
केदारनाथ सारख्या ठिकाणी जाणार्या यात्रेकरूंची
संख्या पुर्वी अत्यल्प होती. आता त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एवढेच
नव्हे तर आता त्या भाविकांपेक्षा उत्साही पर्यटकांचाच अधिक भरणा असतो. एका
आकडेवारीनुसार केदारनाथ अभयारण्यात दरवर्षी एकलाखाहून जास्त पर्यटक ये-जा करतात. तिथल्या
हवामानामुळे फक्त तीन महीने एवढ्या कमी कालावधीत ही सर्व धावपळ सुरू असते. त्यात
येणारे बहुतांश पर्यटक ‘लेज-कुरकुरे-पेप्सी’वाले. त्यामुळे ऎशोआरामात येणे, केवळ ‘मज्जा’ म्हणून यात्रा करणे, भरपूर पैसे
खर्च करणे, सर्व सुखसोईंची अपेक्षा करणे आणि त्याचा लाभ घेणे, जास्तीत जास्त
गोष्टी वापरणे या सर्वांमुळे तिथल्या नैसर्गिक साधनांवर त्याचा अतोनात ताण पडतो. गौरीकुंडपर्यंत
गाडीने आल्यावर वर केदारनाथपर्यंत जाण्यासाठी बहुतांश लोक घोड्यांचा वापर करतात,
सामान वाहून नेण्यासाठीही घोडे वापरले जातात. एकट्या केदारनाथ परिसरात पाच हजार
घोड्यांचा वापर होतो. या घोड्यांना खायला काय घालायचे? त्याचा बोजा जंगलातील गवत
आणि झुडूपांवरच पडतो. एवढ्या मोठया प्रमाणात येणार्या पर्यटकांची गरम पाण्याची,
खाण्या-जेवण्याची सोय करण्यासाठी तिथल्याच जंगलाची तोड होतो. या सगळ्याचा एकत्रीत
परिणाम म्हणून त्या जमीनीवरचं आवरण फारच कमी होत गेलं आणि आधीच ठिसूळ असलेली ही
जमीन अधिक उघडी बोडकी झाली. जमीनीची धुप मोठ्या प्रमाणावर होवू लागली. ज्या ठिकाणी
संरक्षक भिंती, कठडे हवे होते त्या ठिकाणी टपर्या, हॉटेल, धर्मशाळा उभ्या
राहिल्या. या सर्वापासून नदीपात्रही वेगळं राहू शकलं नाही. भाविकांना हेलीकॉप्टरने
पोहोचवणार्या कंपन्यांची संख्या बघता बघता नऊ झाली. सतत हेलीकॉप्टरची घरघर सुरू
झाली. अशा ऎशोआरामी पर्यटकाला झालेला आघात पेलण्याजोगा नव्हताच. निसर्ग व्यवस्थेवर
प्रचंड ताण पडला आणि व्हायचं तेच झालं. कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची तयारी
नसलेल्या पर्यटकांना फार मोठ्या मनुष्यहानीला तोंड द्याव लागलं. आणि खाली हरिव्दार, हृषीकेशला कलेवरं जमा करणं एवढंच
प्रशासनाच्या हाती राहिलं.
मदतीचा हात, तुटपुंजा का होईना पण तो आपत्तीग्रस्त
माणसांपर्यंत पोहोचला पण तिथल्या पशु-पक्षी, प्राण्यांच काय? हजारो घोड्यांमुळे
त्यांना संसर्गाची बाधा झाली, हेलीकॉप्टरची घरघरण्याने वन्यजीवांची संख्या घटली.
प्रजननासाठी येणार्या स्थलांतरीत प्राणी पक्षांवर
गर्दी-गोंगाटाचा विपरीत परीणाम झाला. खोर्याने मिळणार्या पैशापुढे या सर्वाचा
विचार कोण करणार? या सर्वाचा एकत्रीत विचार केल्यास असं दिसतं की या वर्षी फार
काही वेगळं झालं नाही. तर या सगळ्याची तयारी आपणच हळूहळू करून ठेवली होती. एक
निमीत्त पाहिजे होतं त्याचं काम ढगफुटीने केलं त्याचे परिणाम आपण उघड्या डोळ्यांनी
पाहातच आहोत.
नरेंद्र प्रभू
No comments:
Post a Comment