21 November, 2009

यांचा निषेध केलाच पाहीजे...!


काल आय्.बी.एन्. लोकमत वाहिनीच्या मुंबई आणि पुणे कार्यालयांवर हल्ला झाला. महिलासहीत पत्रकार, कर्मचार्‍यांना मारहाण झाली. त्याची दृष्य आपण सर्वांनी दूरचित्रवाणीवर पाहीली. त्या हल्ल्यांचा सर्व प्रथम मी निषेध करतो. हा लोकशाहीच्या चौथ्यास्तंभावरचा पर्यायाने लोकशाहीवरचा हल्ला आहे हेही तेवढच खरं. पण या राज्यात कायद्याची भिती आहे कुणाला?

एका वृत्तपत्रवाहिनीवर हल्ला झाला, तो थेट दाखवला जात होता, पोलिसाना लगेच कल्पना दिली गेली तरीपण पोलिस पाऊण तासानंतर आले. मुंबई म्हणजे काही भामरागड किंवा गडचिरोली नव्हे, पोचायला वेळ लागतो. जाणूनबुजून उशिरा येणार्‍या पोलिसांचाही निषेध झालाच पाहिजे.

या आधी लोकसत्ताचे संपादक श्री. कुमार केतकर यांच्या घरावर जिवघेणा हल्ला झाला, त्या हल्याच्या बाबतीत काय कारवाई झाली? त्या हल्यामागचा सुत्रधार म्हणून आमदार मेटेना राष्ट्रवादी पक्षातून काढून टाकलं आणि पुन्हा (लोकांची स्मृती अल्पकाळ टिकते असं मानून) पक्षात सामावून घेतलं. आताचे गृहमंत्री आर्.आर.पाटील त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले असतात. त्यांचा ही निषेध झालाच पाहिजे.

स्वाभिमान संघटनेच्या गुंडांनी काही दिवसांपुर्वी निरपराघ तरूणाला मारहाण केली होती. त्याचं काय झाल? कुणाला शिक्षा झाली? त्याच्या सुत्रधाराला काय शिक्षा झाली? त्याचाही निषेध झालाच पाहिजे.

दोनच दिवसांपुर्वी पोलिस प्रशिक्षणात हप्तेवसुलीचा कळस झाला आहे अशी लोकसत्ताची हेड लाईन होती वाचाळ आबा त्यावर मात्र मुग गिळून गप्प का आहेत? त्याचाही निषेध झालाच पाहिजे.

19 November, 2009

हप्तावसुलीचे बुम्बरँग


आजच्या लोकसत्ता मध्ये हप्तावसुलीचे धडे ही अस्वस्थ करणारी बातमी वाचली. शिर्षक वाचून वाटलं नवीन पोलीस कामावर रुजू झाल्यावर वरीष्ठ अधिकार्‍यांकडून त्याना हप्ता वसुल करायला लावला जातो, पण तसं नाही तर प्रशिक्षण घेतानाच त्यात असलेल्या कसरती, व्यायाम यातून सवलत मिळण्यासाठी हे हप्ते घेतले जातात. हे भयंकर आहे. उद्या घरबसल्या प्रशिक्षण पुर्ण केलं म्हणूनही दाखला देतील हे लोक. बोगस डिगर्‍या तसे बोगस प्रशिक्षण. कमांडो प्रशिक्षणाचीही तीच गत. वा आनंद आहे. आता कुणा दहशतवाद्याना हल्ला करायलाच नको. कुणीही येईल आणि पोलिसाना टपली मारून जाईल. हातात रायफल आहे पण ती चालवता येत नाही अशी स्थिती आहे.

याला जबाबदार आपण, समाज आणि राजकारणी हेही तेवढच खरं. हे वर पासूनच झिरपत आहे. पण ते आता त्यांच्यावरच उलटणार आहे. संरक्षणासाठी दिलेला पोलिस लाच देऊन पास झाला की खराच प्रशिक्षीत आहे याची खात्री कशी देणार आणि तो कसलं संरक्षण करणार. पुढार्‍यांनो तुम्हीच सांभाळा. जनता तुम्ही आधीच वार्‍यावर सोडलेली आहे. (आता पुढार्‍यांबरोबर खाजगी बॉडीगार्ड दिसले तर नवल वाटायला नको) पोलिस आता वॉचमन सारखे होतील.

पण असा त्रागा करून कसं चालेल, हे असं व्हायचच. २६/११ ला वर्ष व्हायच्या आत तेव्हा नापास म्हणून काढून टाकलेले (त्यांच्या भाषेत नैतिक जबाबदारी) आबा पुन्हा गृहमंत्री म्हणून विराजमान झालेच ना? त्यानी कसलं प्रशिक्षण घेतलं?


17 November, 2009

अनावर ‘मोह’ आणि मोहाची फुले


सरकार बनवण्याच्या ओढाताणीत पंधरा दिवस गेले. मालदार, मलईदार वगैरे खाती वाटली गेली. कुणाच्या मुखी लोणी तर कुणाच्या तोंडी अंधार आला. पण मंत्री कल्पक असेल तर कुठचही खातं कमावत होवू शकतं. पुर्वी पक्षातून निलंबीत झालेले पण नंतर गोड मानून घेतलेले ह.भ.प. मंत्री अशा पैकीच एक. मागच्या वेळी त्याना वन खातं मिळालं तेव्हा महाराष्ट्रातील एकूण वन क्षेत्र कमी झालं. बाकीच्या वन जमीनीचा त्यानी ‘विकास’ केला. आता आदिवासी विकास करण्यासाठी जाणत्या राजाने त्याना नेमलं. त्यांची नजर मोहावर आधीपासूनच होती. जंगलात गेल्यावर त्याना मोहाची फुलं दिसायची. आदिवासी त्या फुलांपासून दारू बनवतात हे त्यानी हेरलं. खात्याचा कारभार हाती आल्या आल्या त्याना त्या मोहाची ‘हर्बल लिकर’ बनवावी असा साक्षात्कार झाला. आदिवासींच तेवढच एक अन्न सरकारी कचाट्यातून सुटलेलं. तेसुद्धा आता हे ह.भ.प. हिरावून घेवू पहाताहेत.

उसाची शेती करून शेतकरी श्रीमंत झाला नाही ना कारखाना मात्र संचालक मंडळ हवेली पासून हवाला पर्यंत पोहोचलं. द्राक्ष बागायतदार उपाशी आणि वाईनरीवाले तुपाशी. आता या ‘हर्बल लिकर’मुळे काय होणार ते वेगळं सांगायला हवं का?

16 November, 2009

सुखांत – एक चर्चा


येत्या वीस तारीखला सुखांत हा एक वेगळ्या विषयावरचा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक – संजय सुरकर, निर्माती- अनुया म्हैसकर, लेखक – किरण यज्ञोपवीत, कलाकार- अतुल कुलकर्णी, ज्योती चांदेकर, कविता मेढेकर, तुषार दळवी अशी टिम आहे.

एका आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलाला वाढवून त्याला मोठं केलं, नावारूपाला आणलं. ती आईच एका दिवशी अपघातात सापडते. तिचं शिर सोडून संपूर्ण शरीर निकामी होतं. संवेदना जातात. मुलगा, सुन तिचं सगळं करायला तयार असतात पण त्या स्वाभिमानी स्त्रीला इच्छामरण पाहीजे असतं. आपल्याच वकिल मुलाला ती आपला खटला न्यायालयात लढायला लावते. आईवर अतिशय प्रेम करणारा मुलगाच न्यायालयात तिच्यासाठी दयामरण मागतो. नको असताना जगवण, की हवं असताना मरण देणं म्हणजे प्रेम? खरा न्याय कोणता? इच्छा-मरण कायद्याने मंजूर करावं का? असा प्रश्न विचारणारा हा चित्रपट आहे.

वरील कलाकार, निर्माती, लेखक यांच्या संवादाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहायचा नुकताच योग आला. चर्चेतून चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली. अतुल कुलकर्णीचा नेहमी प्रमाणे वेगळ्या धाटणीचा एक चित्रपट, पहायला हवा.

कळी उमलताना

माझ्या मित्राच्या फर्माईशीमुळे ही कविता पोस्ट करतो आहे.


एक कळी उमलताना

रोज पाहतो खुलताना

खोड काढली कधीतर

फुरंगटून बसताना


एक कळी उमलताना

पहाटवारा झेलताना

डोळे अर्धेच उघडून

शाळेसाठी जाताना


एक कळी उमलताना

आनंदाने बागडताना

अभ्यासाच कोडं सोडवत

थकुन जाते निजताना


एक कळी उमलताना

क्षणोक्षणी फुलताना

मी मात्र रमुन जातो

तिचं बालपण आठवताना


15 November, 2009

पुर्वांचलाची चित्र सफर भाग ४


काझीरंगा अभयारण्य सोडवत नव्हतं, तरी पण त्याला टाटा करून आम्ही तेजपूरच्या दिशेने निघालो. वाटेत फिरत फिरत रात्रीचा मुक्काम भालुकपाँगला करायचा होता. दरम्यान हे काही फोटो मिळाले. असामी कलेचे नमूने पहाण्या सारखे, निसर्गही तेवढाच प्रेक्षणीय.


14 November, 2009

मालक नव्हे पालक


मुलं हळूहळू मोठी होताना

त्यांना खरच उमलू द्या

जीवन सुंदर असतं

त्यांनासुद्धा समजू द्या


पुस्तकांचं ओझं तर

त्यांच्या पाचविलाच पुजलेलं

आपल्या अपेक्षांचं ओझं

आपण आणखी त्यावर लादलेलं


शिक शिक म्हणून चौदा तास

वर्गामध्ये डांबायचं

आपणच आपल्या मुलाला

बंदिवासात ढकलायच?


शाळेत जायला कंटाळा येतो

घरात यायची भीती वाटते

नव्वद टक्के मार्क पडले

तरी मुल डोळे भरते?


कोण होणार म्हणून मागे लागून

कोण आहे हे विसरायच

जन्मजात रंगकर्मीला

शल्यविशारद बनवायच?


प्रत्येक माणूस वेगळं आहे

चैतन्याचं झाड आहे

साच्यामध्ये घालून त्याला

पुतळा का बनवायचं आहे?


झाड उंच होईपर्यंत

आपण सभोवतालचं कुपण आहोत

आपण मुलांचे मालक नव्हे तर

फक्त त्यांचे पालक आहोत


खेळू खरेच रंगे



आज बालदिन, घरातलं मुल घराला घरपण देतं, ध्यानी,मनी,स्वप्नी मग ते मुलच वास करतं. माझी छकूली ऋचा त्याला अपवाद कसा असेल? आज तिच्यावर लिहीलेली हे कविता.


इवल्याच पावलांचा

मज नाद ऎकू येतो

तू उठवले मला की

स्वप्नात भास होतो?


तव पदरवात असते

लय,ताल खेळण्याची

मज वाटते असे की

आताची खेळी माझी


तू डाव मांडला हा

मी खेळलो जरासा

स्वप्नास ज्ञात सारे

जागेपणी निराशा


तू थांबली परंतू

मी खेळतोच आहे

डोळे सताड उघडे

मी, स्वप्नात राहू पाहे


येना खरीच आता

खेळावयास संगे

मी, भांडणार नाही

खेळू खरेच रंगे


12 November, 2009

लातों के भुत बातों से नही मानते

हिंसेचा पुरस्कार कुणीच करू नये. प्रश्न चर्चेनेच सोडवले पाहीजेत हेही खरं. पण हे सगळं कुणाबरोबर? समोर तशी व्यक्ती असेल तर आणि तरच. अबू आझमी आणि लालू यादव सारखे बैल समोर आले तर त्यांच्या नाकात वेसणच घातली पाहीजे. निवडून आल्याचा उन्माद आणि जाणून बुजून काढलेली खोड याला जशास तसे उत्तर देणे आवश्यक होतं. अरे महाराष्ट्र सहिष्णू आहे म्हणूनच तुम्ही इथे येवून हे बोलू शकता. आधी लाथ मारायची आणि मग सॉरी म्हणायचं हे यांनी आधीच ठरवून केलं होतं. त्याला योग्य ते उत्तर मिळालं. एकाच्या कानाखाली आवाज काढल्याबरोबर किती ठिक़ाणाहून आवाज आले बघा. तो मुलायम कठोर बोलला. रामविलास (की बिलास ?) तो पण बोलला, सोमनाथ चटर्जीचा रसगुल्ला बाहेर आला. (हेच ते महाशय, सौरभ गांगुलीला कर्णधार पदावरून दूर केलं तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष असूनही यांनी गळा काढला होता.) आपली वेळ आली की सगळे प्रादेशिक होतात. बाकी चिल्लर बरेच बकबकले. पण तो बैल लालू देशाचे तुकडे होतील म्हणतो. हा बघा किती मस्तवाल राष्ट्रगीत सुरू असताना कसा बसलाय. याला लाथ घालून नको उठवायला? (अधिक माहितीसाठी या बैलाला कोणीतरी आवरा रे...... हा सरदेसाईंचा ब्लॉग वाचा) अशांना बोललेलं कळेल? अजून तो कृपा कसा बोलला नाही? की कोडं (कोडा ? ) सोडवत बसलाय?


 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates