काल आय्.बी.एन्. लोकमत वाहिनीच्या मुंबई आणि पुणे कार्यालयांवर हल्ला झाला. महिलासहीत पत्रकार, कर्मचार्यांना मारहाण झाली. त्याची दृष्य आपण सर्वांनी दूरचित्रवाणीवर पाहीली. त्या हल्ल्यांचा सर्व प्रथम मी निषेध करतो. हा लोकशाहीच्या चौथ्यास्तंभावरचा पर्यायाने लोकशाहीवरचा हल्ला आहे हेही तेवढच खरं. पण या राज्यात कायद्याची भिती आहे कुणाला?
एका वृत्तपत्रवाहिनीवर हल्ला झाला, तो थेट दाखवला जात होता, पोलिसाना लगेच कल्पना दिली गेली तरीपण पोलिस पाऊण तासानंतर आले. मुंबई म्हणजे काही भामरागड किंवा गडचिरोली नव्हे, पोचायला वेळ लागतो. जाणूनबुजून उशिरा येणार्या पोलिसांचाही निषेध झालाच पाहिजे.
या आधी लोकसत्ताचे संपादक श्री. कुमार केतकर यांच्या घरावर जिवघेणा हल्ला झाला, त्या हल्याच्या बाबतीत काय कारवाई झाली? त्या हल्यामागचा सुत्रधार म्हणून आमदार मेटेना राष्ट्रवादी पक्षातून काढून टाकलं आणि पुन्हा (लोकांची स्मृती अल्पकाळ टिकते असं मानून) पक्षात सामावून घेतलं. आताचे गृहमंत्री आर्.आर.पाटील त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले असतात. त्यांचा ही निषेध झालाच पाहिजे.
स्वाभिमान संघटनेच्या गुंडांनी काही दिवसांपुर्वी निरपराघ तरूणाला मारहाण केली होती. त्याचं काय झाल? कुणाला शिक्षा झाली? त्याच्या सुत्रधाराला काय शिक्षा झाली? त्याचाही निषेध झालाच पाहिजे.
दोनच दिवसांपुर्वी पोलिस प्रशिक्षणात हप्तेवसुलीचा कळस झाला आहे अशी लोकसत्ताची हेड लाईन होती वाचाळ आबा त्यावर मात्र मुग गिळून गप्प का आहेत? त्याचाही निषेध झालाच पाहिजे.





