(दिनांक ११ मे २०२५ रेजी महराष्ट्र टाईम्समध्ये आलेला माझा लेख)
शिव-पार्वतीचं निवासस्थान, गणेशाचं जन्मस्थान आणि म्हणूनच की काय, हिंदूंचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे. आयुष्यात एकदा तरी पाहावीत अशी जगातील कितीतरी ठिकाणं असतील, पण कैलास-मानसरोवरचं स्थान भारतीयांच्या मनात पक्कं घर करून असतं आणि या पवित्र स्थळाचं दर्शन घेण्यासाठी सगळेच आतूर असतात. ‘कैलास’ या शब्दाभोवतीच आध्यात्माचं गूढ वलय आहे. इहलोकाची यात्रा संपवून परलोकात जाणार्याला कैलासवासी म्हणून संबोधलं जातं. ऋषी, मुनींचं वास्तव्य ज्या हिमालयात झालं आणि आजही जगभरातून हजारो लोक साधनेसाठी ज्या ठिकाणी धाव घेतात, त्या हिमालयात एका अढळ स्थानावर कैलास पर्वत उभा ठाकला आहे. पायथ्याला सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा उगम आणि मानसरोवराचं पवित्र जल असलेला विशाल जलसागर आहे. पाहताक्षणी निसर्गाच्या विराट दर्शनानं नतमस्तक व्हावं असं हे ठिकाण आहे. हे विराटरूप म्हणजेच साक्षात शिवशंकर.
मानसरोवरची
उंची समुद्रसपाटीपासून १५,६००
फुटांच्या जवळपास असल्याने, त्याठिकाणी
हाय अल्टीट्यूड सिकनेसचा त्रास होऊ शकतो. साधारणपणे, माणूस दहा हजार फुट उंचीवर गेल्यावर हाय अल्टीट्यूड सिकनेस
(HAS)
किंवा ऍक्यूट माऊंटन सिकनेस (AMS) चा त्रास होऊ शकतो. एवढ्या उंचीवर असलेली विरळ हवा आणि
त्यामुळे असलेला कमी दाब असलेला ऑक्सिजन यामुळे हा त्रास होतो.
मानसरोवरला
१५,६०० फुटांच्या उंचीवर जाण्याच्या आधी, वाटेतल्या एखाद्या गावात एखादी टेकडी चढण्याचा सराव केल्यास, आपल्याला आपली क्षमता समजते. शिवाय, अशा उंचीवर वावरण्याची सवयही लागते. मानसरोवरच्या पुढे
कैलासच्या परिक्रमेच्या तयारीसाठी या सरावाचा नक्कीच फायदा होतो, आणि या भागात कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी, याची उजळणी होते.
तिबेटमधील
डोंगराळ आणि मागास भागातून आपला प्रवास सुरू असला, तरी निसर्ग आणि बदलत जाणारा प्रदेश पाहात असताना मानसरोवरला
पोहोचण्याची ओढ आणखीच वाढत जाते. निसर्गाच्या अफाट आणि बदलत्या रुपामुळे आपली
जिज्ञासा वाढते. आपलं धावणारं वाहन, वाटेत लागणारं एखादं छोटं गाव, आणि मेंढ्या हाकणारे मेंढपाळ, एवढा काय तो चर सृष्टीचा संपर्क; बाकी सगळं कॅनव्हासवरचे चित्र वाटावं असंच दिसतं.
मुक्कामाचं ठिकाणही नेहमीपेक्षा वेगळं आहे, चार भिंती आणि झोपण्या-जेवण्याची सोय. आधुनिक युगापासून चार
पावलं दूर असण्यातली मजा इथेच अनुभवावी लागते. सर्व सुविधांपासून वंचित असलेल्या
या ठिकाणांनी आपलं लक्ष कैलासकडे केंद्रित करणं अत्यावश्यक असतं. सभोवताली विशाल
पसरलेला निसर्ग अनुभवताना आपसूकच मन विरक्त होत जातं.
मैलोनमैल
पसरलेल्या प्रदेशावर नजर फिरवत असतानाच अचानक मानसरोवराची पहिली झलक नजरेस पडते.
आणि आजवर केलेल्या तपश्चर्येचं फलित मिळाल्याचा आगळा आनंद नसानसातून प्रवाहीत होऊ
लागतो. मग तो क्षण जवळ येतो, आपण
मानसरोवराच्या काठावर उभे आहोत, समोर
दूरवर पसरलेलं निळ्याशार जलाने भरून वाहणारं मानसरोवर आहे. सूर्यप्रकाशात चमचमणारे
पाणी,
त्याचे बदलते रंग, अंगावर रोमांच उभा करणारा गार-गार स्पर्श, पवित्र तीर्थाची याची देही याची डोळ्यासमोर आलेली पहिली
भेट. आकाशातील अनंत रंग, पिंजारलेल्या
ढगांच्या क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या आकृती आणि त्या सर्वांच्या समोर उभं असणारं
साक्षात कैलास शिखर. हे बाहेर तसंच, मनात उचंबळून आलेला भावभावनांचा कल्लोळ. अतिप्रियतेने
सहलसाथींची घेतलेली गळाभेट. एका दर्शनाने सारं कसं क्षणात बदलून जातं. सारा शीण, सारा भार सत्वर नाहीसा होतो, मन भारावून जातं. आपण भानावर येतो तेव्हा आता एकच ध्यास
लागलेला असतो तो कैलासाच्या परिक्रमेचा. मानसरोवरच्या दर्शनाने पावन झालेलं
मन-शरीर आता त्या एकाच विचाराने प्रेरीत झालेलं असतं. परिक्रमा.....!
परिक्रमा.....!
कोदारी, न्यालम, सागा, होरचू, चूई
गुंफा आणि दारचेन असा काठमांडू पासून सुरू झालेला मोटार प्रवास आता संपून पायी
किंवा घोड्यावरून परिक्रमा करण्याचा दिवस येऊन ठेपतो. मनात एक आगळीच हुरहुर साठून
राहाते. तासाने तासाला, काही
वेळा मिनिटागणिक बदलत जाणारं वातावरण. बोचरे अतीशीत वारे, काळंकुट्ट आभाळ आणि त्या वातावरणाला साजेशी बर्फ वृष्टी या
सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, परिक्रमेत
आपला तग लागणार का? हा
प्रश्न आणि परिक्रमा करायची लागलेली अनिवार ओढ इथे कस लागतो आपल्या मानसिक तयारीचा
आणि आपल्या बरोबर असलेल्या सहलसाथीच्या नेतृत्व गुणांचा. मनाची पूर्ण तयारी करत
आपण परिक्रमेसाठी सिद्ध होतो. स्वत:च्या पायांनी आणि मर्जीने यमद्वारापाशी येऊन
उभं राहिल्यावर मनात जे भाव जागृत होतात ते वर्णनातीत असतात. जणू इहलोकीची यात्रा
इथे संपते आणि यमद्वाराकडून पावलं पुढे पडतात ती कैलासाच्या प्रदक्षिणेसाठीच.
यमद्वार
मागे टाकून आपण जणू परलोकातच प्रवेश करीत असतो. दमछाक करणारा चढा रस्ता, कोरडं आणि शुष्क वातावरण, उन्हाचा चटका, थंडीचा शहारा, पायांना ओढ, पण हे सगळं मागे टाकून मन मात्र पुढेच धावत असतं. त्या
विराट रुपाच्या दर्शनासाठी. खरं तर, एव्हाना आपणही त्याचाच एक भाग बनलेले असतो. तो निळकंठ, कैलासपती आपल्याला आत सामावून घेत असतो. जय भोले! या नादात
निनादत असताना पुन्हा एकदा बळ एकवटून आपण चालत राहातो. वाटेत उमेद वाढवणारं कैलास
शिखराचं दर्शन होत राहातं. मजल दर मजल करत करत पहिल्या दिवसाच्या चालीनंतर
रात्रीच्या मुक्कामाचा पडाव येतो.... दिरापूक. कैलास शिखराचं दर्शन इथे अगदी जवळून
होतं. आता त्याच्या आणि आपणामध्ये कुणीच नसतं. त्या अनादी अनंताच्या दर्शनाने मन
तृप्त होतं. दिवसभराचा १२ किलोमीटरच्या प्रवासाचा शीण पळून जातो आणि दुसऱ्या
दिवशीच्या २२ किलोमीटरच्या प्रवासासाठी मन सज्ज होतं.
दोन
रात्री आणि तीन दिवसांत पूर्ण होणारी परिक्रमा या प्रक्रियेचा महत्वाचा भाग म्हणजे
दुसऱ्या दिवशी असलेला प्रवास. या प्रवासात १८,६०० फुट उंचीवरचा डोलमा पास पार करणे फार महत्वाचे आहे आणि
याच्यावर बऱ्याच चर्चा होत असते. पाठीवरचे ओझे (तिथे वजन खूप नसले तरी थोडं वजन
आवश्यक असते), पाण्याची उपयुक्तता, ताकद वाढवणारा सुकामेवा या सर्वांचा महत्व पहिल्याच दिवशी
स्पष्ट होतो, तसंच हातातली आधाराची
काठी जीवनसाथीच्या रूपात वाटते.
दिरापूकचा
मुक्काम हलवल्यावर लगेचच डोलमा पासची उंची खुणावू लागते. जय भोलेनाथचा गजर करीत
प्रत्येकजण आपल्या ताकदीप्रमाणे अंतर कापत जातो. चहू बाजूंला पसरलेला बर्फ आणि
आकाशाला गवसणी घालायला निघालेले यात्रेकरू. एका वळणावर ही रांग दिशेनाशीत होते, प्रत्येकाला जी जागा खुणावत असते तिथे डोलमा पास सामोरा
येतो. विजयी वीराप्रमाणे एकेका करत यात्रेकरू तिथे पोहोचतो. आपल्या श्रद्धेप्रमाणे
पूजा करीत आहेत. हाच तो यात्रेतला परमोच्च बिंदू. थोडा वेळ थांबून यात्री उताराला
लागतात,
तोच समोर खाली गौरी कुंडाचे दर्शन घडते. इथेच गणेशाचं
जन्मस्थान असल्याचं मानलं जातं. पुराणात वाचलेली ठिकाणं प्रत्यक्ष पाहताना मन
उल्हसित होतं. आता त्या खिंडीतून उताराला लागलेले यात्रेकरू महत्त्वाचा टप्पा पार
केल्याच्या आनंदात आणि बाजी मारल्याच्या ऐटीत मार्गक्रमण करीत जातात. पुन्हा
कैलासाचं दर्शन होतं. हात आपसूकच जोडले जातात. संध्याकाळपर्यंत लांबलेला प्रवास झुथूलपूक
या गावात संपतो. आजचा पडाव इथेच आहे. यात्रेतला महत्त्वाचा भाग पार झाल्याने
सर्वांचीच कृतकृत्य झाल्याची भावना असते.
पण
अशा ठिकाणी प्रवास करून आल्यावर आपणाला आपलं किती आरामदायी जीवन जगत आहोत याचा
साक्षात्कार होतो. या अशा प्रवासांमधून आपण जगण्याची कला शिकत असतो. त्या विराट
दर्शनाने आपलं मनही विशाल होतं. जगण्याचा दृष्टीकोन बदलून जातो.
नरेंद्र
प्रभू
No comments:
Post a Comment