13 July, 2021

‘क्यामेरा’ क्या तेरा


मी, नितीन किर, सागर कर्णीक आणि डॉ. रमेश मडव (छायाचित्र : विलास आम्ब्रे)


चालती ट्रेन थांबूच नये; ती पळतच रहावी असं जरी आपल्याला वाटत असलं तरी मधल्या स्टेशनवर ती थांबतेच. आमची पश्चिम एक्स्प्रेसही बोरिवली स्टेशनवर थांबली. ए.सी.३ टायरच्या त्या बोगीत आम्हा मित्रांना आतल्या बाजूच्या ६ सीट मिळाल्या होत्या. बाजुच्या दोन सीटवर एक लेकुरवाळी बेरिवलीला येऊन बसली. तीच्याबरोबर बरंच सामान आणि वर्षाच्या आतलं एक बाळ व ५-६ वर्षांचा एक मुलगाही होता. बाहेर बहुतेक तीचे वडील तीला बसवून द्यायला आले होते. आमच्या सीटवर कुटूंब असतं तर बरं झालं असतं अश्या नजरेचा एक कटाक्ष टाकून तीला अनेक सुचना देऊन हात हलवेपर्यंत गाडी सुटली. गाडीने वेग घेतला तसा हळूहळू आमच्या गप्पांनांही सूर सापडला. हसणं खिदळणं चालू झालं, आत्माराम परबही आमच्यात येवून बसले आणि गप्पांचा ओघ नव्या जोमाने सुरू राहिला. त्या बाईने समोरच्या सीट्खाली आपलं सामान लावलं, त्यात एक निळ्या रंगाचा पिव्हिसीचा ड्रम होता. तो सारखा लुडबूड करू लागला, त्याला मग इरत सामानाचा आधार देऊन तीने स्थिर केला. आम्ही ते पहात होतो, ‘ड्रम मध्ये माल भरलाय’ कुणीतरी म्हणालं. अशावेळी मुड एवढा लाईट असतो की छोटसं कारण मिळालं तरी आपण हसत सुटतो. तेव्हा ही तसंच झालं. त्या बाईला वाटलं की आमचं त्या ड्रमवर लक्ष आहे. थोड्या वेळाने ती फ्रेश व्हायला म्हणून उठली मोठ्या मुलाला सामानाकडे लक्ष देण्यास सांगून ती निघाली आणि लगेचच परत येवून त्या ड्रमच्या झाकणाकडची बाजू आतल्या बाजूला करून आणि आमच्याकडे एक नजर टाकून निघून गेली. कुणीतरी त्या मुलाला नाव विचारलं, कुठे जाणार वैगेरे चौकशी करुन त्या ड्रममध्ये काय आहे? असा प्रश्न केला. त्याने लाडू इत्यादी फराळाची नावं सांगितली. आम्हाला देशील का? विचारलं. तो थोडा सावध झाला. ड्रमला पाय लावून बसला. आम्ही पुन्हा गप्पांत रंगून गेलो. दुपारनंतर थोडी शांतता पसरली, गाडी वेगाने चालली होती, तेव्हढ्यात त्या ड्रमने जागा सोडली आणि तो वाटेत येऊन लुडबडू लागला. कुंटूंब पेंगत होतं. आमच्यापैकी कुणीतरी तो ड्रम आत ढकलताना झाकण बाहेरच्या बाजूला राहील याची काळजी घेतली, हास्याची एक लकेर घेऊन पुन्हा नव्या विषयाकडे गप्पा वळल्या. थोड्या वेळाने ती लेकुरवाळी उठून बसली, ड्रम थोडा बाहेर आला होता. तो आत ढकलताना झाकणाची बाजू बाहेर पाहून ती चमकली. आमच्याकडे संशयी नजर टाकून तीने तो ड्रम तसाच आत ढकलला. ती ची चुळबूळ चालूच होती. मग तीने सरळ उठून ड्रम उभा केला आणि उघडून पाहू लागली. आमच्याही नजरा तिकडे वळल्या. आत बराच फराळ भरलेला होता, तो शाबूत होता हे पाहून ती शांत झाली. तुम्ही काय अगदीच टपोरी नाही अशा अर्थाने आमच्यावर नजर फिरवून ती बाळाला मांडीवर घेवून खिडकी बाहेर पाहात असतानाच पुन्हा ड्रम जागा सोडून इकडे तिकडे जाऊ लागला आता ते धुड आत रेटायचं काम आम्हीच करू लागलो, त्याची मालकीण हालायची तसदीही घेत नव्हती. 

दुसर्‍या दिवशी सोनिपत, पानीपत करत गाडी अंबाल्याला पोहोचली, आम्हाला इथेच उतरायचं होतं. उतरलो आणि चढ-उतर करून एक नंबर प्लॅटफ़ॉर्मवर आलो. आता कुठे जायचं! गेटवर दोन टीसी आणि खुप सामान घेतलेला एक माणूस दिसला, बघतो तर काय ते आत्माराम परबच होते, पाठीवर मोठी ट्रेकिंग सॅक, पुढे छोटी सॅक, दोन्ही खांद्यांना चार पिशव्या, ट्रेकिंगच्या आकड्याने ते सगळं अडकवलं होतं पठ्ठ्याने. साक्षात सुसाईड बॉम्बर! याला पाहून कुणालाही चार हत्तींचं बळ येईल. आम्हाला ते पाहिजेच होतं. कारण आम्ही लडाखला चाललो होतो, लडाखला... 

चंदीगढमधल्या एका हॉटेलमध्ये त्यानी आमची थोडा आराम आणि फ्रेश होण्यासाठी सोय केली होती. बस तिथे पोहोचताच चार-चार जणांना मिळून एक रुम देण्यात आली. सगळेजण पांगले. तासा-दिड-तासाने हॉटेलमधल्या एका हॉलमध्ये सर्वांना एकत्र बोलावण्यात आलं. ४०-४२ जणांचा गृप होता. ओळख करून द्यायचा कार्यक्रम झाला, मग पुढील प्रवासाविषयी सुचना दिल्या गेल्या. (ओळखपरेड मधली परब आणि प्रभू ही दोनच नावं आणि बरोबर मडव, आम्ब्रे, किर ही नावं सोडून बाकीची मला सोडून पुन्हा आपल्या जागी गेली होती.) तीन टूर लिडर होते स्वत: आत्माराम परब, सागर सावंत आणि कौस्तूभ उपाध्ये. आता पंधरा मिनिटात निघायाचं आहे तेव्हा सगळ्यांनी बॅगा घेऊन खाली या, या सुचनेबरहुकूम मंडळी रिसेप्शनला जमली. आपण कुठेही गेलो किंवा जमलो की या पृथ्वी तलावर फक्त आपणच आहोत आणि समोरच्याला मोठ्या आवाजातलंच समजतं अशा प्रकारे आपलं बोलणं असतं, तसं ते चालू होतं, पण स्वर भांडणाचा नव्हता. गप्पाच चालल्या होत्या, आम्हीही त्यात सामिल होतो. काल ट्रेनमध्ये बसल्यापासून अखंड बडबड करून आमचं समाधान झालं नव्हतं. जणू उद्यापासून सहल संपेपर्यत मौनव्रत असल्याने आत्ताच कोटा पुर्ण करायचा होता. (शाळेत असताना वर्गात केलेली बडबड मला इथे आठवते, कुणाबरोबरही बसवा मी बोलायचोच, शेवटी वर्ग शिक्षकानी मला मुलींमध्ये बसवला, तर मी त्यांनाही बोलतं केलं होतं. असो.)                                               

भांडणाचा स्वर नव्हता असं मला वाटलं तरी थोड्यावेळाने तो ऐकू यायला लागला. आई-बाबा आणि मुलगा असं युनीट असलेल्यात त्या दोन तासांसाठी आणखी एका ७३ वर्षांच्या बाईं अशी चार जणांना मिळून एक खोली दिली होती. आणि त्या बाबांचं म्हणणं होतं की त्या त्रयस्थ बाईने दार उघडं टाकल्याने त्यांचा कॅमेरा चोरीला गेला होता. त्या बाईंना घालून पाडून बोलल्यावर तक्रार आत्माराम परबांकडे केली जात होती. दुसर्‍यांच्या भांडणात खुपच रस असल्याने मघापासून चाललेली गडबड शांत झाली आणि जो तो विषय समजून घेण्याची धडपड करू लागला. त्या वयोवृद्ध बाई रडवेल्या झाल्या होत्या. बाबामहाराज ऐकायला तयार नव्हते. आता कॅमेरा तर गेला इथे थांबून काय होणार असं म्हणून आत्माराम परबांनी सगळ्यांना बसमध्ये बसण्याची सुचना केली. हे म्हणजे गणेश पुजेलाच कुसका नारळ निघाला अशी आत्माराम परबांची चर्या झाली काय? अशी मालवणी शंका मला आली.      

‘तसं नाही कॅमेरा माझा नव्हता, मी मित्राचा या सहलीपुरता आणला होता आता त्याला काय सांगू?’ त्यांची अखंड चिडचिड आणि त्या बाईंचं ओशाळलेपण घेऊनच बसने चंदिगढ सोडलं. शेवटी सगळ्यांनीच दुर्लक्ष केल्याने त्यांचा स्वर मंदावत गेला. बाहेर दिवेलागण होत होती मात्र आतला अंधार संपायला तयार नव्हता.  क्रमशा...

अंधार सगळे व्यापण्या
रात्र काळी येतसे, पण
काळोख मनीचा खोल तो
उदयासही लावी पीसे



1 comment:

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates