![]() |
| लेखक नरेंद्र प्रभू, अच्युत पालव, रेणूदिदि गावस्कर, आमदार प्रसाद लाड, डॉ. प्रेमानंद रामाणी, एँग्नेलो राजेश अथायडे,आत्माराम परब आणि सुदेशजी हिंगलासपूरकर |
जेष्ठ लेखिका
रेणूदिदि गावस्कर यांनी या पुस्तकाची
प्रस्तावना लिहिली असून त्या सदर पुस्तकाविषयी बोलताना त्या
म्हणाल्या “पुढे काय....? पुढे काय....? पुढे काय....? अशी तीव्र उत्कंठा वाचकाच्या मनात निर्माण करून त्याला
पानांमागून पानांचा फडशा पाडायला प्रवृत्त करणारं हे पुस्तक आहे! पुस्तकाचं
हस्तलिखित मला मिळालं आणि वाचताना मी अक्षरश: तल्लीन झाले. खरंच हे पुस्तक वाचताना
वाचक रममाण होतील अशी माझी खात्री आहे.
या पुस्तकानं कोकणापासून सुरूवात करून देश विदेशाला आत्मारामने घातलेली गवसणी
टिपली आहे. त्यातल्या अद्भुतरम्यतेसह जीवनस्पर्शी बारकाव्यांनाही अवकाश दिला आहे.
आत्माराम परब नावाचा एक अवलिया प्रवासी झपाटल्यासारखा प्रवासाला निघतो काय, जगातील अनेक
देशातील चित्तथरारक अनुभवांनी संपन्न होतो काय वा या अनुभवांची श्रीमंती अगणित
लोकांपर्यंत पोचावी अशी मनीषा बाळगतो काय! आणि त्याच्या या लोकविलक्षण भटकंतीत
अनेक वेळा सहभागी झालेले श्री. नरेंद्र प्रभू ते सारं संचित वाचकांपर्यंत जादूई शब्दात
पोचवतात काय ? सगळंच विलक्षण
आणि भन्नाट. हा सारा प्रवास आणि वाचन प्रवास वाचकाला तल्लीन आणि तन्मय तर करून
सोडेलच.
आत्माराम मूळचा कोकणी माणूस. हिरवीगार झाडं आणि लालमातीशी त्याचं जन्माचं
नातं. पण हे नातं केवळ या निसर्ग वैशिष्ट्यांपुरतं सीमित रहात नाही. कोकणी माणसाची
न विचारता सल्ला देण्याची सवय आणि तिरकस स्वभाव याचं फार सुंदर वर्णन पुस्तकाच्या
आरंभी वाचकाच्या भेटीला येतं. नव्हे, त्याचं एक छोटं आख्यानच प्रभूंनी वाचकाच्या भेटीला सादर
केलं आहे.
आत्मारामने भटकंतीच्या नादापायी मुंबई कस्टमची उत्तम नोकरी सोडून स्वत:च्या
ईशा टुर्स या कंपनीची स्थापना केली. ईशा टुर्सची पहिली कुल्लू मनाली सहल जाहीर
झाली. त्याचवेळी आत्मारामला जीवनाचं एक चिरस्थायी सत्य उमगलं, ते म्हणजे
व्यवसाय आणि छंद यात महदंतर असतं. या सत्याचा आविष्कार नंतरच्या व्यवसायाच्या
भटकंतीत पावलोपावली उपयोगी पडला. या पहिल्याच सहलीत पर्यटक गोळा करण्यापासून ते
पुढे ती सहल पूर्णत्वाला नेईपर्यंत ज्या काही अडचणींचा डोंगर आत्मारामला पार करावा
लागला त्याचं वर्णन वाचतावाचता हसू फूटतं
आणि हसताहसता डोळ्यांच्या कडा कधी पाणावतात हे समजतही नाही.
पर्यटक म्हणून आत्माराम अनेकदा लडाखला गेला. लडाखच्या निसर्गाशी त्याचं
अंतरीचं नातं जुळलं. लडाख म्हणजे आत्मारामसाठी स्वर्गच. ते स्वर्गसुख त्यानं हजारो
पर्यटकांमध्ये भरभरून वाटलं. पण २०१० साली ६ ऑगस्टच्या रात्री लडाखवर ढगफुटीने
प्रहार केला. या संकट समयी आत्माराम तिथं पोचला. तिथल्या पद्मा ताशी या त्याच्या
जिवाभावाच्या लडाखी मित्रासमवेत आत्मारामने तिथे लडाखींना जमेल ती मदत केली. त्या
वेळचा तो प्रसंग, मृत्यूचं तांडव आणि निसर्गाचं उग्र रुप हे सारं वाचकांनी मुळातूनच वाचायला
हवं.
आत्मारामनं पर्यटकांना सौंदर्य संपन्न देशांची सफर करवली तसंच ग्रामीण भारताचं
दर्शन घडवलं. भव्यता आणि नम्रता हातात हात घालून कशा नांदतात ते दाखवलं. ‘ईशा टुर्स’चा ‘हटके’ दृष्टिकोन
यातच स्पष्ट होतो. या प्रवासात आत्मारामला स्मिता रेगे, पद्मा ताशी यांच्यासारखे हे तितकेच ताकदीचे सहकारी लाभले.
यांच्या शिवायही आत्मारामवर जीवाभावाने प्रेम कारणारे, त्याला या प्रवासात कळकळीनं साथ देणारे अनेक सहकारी भेटले
म्हणून तर ही यात्रा सुफल संपन्न झाली. श्री. नरेंद्र प्रभूंची ओघवती भाषा, वर्णनात्मक
शैली आणि विषयाशी एकरूप होण्याची ताकद यांमुळे हे पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे.
याची ग्वाही मी नक्की देऊ शकते. कारण मीसुद्धा आत्मारामच्या या सफरीतील एक
आनंदयात्री आहे. अनेक प्रसंगांची साक्षीदार आहे वा प्रवासातील घुसळणीत जे आनंदाचं
नवनीत बाहेर आलं त्याची वाटेकरी आहे. या पुस्तकातील व्यक्तीचित्रं आणि आत्मारामची
त्यांच्याशी असलेली अपार मैत्री पाहिली की भारत माझा देश आहे सारे,भारतिय माझे बांधव आहेत
असा जात-पात, धर्म,पंथ याच्या पलिकडे जाणारा
दृष्टिकोन आपसुकच वाचकाच्या मनात निर्माणाहोते. ”
पुस्तकाचे
लेखक श्री. नरेंद्र प्रभू आपल्या मनोगतात म्हणाले
“ आपल्या कोषातून बाहेर पडण्यासाठी लडाखसारख्या ठीकाणी आत्माराम परब सारख्याबरोबर
गेलं पाहिजे. पर्यटकांच्या सहलीत रंग भरण्यासाठी हा माणूस काय काय कसरती करतो ते
या पुस्तकात लिहिलं आहे. आत्माराम परब यांचा जीवन प्रवास हा एखाद्या सुरेल
गाण्यासारखा आहे, तो आपल्याला या पुस्तकातून वाचता येईल. हिमालय ते तळकोकण आणि
केनिया-टांझानिया पासून स्कँडेनेव्हियापर्यंतचं
प्रवास वर्णन या पुस्तकात विस्ताराने आलं आहे.”
डॉ. प्रेमानंद रामाणी,
सुलेखनकार श्री. अच्युत पालव, आमदार श्री.
प्रसाद लाड,
श्री. रवी सावंत यांनीही आत्माराम परब यांच्याबरोबर केलेल्या संस्मरणीय
सफरींच्या आठवणी यावेळी कथन केल्या. ![]() |
| अच्युत पालव यांच स्वागत करताना आत्माराम परब |
अच्युत
पालव यांच स्वागत करताना आत्माराम परब
पुस्तक प्रकाशन आणि ‘ईशा टुर्स’चा १५व्या वर्धापन दिनाचं औचीत्य साधून गेली २४ वर्षं
रायगडावर जाऊन शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यालाउपस्थित राहणार्या आणि महाराष्ट्रातल्या
तीनशेवर गड-किल्ल्यांची भ्रमंती करणार्या शिवभक्त हमिदा खान यांचा या सोहळ्यात मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
| सौमित्र गांगूली यांच स्वागत करताना डॉ. प्रेमानंद रामाणी |
| रमेश ठाकूर यांच स्वागत करताना एँग्नेलो राजेश अथायडे |
| पद्मा ताशी यांच स्वागत करताना रेणूदिदि गावस्कर |
| ऋषीकेश यादव यांच स्वागत करताना श्री. रवी सावंत |
| इंद्रायणी गावस्कर यांच स्वागत करताना मा. दिनकर गांगल |
![]() |
रघुवीर वैद्य यांच
स्वागत करताना रेणूदिदि गावस्कर
|









