21 September, 2025

छत्तीसगढ - भाग १

 


छत्तीसगढ.... आत्ता आत्ता पर्यंत नक्षल प्रभावित क्षेत्र म्हणून पर्यटनापासून दूर असलेल्या या राज्यातील कांकेर, बस्तर, जगदलपुर , गीदम, नारायणपुर, कोंडागाव, दंतेवाडा या जिल्ह्यां मधून फेरफटका मारता आला. ईशाटूर्स च्या छत्तीसगढ सहली दरम्यान या क्षेत्राची जवळून ओळख करता आली. 

भगवान रामाने त्यांच्या वनवासादरम्यान काही काळ या प्रदेशात व्यतीत केला होता असं मानलं जातं. प्राचीन काळात हा प्रदेश वैदिक आणि पुराणिक काळापासून मौर्य, गुप्त आणि इतर राजवंशांच्या अधिपत्याखाली होता.

राजर्षितुल्य राजवंश: या राजवंशाच्या पहिल्या शासकाचे नाव सुर किंवा सुर आहे.

नाग राजवंश: या राजवंशाच्या पहिल्या राजाला अहिराज म्हणतात आणि त्याचे राज्य १४ व्या शतकापर्यंत टिकले.

सोम राजवंश: या राजवंशाचा सर्वात शक्तिशाली शासक महाशिवगुप्त बालारर्जुन होता आणि त्याच्या कारकिर्दीला छत्तीसगडचा सुवर्णकाळ मानला जातो.

काकतीय राजवंश: बस्तर प्रदेशातील काकतीय राजवंशाचे संस्थापक अन्नमदेव होते आणि त्यांनी बस्तरवर बराच काळ राज्य केले.

कलचुरी राजवंश: कलचुरी राजवंशाचा राजा रामचंद्र यांनी रायपूरची स्थापना केली आणि रतनपूरला राजधानी बनवले.

छत्तीसगडचा इतिहास प्राचीन काळापासून दक्षिण कोसला म्हणून सुरू होतो, जो इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून ओळखला जातो. या प्रदेशावर मौर्य आणि गुप्तांसारख्या प्राचीन राजवंशांचे राज्य होते. नंतर, रतनपूरच्या हैहय राजवंशाने "छत्तीसगड" हे नाव दिले, ज्याचा अर्थ ३६ किल्ले असा होता. १८ व्या शतकात ते मराठा राजवटीखाली आले आणि नंतर ब्रिटिश काळात ते मध्य प्रांतांचा भाग बनले. १ नोव्हेंबर २००० रोजी, छत्तीसगड मध्य प्रदेशातून वेगळे होऊन भारताचे २६ वे राज्य बनले.

छत्तीसगडमध्ये, "स्वदेशी लोक" म्हणजे प्रामुख्याने गोंड, कंवर, ओरांव आणि हलबा यासारख्या आदिवासी जमाती, ज्या राज्याच्या लोकसंख्येचा एक महत्त्वाचा भाग आहेत. जरी छत्तीसगडवर ऐतिहासिकदृष्ट्या विविध राजवंशांनी राज्य केले असले तरी, त्याची मुख्य ओळख आदिवासी संस्कृती असलेला वन-प्रधान प्रदेश अशी आहे.

स्वातंत्र्यानंतर प्रवीर चंद्र भंज देव हा तिथला राजा आपलं राज्य भारतात सामिल करून मुख्य प्रवाहात सामिल झाला. १९५२ सालच्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकीत  कांग्रेसच्या तिकिटावर आमदार झालेल्या या राजाने स्थानिक आदिवासी समाजाच्या मागण्या विधानसभा, पंतप्रधान नेहरू आणि तत्कालीन राष्ट्रपतींकडे अनेक वेळा मांडूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून प्रवीर चंद्रा यांनी आमदारकिचा राजीनामा देऊन स्वत:चा पक्ष स्थापन केला आणि ८ आठ आमदार निवडून आणले. परंतू  २५ मार्च १९६६ रोजी, प्रवीर चंद्रा आणि त्यांच्या अनेक आदिवासी अनुयायांना जगदलपूर येथील राजवाड्यात पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारले. (अधिकृत मृतांची संख्या राजासह बारा होती आणि वीस जखमी झाले; पोलिसांनी एकसष्ट राउंड गोळीबार केला. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी अहवाल दिला की प्रवीर चंद्रा पोलिसांविरुद्ध सशस्त्र आदिवासींचे नेतृत्व करत होते, ज्यांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला.) परंतू राजाला ११ गोळ्या लागल्या होत्या आणि अनेक आदिवासी मृत्युमुखी  पडले होते. राजा आणि इतर निष्पाप आदिवासींच्या हत्येमुळे बस्तरच्या स्थानिक आदिवासींमध्ये भारत सरकारविरुद्ध व्यापक संताप निर्माण झाला. हा रागचा फायदा घेऊन नक्षलवाद्यानी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद पसरवला.

आता प्रगती पथावर अग्रेसर असलेल्या या राज्याच्या रायपुर या राजधानीत आम्ही दाखल झालो आणि लगेचच कांकेर कडे  रवाना झालो.   

क्रमश:

राजा प्रवीर चंद्र भंज देव


राजवाडा जगदलपुर 







नरेंद्र प्रभू

13 September, 2025

निसर्ग सृजन

 


निसर्गात कलाकृती घडताना पाहाणे हे अत्यंत आनंददायी असतं . सृजनाची ती पहाट होताना जर आपण त्याचे साक्षीदार असलो तर....  ZZ वनस्पतीचा एक बोटा एवढा टणक तुकडा कुंडीतून वेगळा करावा लागला तेव्हा वाटलं याच्यात प्राण आहे, काही दिवस पाण्यात ठेवून पाहूया काय होतं ते. तसा हा तुकडा पाण्यात ठेवला. पहिले तीन महिने तो होता तसाच राहिला, ना कुजला, ना मऊ पडला. मग त्याला तीळा एवढं मुळ फुटतयं असं वाटू लागलं. ते मुळ किंचित वाढायला लागलं आणि त्याला आणखी एक मुळ फुटलं. हे मुळं वाढायला लागली आणि आता याला अंकुर कसा आणि कुठून फुटतो याचं कुतुहल वाटायला लागलं. पुढचे पंधरा-वीस दिवस फक्त ही मुळं वाढत होती आणि एके दिवशी आणखी एक मोठे जाड आकाराचं मुळ येत की काय असं चिन्ह दिसू लागलं. या जगात येताना संरक्षक कवच घेऊन यावं तसं ते जाड कवच वाढत गेलं आणि एका सकाळी अगदी छोटं सानुलं पान त्याच्यामधून डोकावू लागलं. त्या बोटा एवढा टणक तुकड्याला एकाच जागेवरून मुळं आणि पानं येतील असं वाटलंच नव्हतं.

चार-साडेचार महिने आत मध्ये अनेक क्रिया घडत असतील, सुप्तावस्तेत असताना बाहेरच्या जगाला कोणतेही संकेत न देता नवोन्मेशाचं नाट्य आतल्या आत आकार घेत असावं. समोरच्या मेजावर हे सगळं घडत होतं, निसर्ग सृजन आकार घेत होतं.  


01 June, 2025

मी मलाच हरवून बसलो

 

मी मलाच हरवून बसलो

या निखळ निर्झरापाशी

सय येते आणि भिडते

स्मरणात किती या राशी

 

संगीत  सरींच्यामधले

मज कानी पडते आहे

कोसळती धारा इथल्या

तो नाद निनादत आहे

 

जल निर्मल वाहे पुढती 

जणू अधिर मिलनासाठी

ते सागर झाले आहे अन्

घागर माझ्या हाती

 

ही धारच अवखळ आहे

जणू जीवन धावत राहे

मुरलेल्या आठवणींचा

मी दर्या झालो आहे

 

या सागरतिरीच्या लाटा

फेसाळत येती कधी अन्

कधी संथ पसरती भवती

हलकेच लागते ध्यान

 

नरेंद्र प्रभू

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates