28 October, 2009

निवडणूका संपल्या, आता भोंदूबाबाचे पाय धरायला राजकारणी मोकळे.


निवडणूका संपल्या. गेली दहा वर्षं नाकर्तेपणा दाखावूनही राज्य मिळालं, गादी मिळाली. अशोक चव्हाणांच्या रुपाने महाराष्ट्राला एक तरूण तडफदार मुख्यमंत्री मिळाला म्हणून नांदेड मधल्या त्यांच्या समर्थकानी (की चमच्यांनी?) आकडा टाकून वीज चोरून त्यांची पोस्टर उजळवून टाकली. हे सर्व बघायला अशोकरावांना मात्र वेळ नाही. नको, गैरसमज नको, मंत्रिमंडळ रचनेचा तीढा सोडवण्यात ते व्यस्त नाहीत तर सत्यनारायण राजू या पुठ्ठापुर्तीच्या एका भोंदूबाबाच्या पायी लीन होण्यात ते मग्न आहेत. स्वतःला साईबाबांचा अवतार समजणारा सत्यसाईबाबा हा देशाच्या माजी गृहमंत्र्याला सुद्धा असाच नाचवत होता. शंकरराव चव्हाण हे त्यांचं नाव. आपल्या वडीलांचीच परंपरा अशोकराव चालवणार असं दिसतय. शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या तेव्हा त्यांचे अश्रू पुसण्यासाठी या मुख्यमंत्र्याना तिकडे जावस वाटलं नाही पण सत्यसाईबाबा महाराष्ट्रात आल्या बरोबर त्याच्या समोर लोटांगण घालायला हे तिकडे धावले. आपल्या सरकारी निवासस्थानातही मुख्यमंत्र्यानी त्या बाबाला आमंत्रित केलं आहे. या बाबाने जादू करून वर्षा बंगल्याला सोन्याची कौल बसवावीत म्हणजे मी सुद्धा त्याच्या पाया पडेन. दुसरे जयंत पाटील, खुद्द सांगली-मिरजेत दंगल झाल्यावर ते तिकडे धावले नाहीत पण आज हे चरण धरायला ते तत्परतेने गेले. शिवराज पाटील चाकूरकरही इस्त्री मोडली तरी चालेल म्हणत गेले.

हातचलाखी करून अंगठी, सोन्याची चेन काढून त्या बाबाने त्यांना प्रसाद म्हणूनही दिले असेल. असे भक्त मिळाल्यावर सोन्याचा भाव कितीही वाढला तरी त्या बाबाला त्याची पर्वा नसणारच. प्रश्न तो नाही. अरे तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहात. तुम्हीच जर असे भोंदूबाबांच्या नादी लागणार असाल तर तुम्ही कसली अंधश्रद्धा निर्मुलन करणार आणि ते विधेयक जे विधिमंडळात रखडलं आहे ते काय पारीत करणार?


6 comments:

  1. आपण सत्य तेच लिहिले आहेत. मला असे परखड लिहिता आले असते तर.

    ReplyDelete
  2. श्री.कोवुर, पी.सी. सरकार या दोघांनी त्यांना चांगलच आव्हान दिले होते. पण ..

    ReplyDelete
  3. हरेक्रिष्णजी, प्रतिक्रियेबद्दल आभार, हरियाना आणि अरूणाचल प्रदेश मध्ये सरकारं स्थापन झाली पण इथे हे किती दिवस दाढ्या कुरवाळत बसणार कोण जाणे ? सगळ्यानाच मालदार 'खाती' पाहीजेत.

    ReplyDelete
  4. पण काय त्यांच्या जीवावर बेतलं असणार. फार माजलेत हे बाबा. का माजू नये? मुख्यमंत्री, गृहमंत्री कपडे सांभाळायला असल्यावर?

    ReplyDelete
  5. लातूर जवळ चाकूर येथे कैक कोटी रुपये खर्च करुन सत्य साईबाबाचे मंदीर आपल्या शिवराज पाटलांनी बांधले आहे. यांच्या कडे एवढा पैसा येतो कुठुन?

    ReplyDelete
  6. साधक, पैसा हेच या गोष्टींचं मुळ असतं. बाबा आणि राजकारणी म्हटलं की कसला आलाय कायदा आणि कोण विचारणार इनकम टॅक्स?

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates