skip to main |
skip to sidebar
एकदाच मिळालेला जन्म आणि त्या जन्मात जिवलग झालेले दोन प्रेमी, जातपात बाजूला सारून लग्नबंधनात बांधले जातात. जन्म जन्मांतरीचे होऊन जातात. संसारवेलीवर एक फुल उमलतं. आता दिवस-रात्र कधी संपतात तेच कळणार नाही असं वाटतं. बाहेर पडणार्याला घराची सतत ओढ लागलेली असते, असे ते दिवस असतात..... असायला हवेत. पण नेमक्या याच वळणावर विसंवादाचे सूर उमटतात. पटेनासं होतं. शुल्लक गोष्टींचा बाऊ केला जातो. शत्रूला तरी चांगली वागणूक मिळेल, पण त्या एकेकाळच्या जिवलगाला फटकारलं जातं. उपमर्द होईल इतपत बोलणी खावी लागतात. हे दोन्ही बाजूनी चालू असतं. आजूबाजूची मंडळी आगीत तेल ओततात. त्यात सख्खे आई-वडीलही असतात. “शादी निभानी है की निपटानी है?” सारखे प्रश्न एकमेकांना विचारले जातात. पण खरं सांगू का शेवटी हा गुंता ज्याचा त्यानेच सोडवायचा असतो. एकदा शांत बसावं, आपल्यातला मी पणा बाजूला ठेवावा. स्वतः नीट विचार करावा. काय चुकलं ते मनोमन ओळखावं. चुक आपली असली तर ती मोकळेपणी कबूल करावी, दुसर्याची असेल तर माफ करावी. दोघांनीही एक-एक पाऊल पुढे यावं, नकळत हात हातात येतील. हो हे सांगायला खुप सोपं आहे याची कल्पना आहे मला. पण संवाद सुरू व्हायला काय हरकत आहे? नव्हे सुरू व्हायलाच हवा. पहिल्यांदा अहंकार आडवा येत असेल तर एखाद्या चांगल्या मणसाची मदत घ्यावी. पण तुटेपर्यंत ताणू नये. त्यात फायदा कुणाचाच नाही. तोटा दोघांचाही आणि मुख्य म्हणजे त्या बाळाचा, ज्याने जीवनाची नुकतीच सुरवात केली आहे.
महेंद्र - लग्न म्हणजे शेवटी काय ऍडजस्टमेंट्स.. हे खरं.. आणि म्हणतात नां, की अती परीचयात अवज्ञा.. जास्त दिवस झाले लग्नाला की एकमेकांचे दोष जास्त प्रकर्षाने जाणवायला लागतात. फक्त , त्या वेळेस दोषांकडे दुर्लक्ष करून गुणांचं पारडं जड आहे, हे मान्य केलं की सगळं ठीक होतं.
ReplyDelete