ऑगष्ट २०१० ची. २६ जुलै २००७ ला आम्ही लेह-कारगील असं करत द्रास येथील युद्ध स्मारकाजवळ पोहोचलो तेव्हा तिथे मिलिटरी पोलिसांनी गाडी उभी करायलाही मनाई केली. नाइलाजाने आम्हाला निघावं लागलं, स्मारकापासून दोन किलोमिटरवर शे-दिडशे जवान दिसले म्हणून गाडी थांबवली तर ते ही त्या दिवशीच्या सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी म्हणून श्रीनगरहून अधिकृतरीत्या आले होते, पण त्यानाही थोडा उशीर झाला म्हणून पुढे जायला मज्जाव करण्यात आला होता. मग आम्ही तिथेच सैनिकांची भेट घेतली. साधारण आर्ध्या-पाऊण तासाने वॉर मेमोरीयलवरून निरोप आला आणि ते तिकडे जायला निघाले, त्यांच्या मागोमाग आम्ही पुन्हा मागे गेलो, आता मात्र आम्हाला प्रवेश देण्यात आला आणि फळांचा रस देऊन स्वागतही केलं गेलं.                                    

ऑगष्ट २०१० मध्ये वॉर मेमोरीयलजवळ पोचायलाच रात्रीचे १० वाजून गेले होते. त्या काळोखातही आम्ही तिथे गाड्या थांबवल्या आणि फक्त दर्शन घेवून निघतो म्हटलं. तिथल्या प्रमूख लष्करी अधिकार्‍यापर्यंत निरोप पोचला आणि आम्हाला पाच मिनीटं थांबायाला सांगण्यात आलं. संपूर्ण वॉर मेमोरीयलला वीज पुरवठा करणारे जनरेटर सुरू करण्यात आले.   सगळा परीसर प्रकाशला आणि मग सर्वांनी मनसोक्त पहाणी केली. 


६ ऑगष्ट २०१९ रोजी, भारत सरकारने जम्मू-काश्मीरला भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये मंजूर केलेला विशेष दर्जा किंवा मर्यादित स्वायत्तता रद्द केली, त्या आधी २५  जुलैला आम्ही लडाखची टूर घेऊन श्रीनगरला दाखल झालो होतो. श्रीनगरला भारतीय लष्कराची जबरदस्त हालचाल दिसून येत होती. काहीतरी घडणार आहे याची चाहूल लागली होती. तेव्हाचा तो माहोल आणि मग सप्टेबरमध्ये मी पुन्हा लेहला गेलो तेव्हाचा नजारा दोन्ही कायम लक्षात रहाण्यासारखे आहेत. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने ३७० चं नको असलेलं जोखड फेकून देण्यात आलं होतं आणि लडाखला केंद्रशाशीत करण्यात आलं होतं. लडाखच्या प्रत्येक घरात, रस्त्यावर सगळीकडेच आनंदोत्सव साजरा केला गेला होता. कित्येक पिढ्यांपासूनचं दास्य नाहीसं झालं होतं, त्याचा इतीवृतांत पुढच्या भागात.    












 


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates