03 November, 2009

यांचा मला अभिमान वाटतो.


श्री.ज्ञानेश्वर मुळे, भारताचे मालदीवमधले उच्चायुक्त. दै. लोकसत्ता मधून बर्‍याच वेळा लिखाण करतात. माहितीपर आणि वाचनिय लेख असल्याने मी ते नेहमीच वाचतो. गेल्याच रविवारी उच्चायुक्त करतात तरी काय? : बदलते विश्व बदलता भारत त्या आधी मालदीव : असेही गोड आतंकवादी! बदलता भारत बदलते विश्व असे लेख लोकसत्ताच्या वाचकांनी वाचले असतीलच. एवढ्यामोठ्या पदावर असताना श्री.ज्ञानेश्वर मुळे यांना सामान्य वाचकांसाठी काही लिहावेसे वाटते हेच खुप आहे. त्या पलिकडे जावून ते जेव्हा आपल्या नित्य कामाच्या बाबतीतले अनुभव लिहीतात तेव्हा खरच अचंबीत व्हायला होतं. मालदीवला साखरेचा तुटवडा पडू नये म्हणून केलेले प्रयत्न किंवा ताज हॉटेलच्या उद्घाटनाला मालदीवचे राट्राध्यक्ष आणि मा. रतन टाटा यांची घडवून आणलेली भेट अशा प्रकारच्या गोष्टीमधून त्यांची काम करायची पद्धत दिसून येते. राजदूत किंवा उच्चायुक्त हे दोन देशातला एक नाजूक दुवा असतो. दुसरा देश मग तो कोणताही असूदे पण आपल्या देशाशी त्या देशाचे संबंध चांगलेच असले पाहीजेत. ते संबंध सुधारणं बर्‍याच अंशी या उच्चायुक्तांवर अवलंबून असतं. आणखी एक गोष्ट परदेशात असलेल्या भारतीय नागरीकाना आपल्या देशाच्या उच्चायुक्तांचा मोठा आधार असतो. अनेकदा परदेशात गेल्यावर पासपोर्ट हरवणे, संकटाची परिस्थिती निर्माण झाल्याने त्वरीत मायदेशी निघून येणे अशा प्रसंगी आपल्या वकिलातीचाच सहारा घ्यावा लागतो. ज्ञानेश्वर मुळे सारखे अधिकारी असले की या गोष्टी सोप्या होतात अन्यथा... परदेशात असलेल्या आपल्य लोकांना याचा जास्त अनुभव असेलच. आपलं काम चांगल्या प्रकारे करणं, भारतीयांना देलासा देणं, देशाच्या हिताचा सतत विचार करणं, काही वेळा वाट वाकडी करूनही मादतीचा हात पुढे करणं या गोष्टी केल्या मुळे आणि सोनेरी पिंजर्‍यात न रहाता सामान्यांच्या जवळ जाण्याने मुळेसाहेब तुमचा मला अभिमान वाटतो.


01 November, 2009

प्रत्येक झारीत शुक्राचार्य असलेच पाहीजेत का?


काही माणासांना काम करण्या पेक्षा ते न करण्यातच पुरूषार्थ का वाटतो असा खरच प्रश्न पडतो. आपल्या हातून काही चांगलं घडत नसेल तर निदान वाईट तरी करू नका. एखाद्याचं काम अडवणं, दुसर्‍याला मोठेपणा मिळेल म्हणून गैरमार्गाने अडथळा आणणं, अधिकाराचा गैरवापर करणं, चांगल्या बाबतीत बिब्बा घालणं, कसं होतं ते बघतो म्हणणं, हो करतो म्हणून ते कधीच न करणं, एकीकडे संतपणाचा आव आणत दुसरीकडे अपेक्षा करणं, हे सगळं केलच पाहीजे का?

तुम्ही असं किती दिवस अडवणार? तुम्ही ज्या खुर्चीवर बसला अहात ते अढळ पद नक्कीच नाही. बदल ही एकच गोष्ट सातत्याने घडत असते. Constant is a change. आज तुम्ही अहात उद्या दुसरा कुणीतरी. पण उद्या तुम्ही नसाल ना तेव्हा, तेव्हा सुद्धा जर लोकांनी तुम्हाला लक्षात ठेवावं असं वाटत असेल तर आज आपल्या हातात आहेत ती लोकांची कामं करा. जर तुम्हाला काही करता येत नसेल किंवा करायची इछा नसेल तर निदान ते काम होत असताना त्या मधला अडथळा तरी बनू नका. ते काम वैयक्तीक असलं तरी आणि सार्वजनिक असलं तरी. सार्वजनिक हिताचं काम तर प्राधान्याने केलं पाहीजे. त्यात कोणत्याच प्रकारचा अडथळा नको. निरपेक्ष पणे समाजाचं काम करणारी मंडळी ते करतात तेव्हा त्या कामात सगळ्यांच्या सहकार्याचीच अपेक्षा असते. अडथळ्यांची नव्हे. तेव्हा शुक्राचार्य बनू नका. बघा हजारो वर्ष झाली पण शुक्राचार्य लक्षात राहीले ते त्यांच्या वाईट गुणांसाठी. निगेटीव्ह प्रसिध्दी कुणाला हवी हवीशी वाटेल? कोण पसंत करेल?

निर्लज्ज राजकारणी आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय


निवडणूकीचा निकाल लागून आठ दिवस होवून गेले तरी महाराष्ट्रात सरकार स्थापन होत नाही. आधी मुख्यमंत्री कोण?, मग उपमुख्यमंत्री कोण? मग कोणाचे किती मंत्री, आता कोण कोण मंत्री या सगळ्या ठासमारीत सरकारचं घोंगडं भिजत पडलय. तिकडे राजभवनावर मंडप सजवून चार दिवस झाले. उन्हाने खुर्च्या गरम होवून पुन्हा थंड झाल्या पण राजकारण्यांपैकी कुणी तिकडे त्या गरम करायला फिरकलेला नाही. रोज दिड लाख रुपये एवढं मंडपाचं भाडं भरलं जात आहे. हा पैसा कुणाचा?

तिकडे ज्याना मंत्रीपदाची आशा नाही अशा आमदारांनी आमदार निवासातल्या सागराभिमुख खोल्यांची कुलूपं परस्पर फोडून त्यात घुसखोरी केली आहे. या घुसखोरांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकीच रद्द केली पाहीजे. हे प्रतिनिधी पुढची पाच वर्ष कशा प्रकारचा कारभार करणार त्याची ही झलकच आहे.


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates