26 October, 2009

विचारांची आतषबाजी – नितीन पोतदार




कळेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट तरच होईल जय महाराष्ट्र

‘प्रोग्रेसीव्ह मराठी माणूस’ हा माझा ध्यास आहे. ज्याला तुम्ही आपल्या उणिवा समजता त्याच खर्‍यातर आपली ताकद आहेत. आपलेच लोक आपणावर टिका करतात हे लक्षात घ्या. मराठी माणूस मागे नाही. त्याची दिवसेंदिवस प्रगतीच होत आहे. कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार बोलत होते आणि जमलेला श्रोत्रूवर्ग विशेषतः तरूण-तरूणी टाळ्यांचा कडकडाट करत होता. त्रिमिती आयोजित ‘स्वप्न बघा, स्वप्न जगा’ या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात कवीवर्य प्रा. प्रविण दवणे यांनी पथ्थरसुध्दा सागर होवू शकतो मग तुम्ही आम्हीतर चालाती बोलती माणसं असं सांगून चेतवलेल्या स्फुलिंगावर वास्तव आपल्या बाजूने आहे हे सोदाहरण स्पष्टकरत पुन्हा एकदा फुंकर घातली.

मराठी माणूस चाकरमानी वृत्तीचा, डाऊन मार्केट, व्यापाराचं अंग नसलेला, बावळट अशी टीका केली जाते. पण ही टिका कोण करतं. तर मराठी माणूसच ती टिका करतो. पण आता तशी स्थिती राहीलेली नाही किंबहूना तशी ती कधीच नव्हती. राजकारण, व्यापार, उद्योग, क्रिडा, जाहीरात, बॅंकींग, विमा, माहीतीतंत्रज्ञान, माध्यमं या सर्व क्षेत्रात आजच्या घडीला अघाडीवर असलेल्या (राष्ट्रपती प्रतिभा पाटील, सचीन तेंडूलकर, भरत दाभोळकर, नितीन वैद्य, शोभा डे, नितीन सरदेसाई, विजय भटकर, चंदा कोचर अशी अनेक. स्वतः नितीन पोतदार हे अंरतराष्ट्रीय किर्तीचे गुंतवणूकतज्ञ आहेत.) अनेक दिग्गजांची नुसती नावं आणि हुद्दे सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही म्हणून वानगी दाखल काही उदाहरणं पडद्यावर दाखवली ती पाहताना उपस्थितांपैकी प्रत्येकाचीच छाती अभिमानाने फुलून आली.

पैसा म्हणजे भ्रष्टाचार, अधोगती, तो गैरमार्गानेच मिळवला असणार, पैशाबरोबर शंभर व्यसनं येतात या कल्पना आतातरी डोक्यातून काढून टाका. वर उल्लेखलेली मंडळी भरपूर पैसा येवूनही मातली नाहीत की व्यसनाधीन झाली नाहीत. सचोटी हा मराठी माणसाचा गुण आहे ती आपली उणिव नाही. मात्र हा गुण ‘कॅश’ करता आला पाहीजे. प्रत्येक मराठी माणूस किमान एकतरी छंद जपतो. तो छंद तुम्हाला पैसा मिळवून देवू शकतो. मात्र त्यासाठी तसा विचार केला पाहीजे. मराठी माणूस कुठल्याही दृष्टीने मागे नाही. भारतात सगळ्यात जास्त मर्सिडीज कार कोल्हापूरात विकल्या जातात या वरून काय ते समजा. पुढे जायचय ना? मग स्वतःचा शोध घ्या, आत्मपरीक्षण करा, निर्णय घ्या. मग यश तुमचच आहे. पण एक मात्र लक्षात ठेवा ‘कळेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट तरच होईल जय महाराष्ट्र’ हे आपलं ब्रीद असायला पाहीजे.

आपण मराठी माणूस परिसंवाद, सभा संमेलने खुप भरवतो, पण आपला समाज आर्थिक सक्षम कसा होईल यावर विचार करण्यासाठी एकत्र येत नाही या बद्द्ल खंत व्यक्त करताना त्रिमितीने ‘स्वप्न बघा, स्वप्न जगा’ हा कार्यक्रम आयोजित केला त्याचं मात्र त्यानी मनापासून कौतूक केलं. त्रिमितीचा या कार्यक्रमला १०० रुपये तिकीट लावूनसुद्धा तुडूंब गर्दी झाली होती हे विशेष. जय महाराष्ट्र, जय मराठी.


5 comments:

  1. अरे हो.. माझा ब्लॉगिंग चा छंद पण पैसे मीळवुन देउ शकतो. बरेच दिवस झालेत टाळाटाळ करतोय , पण आता लवकरंच काहितरी करायला हवं.. छान आहे लेख.

    ReplyDelete
  2. महेंद्रजी, खरच छान कार्यक्रम होता. तंवीताईंनी लिहीलेला आ बैल मुझे मार, वाचलं तेव्हा तर हे लिहायला खुपच मजा आली.

    ReplyDelete
  3. नमस्कार,
    आपला लेख वाचला. मराठी पणाच्या कक्षा विस्तृत करणारा आहे. असाच काहीसा लेख माझा आहे. विचार व्यक्त करण्याची ढब वेगळी आहे परंतु निष्कर्ष साधारण असाच आहे. मी लिंक
    पाठवते आपण जरूर वाचवा, व कळवावेत.
    http://anukshre.wordpress.com/2009/11/17/%e2%80%98%e0%a4%ae%e2%80%99-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a4%be-%e2%80%98%e0%a4%ae%e2%80%99-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be/

    ReplyDelete
  4. खरंय, पैसा वाईट आहे ही मानसिकता बदलली पाहिजे.

    ReplyDelete
  5. आनंद, उत्कर्ष, आपलं माझ्या ब्लॉगवर स्वागत आहे.
    धन्यवाद

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates