09 November, 2010

गंगापुत्र



 श्री.विजय मुडशिंगीकर
दिवाळी सारखे सण आले की हल्ली मुंबईत रहावत नाही. फटाक्यांचा अतिरेक आणि कानठळ्या बसवणारा आवाज याने जीव हैराण होतो. आवाज, हवा यांच्या प्रदुषणात कमालीची वाढ होते. या वर्षी ऎन दिवाळीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा मुंबईत होते. त्यांची सुरक्षा व्यवस्था चोख असली तरी त्यांच्यापर्यंत हे प्रदूषित हवा नक्कीच पोहोचली असणार. आपण प्रगत राष्टाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. ओबामानी तर भारत प्रगतीशील नव्हे तर प्रगत देश आहे असे म्हटले आहे. पण त्यानी तसं म्हणून काय उपयोग. ते इथल्या प्रत्येक कृतीतून दिसून आलं पाहिजे. मुंबईवरून ओबामा उडत असताना त्यानी शहराचा झालेला उकिरडा नक्कीच बघितला असणार. विमानतळाजवळची मिठी नदी ओबामांच्या नजरेस पडली असती तरी त्याना भारत अजून किती मागे आहे हे समजलं असतं. हे आपणच असं का करतोय?  एकेकाळी मिसिसिपी गंगेसारखीच होती. पण अमेरिकेने तीला तीचं मुळ रूप प्राप्त करून दिलं. गंगेला ते कधी प्राप्त होणार?

ओबामांनी भाराताबाद्दल आशावादी विचार मांडले. इथली मुलं, तरूण यांना पाहून ते प्रभावीतही झाले. एकप्रकारची ताकद आणि इच्छाशक्ती इथल्या वातावरणात त्यांना दिसून आली. खरच एक दिवस भारत सामर्थ्यवान देश बनेल अशी आशा त्यांना, तुम्हा आम्हा सर्वांना आहे त्याचं कारण एक ध्येय्य घेऊन झटणारी माणसं अजून या देशात आहेत. ओबामा भारतात यायला निघाले आणि सर्वच वृत्तपत्रात त्यांच्याबद्दल लिहून यायला लागलं. लोकसत्तामध्ये याच दरम्यान मिसिसिपी ते गंगा! हा अग्रलेख आला होता. मनात आणलं तर एक सामान्य माणूस काय करू शकतो हे त्या नमूद केलं होतं. गेल्या काही वर्षांत विजय मुडशिंगीकर या महाराष्ट्रातील एका एकांडय़ा शिलेदाराने गंगेच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. निवृत्तीनंतरची पुंजी म्हणून जमा करून ठेवलेला भविष्य निर्वाह निधी त्यांनी पूर्णपणे या मोहिमेत ओतला आहे. असा उल्लेख त्या अग्रलेखात होता. श्री. मुडशिंगीकरानी केलेलं काम नक्कीच दाद देण्यासारखं आहे, विचार करायला लावणारं आहे.

आदर्श सारखे घोटाळे, सत्ताधिश, नोकरशहा, बिल्डर, दलाल हे सगळे देश विकून खात असताना हा देश अजून तगून आहे तो मुडशिंगीकरांसारख्या प्रामाणिक लोकांमुळेच. एक सोडून दोन वेळा मणक्याची ऑपरेशन झाली तरी त्यानी त्या आजारपणात ध्यास घेतला तो गंगा शुद्धीकरणाचा. ते आपल्या या भुमिकेशी एवढे प्रामाणिक राहिले की या भ्रमणयात्रे दरम्यान काढलेल्या छायाचित्रांना चांगली किंमत येत असतानाही त्यांनी ती विकली नाहीत. सगळ्याच क्षेत्रात होणारं प्रदुषण रोखण्याच्या बाबतीत ते आग्रही असतात.

गंगोत्री 
गंगा ते आदर्श सगळीकडेच भ्रष्टाचार, प्रदुषण. सगळ्या देशाचाच चेहरामोहरा विद्रूप होत असताना अशी काही माणसं (अण्णा हजारे, पोपटराव पवार) आपलं काम निष्ठेने करत रहातात म्हणून काही अंशी आपण हे विष पचवू शकतो. मुडशिंगीकरांसारख्यांच्या प्रयत्नाला हातभार लावला तर आणि तरच गंगाजल पुन्हा शुद्ध होईल. पवित्र होईल.    
   

4 comments:

  1. भविष्य निर्वाह निधी गंगाशुद्धीकरणासाठी वापरला हे धारिष्ट्यच म्हटलं पाहिजे कारण अशा चळवळींना अपेक्षित प्रतिसाद मिळतोच असं नाही. काही व्यक्ती मनस्वी असतात हेच खरं!

    दिवाळीचं ग्रिटींग सुंदर आहे.

    ReplyDelete
  2. कांचन, विजय मुडशिंगीकर प्रतिसादाची किंवा कुणाच्या सहभागाची वाट न बघता स्वतः कामाला लागले.

    ReplyDelete
  3. हवामान व पर्यावरण यासारखे मूलभूत विषय मराठी पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘लोकसत्ता’ चं प्रमुख योगदान आहे. पूर्वी प्रसिद्धिमाध्यमांमध्ये अपवादाने पाहायला मिळणारे हे विषय आता ठळकपणे दिसत आहेत. ग्लोबल वॉर्मिग, नद्यांच्या समस्या, पर्यावरण, पाणी, हवामान अशा विषयांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘लोकसत्ता’ सदैव प्रयत्नशील असते, त्या बद्दल ‘लोकसत्ता’ चे मनापासून अभिनंदन.
    गंगानदी उत्तराखंड राज्यात, उत्तरकाशी जिल्हयातील 'गोमुख' येथे उगम पावून २५२५ कि.मी.चा प्रचंड प्रवास करत गंगासागर येथे बंगालच्या उपसागरात सामावते. दरम्यान ती उत्तराखंडासह उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि शेवटी पश्चिम बंगाल या पाच राज्यांतून वाहते. जवळ जवळ् नव्वद हजार वर्ग कि.मी. क्षेत्रफळ या महानदीला लाभले आहे. त्या मुळे गंगाशुध्दिकरण ही काही साधी सोपी गोष्ट नाही. तो एक महाप्रकल्पच आहे. या महप्रकल्पाच्याच नावाखाली एकटया उत्तरप्रदेश राज्यातच आतापर्यंत ७७१ कोटी खर्च केले गेले आहेत. गमतीची गोष्ट अशी की, ज्या अँक्शन प्लँन मुळे ब्रिटनच्या 'थेम्स नदी' ला पुंनुरुजीवीत करण्यात आले त्या 'थेम्स अँकशन प्लँन' चा अभ्यास करून करून, ‘गंगाशुध्दिकरणासाठी’ जसाच्या तसा ‘गंगा अँक्शन प्लँन’ या नावाने तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी लागू केला. पण पंचवीस वर्षांहून जास्त कालावधी जावूनही गंगानदी तेव्हा होती त्या पैक्षा पाचपट अधिक प्रदुषित झाली. त्यामुळेच की काय पुन्हा नव्याने 'थेम्स अँकशन प्लँन' चा अभ्यास करण्यासाठी उत्तरप्रदेश राज्यातील उच्चस्तरीय अधिका-यांच एक शिष्टमंडळ ब्रिटनला जाण्याच्या तयारीत आहे.
    एकूणच आजपर्यंत गंगाशुध्दिकरणासाठी खर्च झालेल्या निधीचा विचार करता, त्यातून साधलेली परिणामकता मात्र खर्च झालेल्या निधीहूनही जास्त निराशजनक आहे.
    वाराणसी शहराचं क्षेत्रफळ आहे १००,०५० हेक्टर, मात्र ७८ टक्के भागातील लोकवस्त्तीतच मलनिसारण तसेच सांडपाण्यावर शुध्दिकरणप्रक्रिया करण्याची सुविधा ऊपलब्ध आहे. २९८ दशलक्ष लिटर इतके सांडपाणी प्रतीदिन या शहरातून निघते. या पैकी १०२ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर शुध्दिकणप्रक्रिया करण्यात येते. ३७ मोठ्या नाल्यांपैकी २२ नालेच शुध्दिकरण प्रकल्पाला जोडले गेले आहेत.
    होय ! त्याच शहराचीही अवस्था आहे, जेथून स्व. राजीव गांधीनी गंगाशुध्दिकरण अभियानाची सुरवात केली होती. प्रत्यक्षात किती सांडपाण्यावर खरोखरच शुध्दिकरणाची प्रक्रिया केली जाते आणि मग ते 'गंगार्पण' केले जाते ते त्या गंगामातेलाच ठावूक.
    एका सर्वेक्षणानुसार वाराणसीत गंगाजल 'आचमन' करण्यायोग्यही राहिलेले नाही.
    पाणी पिण्यायोग्य ठरण्यासाठी एक लीटर पाण्यात किमान ३ ग्रँम बी. ओ. डी. (बायोलाँजिकल आँक्शिजन डिमांड)असणे आवश्यक असते. मात्र वाराणसीतील 'गंगाजलात' हे प्रमाण २० मिलीग्रँम इतकेच आहे. त्या मुळे वाराणसीत 'आचमन' केल्याने मोक्षप्राप्ती ऐवजी एखादा आजार प्राप्त होण्याचीच जास्त शक्यता आहे.

    ReplyDelete
  4. विजयजी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपल्या देशात भावना आणि व्यावहारीकपणा या मध्ये गल्लत केली जाते आणि राजकारणी दलाल त्याचा फायदा घेतात. गंगेच्या बाबत तेच झालं आहे.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates