
गेली तीस वर्षं मी याच गोव्याच्या प्रेमात पडलो आहे. बाखिबा बोरकरांचं बोरी गाव, डॉ. रामाणींचं वाडी तळावली, तांबडी सुर्लाचं मंदीर, तेरेखोल, बोंडला अभयारण्य, दुधसागर धबधबा कोकणीत सांगायचं झालं तर हा खरा ‘सुना परांत’, सोन्याचा प्रदेश. अप्रतिम समुद्र किनारे ही तर गोव्याची ओळख पण गेले दोन दिवस गोव्याच्या अंतरभागात फिरताना मन मोहून गेले. अशा सफरीत जीवाभावाची आवडती माणसं बरोबर असली की त्या सफरीचा आनंद काही औरच असतो. मांडवी एक्सप्रेसने थिवी स्टेशनला उतरलो तेव्हापासून उमाकांत भाईंनी भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल करून टाकली.
गोव्याच्या प्रसन्न
हवेत कालच्या दिवसभरच्या प्रवासाचा शीण नाहीसा झाला आणि सकाळी सहालाच झोपेतून जाग
आली. खमंग गोवन न्याहारीने दिवसाची सुरूवात झाली आणि मग दिवसभर पोटोबा सुखावतच
राहीला. धुळेर म्हापसाहून सुरू झालेला तो प्रवास स्मरणीय झाला. म्हापसा-
मोय्रा-अळदोणा मार्गे जात असताना केबलने तोलून धरलेला पुल लागला, पुढे खाडीतून
बार्ज आली की फाटक उघडल्यासारखा बाजूला होणारा ब्रिज लागला. गोव्यातल्या खाणी
सध्या बंद असल्याने सगळीकडे हिरवाई पसरून राहिली होती. त्या पुला खालून वाहणारं पाणी नितळ होतं.
रस्त्याचा दुतर्फा भाजीचे वाफे नेत्रसुख देत होते आणि आंबा, फणस काजूची तोरणं
बांधावी तशी झाडं स्वागताला हजर होती. एवढ्यात एक सप्तपर्णीचं झाड सामोरं आलं आणि
माझी चंगळ झाली. पंधरा-वीस वर्षांपासून न खाल्लेली तोरणं (कोकणीत चुन्ना) माझ्या
दृष्टीस पडली आणि मी वेडा झालो. उन्हाची तमा न बाळगता भर दुपारी मी त्या काटेरी
झुडूपाला भिडलोच. अशी तोरणं काढून खाण्यातला आनंद माझ्या मुंबईवासी मुलीला समजणार
नाही. शहराने आमच्या या पुढच्या पिढीचे असे कितीतरी आनंदाचे क्षण हिरावून घेतले
आहेत महाराजा. उमाकांत भाईंनी मला
प्रोत्साहन देताच तिथल्याच कुमयाच्या पानांचे द्रोण करून ती तोरणं त्यात जमा केली.
दोन्ही हातात द्रोण घेवून पुन्हा गाडीत बसताना मला स्वर्ग प्राप्तीचा आनंद झाला
होता. या पहिल्या एक-दिड तासात माझा दिवस सार्थकी लागला होता आणि नंतरचा पुर्ण
दिवस आणि त्यात केलेली चंगळ माझ्यासाठी बोनस होता.

![]() |
बिमलं |
मये तलावाकडे गाडी
थांबवली आणि पुन्हा एकदा पेट्रोल भरून घेतलं ते गाडीत नव्हे तर पोटात.
तलावाकाठच्या बगिच्यात बसून गप्पा मारताना पाणकावळा, घार, ब्राम्हणी काईट, बदकं
आपले खेळ करून दाखवतच होते. तासभर गप्पा मारून मग नार्वे गावाकडे प्रस्थान ठोकले
ते मासळीच्या जेवणावर ताव मारण्यासाठी. सुग्रास जेवणाला खरी बहार आणली ती त्या चणक
नावाच्या
माशाने. गोव्याच्या खाडीत मिळणारा हा चवदार मासा खावा तर अशा खाणावळीतच. अर्थात कोळंबी, बांगडा, दोडकारे यांचं हौतात्म्य आम्ही वाया जावू दिलं नाहीच हे वेगळं सांगायला नको.

![]() |
ब्रम्हवठार |

खूप छान सर
ReplyDeleteमाझा ब्लॉग- http://shabdjhep.blogspot.in/
गोयच्या अंतरंगाचं दर्शन मस्त जमलय, पर्यटन स्थळाला समर्पित होता आलं पाहिजे हे खरंय तुमचं , शक्य तितकी शहरी सोयी, बाजारीकरण टाळून अस्सल मातीतलं पर्यटन अनुभवावं, त्याची सर कशाला नाही.
ReplyDelete